मुख्यमंत्र्यांजवळ जे टोमणे बॉम्ब आहेत त्याच्यापेक्षा खतरनाक बॉम्बच उरलेला नाही: फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधानसभेत बोलताना अनेक मुद्द्यांवरुन भाजपला आणि देवेंद्र फडणवीस यांना बरेच टोमणे लगावले. याच मुद्द्यावरुन मीडिया स्टँडवर जेव्हा देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आलं तेव्हा त्यांनी देखील मिश्किल शैलीत मुख्यमंत्र्यांवर टीका केली.

याचवेळी फडणवीसांनी मुख्यमंत्री हे नवाब मलिकांची पाठराखण करत असल्याच्या मुद्द्यावरुन खरपूस समाचार घेतला. ‘मुंबईतील बॉम्बस्फोट करणाऱ्यांशी व्यवहार करणाऱ्यांचीही पाठराखण आता मुख्यमंत्री करु लागले आहेत म्हणजे या सत्तेत ते पुरते मुरले आहेत.’ असं म्हणत फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांवर टीकेची झोड उठवली. पाहा माध्यमांशी संवाद साधताना फडणवीस नेमकं काय-काय म्हणाले:

‘बॉम्बस्फोट करणाऱ्यांशी व्यवहार करणाऱ्यांचीही पाठराखण आता मुख्यमंत्री करु लागले आहेत’

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘मला असं वाटतं की, बरं झालं की, आतापर्यंत मुख्यमंत्री चूप होते तर आम्हालाही असं वाटत होतं की, कुठेतरी त्यांच्या मनामध्ये ती धग शिल्लक आहे की, जी मुंबईच्या अपराध्यांच्या विरोधात आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये होती पण आज हे स्पष्ट झालं की, मुंबईतील बॉम्बस्फोट करणाऱ्यांशी व्यवहार करणाऱ्यांचीही पाठराखण आता मुख्यमंत्री करु लागले आहेत म्हणजे या सत्तेत ते पुरते मुरले आहेत.’ अशी टीका फडणवीसांनी यावेळी केली.

‘मुख्यमंत्र्यांजवळ टोमणे बॉम्ब’

ADVERTISEMENT

‘मी तर स्पष्टपणे सांगितलं की, युक्रेनचे झेलेन्स्की यांनी नाटोची मदत मागण्याऐवजी आमच्या मुख्यमंत्र्यांची मदत मागायला हवी होती. कारण आमच्या मुख्यमंत्र्यांजवळ जे टोमणे बॉम्ब आहेत त्याच्यापेक्षा खतरनाक बॉम्बच उरलेला नाही. परंतु टोमण्यांनी सरकार चालत नसतं. मी स्पष्टपणे सांगतो आमच्या बाजूला कोणीही बसलं असतं तरी त्यांची हिंमत झाली नसती देशविरोधी कारवाया करायची. आम्ही होऊ दिली नसती.’ असं फडणवीस म्हणाले.

ADVERTISEMENT

‘जी परिस्थिती त्या जळत्या रोमची होती तीच परिस्थिती आता महाराष्ट्राची’

‘हे सरकार अंहकारात एवढं बुडालेलं आहे की, आम्ही करु तो कायदा. पण याने प्रश्न सुटलेला नाही. दहावी, बारावीच्या परीक्षेच्या काळात मुलं हे 10-10 किलोमीटर पायी चालले आहेत. हे आपल्याला पाहायला मिळतंय. कुठे अपघात होऊन लोकं मरतायेत कारण त्या ठिकाणी एसटी नाहीए. हे सगळं या सरकारला दिसत नाहीए. म्हणून तर मी म्हटलं जी परिस्थिती त्या जळत्या रोमची होती तीच परिस्थिती आता महाराष्ट्राची झाली आहे.’ अशा शब्दात फडणवीसांनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

‘आपल्या घरगड्यासारख्या लोकांवर कारवाई होत असेल म्हणून…’

‘अनेक वेळा आपल्या घरगड्यासारख्या लोकांवर कारवाई होत असेल म्हणून हे कदाचित त्यांच्या मनात येत असेल. पण हे मी जरी म्हटलं तरी ते उपहासाने म्हटलं आहे. माझा त्यांना सवाल हा होता की, जर तुम्ही ईडीला घरगडी म्हणता तर आमच्या नेत्यांवर सांगून केसेस टाकणारे मुंबईचे पोलीस काय तुमचे घरगडी आहेत का?’ असा सवालही फडणवीसांनी उपस्थित केला.

आम्ही कधी तुमच्या कुटुंबीयांच्या भानगडी काढण्याचा प्रयत्न केलाय?: मुख्यमंत्री

‘प्रविण दरेकरांचा जामीन अर्ज जरी फेटाळला असला तरी त्यांना 29 तारखेपर्यंत अटकेपासून संरक्षण देण्यात आलं आहे. उच्च न्यायालयात जाण्याकरिता त्यांना परवानगी देण्यात आली आहे. आम्ही उच्च न्यायालयात लढू. आम्हाला विश्वास आहे की, अशाप्रकारे आमच्या नेत्यांना चुकीच्या केसेसमध्ये अडकवल्यानंतर आज नाही तर उद्या आम्हाला न्याय निश्चित मिळेल.’ असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT