10 वर्षांचा संसार अन् 2 मुलंही झाली; प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट, पण...
विवाहबाह्य संबंधातून पतीच्या हत्येचा कथित कट उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीसमोर प्रियकराने केलेल्या कथित कबुलीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
10 वर्षांचा संसार अन् 2 मुलंही झाली
पण महिलेचा तरुणावर जीव जडला
थेट पतीच्या हत्येचा कट
आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात विवाहबाह्य संबंधातून पतीच्या हत्येचा कथित कट उघडकीस आल्याची घटना समोर आली आहे. सोनम रघुवंशी, मुस्कान आणि मेरठमधील दामिनी यांच्या प्रकरणांप्रमाणेच या प्रकरणातही पतीला संपवण्याचा कथित डाव रचल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, या प्रकरणात पतीच्या सतर्कतेमुळे आणि गावातील ज्येष्ठांनी घेतलेल्या पुढाकारामुळे संभाव्य अनर्थ टळल्याचे सांगितले जात आहे. ही घटना कुप्पम परिसरातील असून, विवाहाला दहा वर्षे पूर्ण झाल्यानंतर आणि दोन मुले असतानाही एका चुकीच्या फोन कॉलमधून सुरू झालेल्या ओळखीने हे संपूर्ण प्रकरण घडल्याचे समोर आले आहे.
दोन लहान मुलांना सोडून प्रियकरासोबत निघून गेली...
मिळालेल्या माहितीनुसार, गुडुपल्ली मंडलातील गुडी कोथूर येथील चिरंजीवी यांचा शोभा हिच्याशी दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. या दाम्पत्याला दोन मुले आहेत. सुमारे तीन महिन्यांपूर्वी शोभाची गुंटूर जिल्ह्यातील कंद्रिगा येथील बालाजी नायक याच्याशी एका रॉंग कॉलद्वारे ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्याचा दावा करण्यात आला आहे. सुमारे महिनाभरापूर्वी शोभा पती आणि दोन लहान मुलांना सोडून बालाजी नायकसोबत निघून गेली. त्यानंतर चिरंजीवी यांनी पत्नी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दाखल केली होती.
पत्नी अन् तिच्या प्रियकराला शोधून आणलं..
दरम्यान, याआधी घडलेल्या अशाच एका हत्येच्या घटनेची आठवण झाल्यानंतर चिरंजीवी यांनी स्वतःची आणि मुलांची काळजी घेत पत्नीचा शोध सुरू ठेवला. तपासादरम्यान शोभा आणि बालाजी नायक हे बेंगिलापल्ली येथे राहत असल्याचे तसेच त्यांनी कुप्पम येथील एका मंदिरात विवाह केल्याचे त्यांना समजले. त्यानंतर नातेवाईक आणि स्थानिकांच्या मदतीने दोघांना शोधून मंदिरात आणण्यात आले आणि ग्रामपंचायतीसमोर हजर करण्यात आले.
ग्रामपंचायतीतील चौकशीदरम्यान बालाजी नायक याने शोभाला आपणच तेथे आणल्याचे आणि दोघे मिळून चिरंजीवी यांच्या हत्येचा कट रचत असल्याचे कथितरित्या कबूल केल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे वेळेत हा प्रकार उघडकीस आल्याने चिरंजीवी यांचा जीव वाचल्याचे सांगितले जात आहे. या प्रकरणात सुरुवातीला बेपत्ता झाल्याच्या तक्रारीकडे पोलिसांनी गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. सध्या कुप्पमचे डीएसपी पार्थसारथी यांनी या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू केला असून, पुढील कारवाई तपासाअंती करण्यात येणार आहे.
