रोहित शर्माला कर्णधारपदावरून कोणी काढलं? अजित आगरकरने थेट सांगितली 'ती' गोष्ट
Rohit Sharma Captaincy: भारतीय क्रिकेट आता एका संक्रमणातून जात आहे. गेल्या वर्षीच्या टी-20 विश्वचषकानंतर सूर्यकुमार यादव हा फॉरमॅटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार बनला. आता शुभमन गिलला त्याच्या कसोटी कारकिर्दीनंतर वन-डे संघाचीही कमान सोपविण्यात आली आहे.
ADVERTISEMENT

मुंबई: कसोटी मालिकेनंतर शुभमन गिल भारताच्या एकदिवसीय संघाचा (One Day Team) कर्णधारही बनला आहे. अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने ऑस्ट्रेलियन दौऱ्यासाठी वनडे आणि टी-20 संघांची घोषणा केली. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांचा वनडे संघात समावेश करण्यात आला आहे. पण सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे अत्यंत आश्चर्यकारकरित्या रोहित शर्माला वनडे संघाच्या कर्णधार पदावरून हटविण्यात आलं आहे. त्यामुळे रोहित शर्मा हा आता केवळ एक फलंदाज म्हणून संघात असेल.
रोहित शर्मा कर्णधारपदावरून स्वत: पायउतार झाला की, त्याला काढून टाकण्यात आले आहे हे अद्याप स्पष्ट नाही. तथापि, मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्या विधानावरून असे सूचित होते की, त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्यात आले असावे. टीमची घोषणा करताना अजित आगरकर यांनी जोर देऊन सांगितले की, निवडकर्ते तिन्ही फॉरमॅटसाठी स्वतंत्र कर्णधार ठेवण्याच्या बाजूने नव्हते.
हे ही वाचा>> रोहित शर्माला वनडेच्या कर्णधारपदावरुन हटवलं, ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; भारताचं नेतृत्व कोण करणार?
अजित आगरकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, "तिन्ही फॉरमॅटसाठी तीन वेगवेगळे कर्णधार असणे जवळजवळ अशक्य आहे. वनडे क्रिकेट सध्या सर्वात कमी खेळले जाणारे फॉरमॅट आहे. आमचे लक्ष आगामी टी-20 वर्ल्ड कपवर आहे. आम्हाला गिलला जुळवून घेण्यासाठी वेळ द्यायचा आहे."
'रोहित आणि विराट पूर्णपणे तंदुरुस्त'
अजित आगरकर यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीबद्दल सांगितले की, "विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी संघात सामील होण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व औपचारिकता पूर्ण केल्या आहेत. आम्ही नेहमीच निवडलेल्या खेळाडूंची नावे सेंटर ऑफ एक्सलन्स (COE) ला पाठवतो आणि त्यांच्या फिटनेसची पुष्टी करतो." अजित आगरकर यांनी असेही म्हटले की, रोहित शर्मा किंवा विराट कोहली दोघेही 2027 च्या वर्ल्ड कपमध्ये खेळण्यासाठी वचनबद्ध नाहीत.