सिल्व्हर ओक हल्ला प्रकरण : कॅमेरे पोहचले , मग पोलीस काय करत होते? -फडणवीस

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानावर हल्ला करण्यात आला. त्या ठिकाणी कॅमेरे पोहचले होते तरीही पोलिसांना कळलं नाही. पोलिसांना या आंदोलनाची कल्पना नसणं हे पोलिसाचं अपयश आहे अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. तसंच या घटनेचा तीव्र निषेधही नोंदवला आहे. माध्यमांचे कॅमेरामन त्या ठिकाणी पोहचले, मात्र पोलीस उशिरा पोहचले. याचं कारण काय? असा सवाल सिल्व्हर ओकवर झालेल्या आंदोलनानंतर देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.

शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत, त्यांच्या निवासस्थानी झालेल्या आंदोलनाचं दृश्य आपण सगळ्यांनी पाहिलं. ते दृश्य अतिशय भयावह होतं. त्यामुळे चौकशी झाली पाहिजे, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. एवढंच नाही तर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी हल्ल्याचे सूत्रधार नागपुरात बसले आहेत असा आरोप केला होता. याबाबत विचारलं असता अशा लोकांच्या आरोपांना आपण उत्तर देत नाही असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

अजित पवार काय म्हणाले?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

सिल्व्हर ओकवर मीडिया पोहचला त्यांनी हल्ला कसा झाला ते दाखवलं. मीडियाचं ते कामच आहे मात्र जे मीडियाला कळलं ते पोलिसांना कसं कळलं नाही? असा प्रश्न अजित पवार यांनी विचारला आहे. अजित पवार म्हणाले की पोलीस विभाग मागे कोण सूत्रधार आहे त्याचा शोध घेतील. एसटी कर्मचाऱ्यांची माथी भडकवण्यात आली होती. त्यामागे कोण आहे याचा शोध पोलीस घेत आहेत. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आहे. आम्ही आंदोलकांसोबत आणि संघटनांसोबतही अनेकदा बैठका घेतल्या आहेत. एसटी कर्मचारी संघटनांचं देखील ऐकत नाही आहेत. त्यांनी तारतम्य सोडलं, जी भाषा वापरण्यात आली ती आपल्या संस्कृतीत बसत नाही. पोलीस यंत्रणा याचा तपास करुन यामागे कोण मास्टरमाईंड आहे याचा शोध घेतील.’

नेमकं काय घडलं?

ADVERTISEMENT

आझाद मैदानावर आंदोलनासाठी बसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानाबाहेर आंदोलन केलं. यावेळी दगडफेक आणि चप्पलफेकही करण्यात आली. मोठा गदारोळही पाहण्यास मिळाला. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनानंतर तणाव निर्माण झाल्याचं चित्र होतं. मात्र सुप्रिया सुळे पुढे आल्या आणि त्यांनी सगळी परिस्थिती हाताळली. तसंच जितेंद्र आव्हाड यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया देत सगळ्या कार्यकर्त्यांना शांततेचं आवाहन केलं आहे. या आंदोलनानंतर आंदोलकांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातही ठिय्या दिला मात्र त्यांना तिथून बाहेर काढण्यात आलं आहे. आता अजित पवार यांची या प्रकरणी प्रतिक्रिया समोर आली असून पोलीस कुठे तरी कमी पडले असं त्यांनी म्हटलं आहे. या सगळ्याला आता गृहमंत्री दिलीप वळसे पाटील कसं उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT