अमित शाहांना फोन, उद्धव ठाकरेंचा उल्लेख; ९ तासांच्या चौकशीनंतर राणेंचे गंभीर आरोप
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांची मालवणी पोलिसांकडून तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली. ९ तासांनंतर बाहेर पडलेल्या राणेंनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले. त्याचबरोबर अमित शाह यांना फोन केल्यानंतर आम्हाला बाहेर सोडण्यात आल्याचं म्हटलं […]
ADVERTISEMENT
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आमदार नितेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. या प्रकरणी नारायण राणे आणि नितेश राणे यांची मालवणी पोलिसांकडून तब्बल ९ तास चौकशी करण्यात आली. ९ तासांनंतर बाहेर पडलेल्या राणेंनी मुख्यमंत्र्यांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले. त्याचबरोबर अमित शाह यांना फोन केल्यानंतर आम्हाला बाहेर सोडण्यात आल्याचं म्हटलं आहे.
पोलीस ठाण्यात ९ तास काय घडलं?
चौकशीनंतर राणेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पोलिस ठाण्यातील घटनाक्रमाबद्दल माहिती दिली. राणे म्हणाले, “मला दोन दिवसांपूर्वी मालवणी पोलीस ठाण्यामधून 41 A ची नोटीस आली होती. आपण आपलं म्हणणं मांडण्यासाठी पोलीस स्टेशनला यावं, अशी ती नोटीस होती. त्यामध्ये असं म्हटलं होतं की, दिशा सालियनच्या आईने तक्रार केल्यामुळे तुम्हाला तुमचं म्हणणं मांडण्यासाठी बोलावलं आहे.”
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
पोलीस सतावतात… राणेंच्या वकीलांनी काय केले आरोप?
“दिशा सालियानबद्दल मी आणि नितेश पत्रकार परिषदेत बोललो होतो की, तिचे खरे आरोपी पकडले पाहिजेत. तिने आत्महत्या केली नसून, ती हत्या आहे, हे आम्ही वारंवार बोलत होतो. त्यामुळे दिशाच्या आईकडे मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर गेल्या. त्यांना तक्रार करायला प्रवृत्त केलं आणि तक्रार दिली. दिशा सालियानला न्याय मिळावी ही मागणी आमची असताना, आई म्हणते की, राणे पिता-पुत्राने मांडलेल्या मुद्यांमुळे माझी बदनामी होतेय. अशी खोट तक्रार पोलिसांना दिली. पोलीस स्टेशनने ती केस घेतली आणि आम्हाला बसवलं. मागील ९ तास आम्ही पोलीस स्टेशनमध्ये होतो,” असं राणे म्हणाले.
ADVERTISEMENT
“मी वारंवार सांगतोय की, मी केंद्रीय मंत्री आहे. नितेश राणे आमदार आहेत. आम्हाला अधिकार आहे कुणावर अन्याय होत असेल, न्याय्य मागणी करण्याचा. दिशा सालियानवर अन्याय झाला. तिला न्याय मिळावा, अशी आमची मागणी असातनाही आमच्यावर केस करण्यात आली. आम्ही अटकपूर्व जामीन घेतलेला आहे; पण याबाबत मात्र आम्ही शेवटपर्यंत जाणार. शेवटी मी गृहमंत्री अमित शाह यांना फोन केला आणि त्यानंतर आमचे जबाब पूर्ण झाल्यानंतर बाहेर सोडलं”, असं राणे म्हणाले.
ADVERTISEMENT
“सुरुवातीपासून जे काही घडलं, ते सगळं मी माझ्या जबाबात सांगितलं आहे. एवढंच नाही, दिशा सालियानची ८ जून आणि सुशांतची १३ जून रोजी हत्या झाल्यानंतर मला मुख्यमंत्र्यांचा (उद्धव ठाकरे) दोन वेळा फोन आला. ‘आपण सुशांत आणि दिशाच्या केस बद्दल बोलू नका. एक मंत्र्याची गाडी होती, असं बोलू नका,’ असं ते म्हणाले. यावर मी म्हणालो की असं का बोलायचं नाही? आम्ही लोक प्रतिनिधी आहोत. ते म्हणाले ‘तुम्हाला देखील मुलं आहेत. तुम्ही असं काही करू नका.’ मात्र हे वाक्य माझ्या जबाबातून वगळलेलं आहे. मी वारंवार सांगतोय की ते वाक्य टाका परंतु ते वगळलं आहे. याचाच अर्थ ही आजची केस राजकीय हेतून प्रेरित आहे. आमच्यावर मुद्दाम दबाव टाकण्याच प्रयत्न करत आहेत, पण याचा आमच्यावर काही परिणाम होणार नाही”, असा धक्कादायक खुलासा राणेंनी केला.
“जर कुणावर अन्याय होणार असेल, तर अन्यायाविरोधात आम्ही आवाज उठवणारच. आमच्या आयुष्यातील पाच-दहा तास घेतले म्हणजे फार काय मिळवलं असं होत नाही. आम्ही दिशा सालियन आणि सुशांतच्या हत्येबद्दल जिथे संधी आहे, तिथे आवाज उठवणार. दिशा सालियनची माझ्या माहितीप्रमाणे केस बंद करण्यात येत आहे. अन्याय केला आणि ज्या लोकानी अत्याचार केला. त्यांना हे सरकार संरक्षण देत आहे. याच्याविरोधात आम्ही आवाज उठवत राहणार,” असा इशारा राणे यांनी दिला आहे.
ADVERTISEMENT