अक्कू यादव प्रकरणात नक्षलवादी मिलिंद तेलतुंबडेच्या नावाची चर्चा? नेमकं काय आहे प्रकरण

भाग्यश्री राऊत

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

तारीख होती १३ ऑगस्ट २००४…आरोपीला कोर्टात आणलं जाणार हे सर्व महिलांना माहिती झालं. कोर्ट परिसरात महिलांची गर्दी झाली…आरोपी पोलिस व्हॅनमधून उतरला, त्याच्यासोबत दोन पोलिसही होते. यावेळीही त्यानं परिसरातील एका महिलेला शिवी घातली. त्यामुळे महिला परत पेटून उठल्या. पोलिसांनी कसंतरी कोर्ट नंबर ७ मध्ये आरोपीला नेलं. पण, महिलांनी त्याला तिथंही मारहाण केली. त्याच्या अंगावर मिरची पूड टाकली. इतकंच नाहीतर एका महिलेनं त्याचा प्रायव्हेट पार्टही कापला. जवळपास २०० महिलांनी त्या आरोपीला कोर्टातच ठार केलं होतं. तो गुंड आरोपी होता अक्कू यादव…

जगाला हादरवणारी घटना घडली होती नागपूरमध्ये

अख्ख्या जगाला हादरवणारी घटना घडली होती ती आपल्याच महाराष्ट्राची उपराजधानी नागपुरात…पण, आज ही चर्चा करण्याचं कारण म्हणजे सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवरील एका वेब सिरीजमध्ये हे अक्कू यादव प्रकरण दाखवलंय. त्यानंतर आता याच अक्कू यादव प्रकरणात मिलिंद तेलतुंबडे, जो देशातील सर्वात मोठा नक्षलवादी होता, त्याचं नाव असल्याचा दावा केला जातोय. तर मिलिंद तेलतुंबडेच्या नावाची चर्चा का सुरू झाली? अक्कू यादव प्रकरणात त्याचा हात होता का? हे आपण जाणून घेणार आहोत.

नेमकं अक्कू यादव प्रकरण काय?

भरत कालीचरण उर्फ अक्कू यादव…नागपूरच्या कस्तुरबा नगर झोपडपट्टीतला एक गुंड…९० च्या दशकात कस्तुरबा नगरात त्यानं दहशत माजवली होती. १९९१ मध्ये पहिल्यांदा सामूहिक बलात्कारात त्याचं नाव पुढे आलं….त्याच्यावर खून, दरोडा, खंडणी, घरावर हल्ला, हल्ल्याची धमकी असे कितीतरी गुन्हे दाखल होते. त्याच्या या कृत्याविरोधात कोणी पोलिसांमध्ये जाण्याचा प्रयत्न केला, तर त्यांना तो धमकावत होता. त्यानं वस्तीतील महिलांवर बलात्कार केले होते. यामध्ये १० वर्षांच्या चिमुकलीपासून ते वृद्ध महिलेपर्यंतचा समावेश होता. तो इतका क्रूर होता, की एखाद्या महिलेवर बलात्कार केल्यानंतर तिची हत्या करायचा. त्यामुळे कस्तुरबा नगर झोपडपट्टीत त्याची दहशत पसरली होती. त्याच्या भीतीमुळे मुली-महिला घरात लपून बसायच्या… एकदा त्यानं अंजनाबाई बोरकर यांची मुलगी आशाबाई यांच्यावर बलात्कार केला. इतकंच नाहीतर तिचे अवयव देखील कापले.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

एका महिलेचं तिच्या नवऱ्यासमोर केलं होतं अपहरण

एका महिलेचं तिच्या नवऱ्याच्या समोर घरातून अपहरण केलं. तिच्या नवऱ्यावर चाकूनं हल्ला केला. त्यानंतर तिला अज्ञात स्थळी नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्याने एका नववधूवर, एका बाळांतीण महिलेवरही बलात्कार केला होता. त्यानंतर त्या बाळंतीण महिलेनं स्वतःला रॉकेल ओतून पेटवून दिलं…त्याच्या या दहशतीमुळे कोणी त्याच्याविरोधात बोलण्याची हिम्मत करत नव्हता. त्यामुळे त्याची ही घाणेरडी कृत्य सुरूच होती. पण, ३० जुलै २००४ चा दिवस उजाडला आणि अक्कू यादवचे वाईट दिवस सुरू झाले. कस्तुरबा नगर झोपडपट्टीतल्या उषा नारायणे या सुशिक्षित तरुणीनं त्याच्याविरोधात आवाज उठवला. उषा ही एकटी महिला त्याच्याविरोधात लढू शकते, तर आम्ही का नाही? असा विचार करत वस्तीतले लोकही तिच्या सोबत उभे राहिले. लोकांनी अक्कूचं घर जाळलं. जमावाचा संताप पाहून अक्कू स्वतःचा बचाव व्हावा यासाठी त्यानं स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केलं. त्याच्याविरोधात आधीच गुन्हा दाखल होता. त्याला ८ ऑग्स्टला एकदा न्यायालयात आणलं.

१३ ऑगस्टला अक्कूसंदर्भातली एक बातमी पसरली

१३ ऑगस्टला न्यायालयात हजर करून त्याला जामीन मिळणार असल्याची माहिती वाऱ्यासारखी कस्तुरबा नगर झोपडपट्टीत पसरली. अक्कूनं या वस्तीतल्या महिलांसोबत जी काही घाणेरडी कृत्य केली होती, त्यामुळे महिला संतापल्या होत्या. त्याला नागपुरातल्या सेशन कोर्टात आणलं. यावेळी कोर्ट परिसरात महिलांची गर्दी होती. अक्कू पोलिस व्हॅनमधून उतरताच त्यानं महिलांना शिव्या घातल्या आणि पुढच्या काही क्षणातच महिला त्याच्यावर तुटून पडल्या. पोलिसांनी कसंतरी त्याला कोर्ट नंबर ७ मध्ये नेलं. पण, महिलांचा संताप इतका जास्त होता, की त्यांनी कोर्टमध्ये घुसून त्याला मारलं. त्याच्या अंगावर मिरची पूड फेकली. त्याच्या नाका-तोंडात मिरच्या कोंबल्या. त्याच्या भाजी कापायच्या सुरीनं वार केले आणि एका महिलेनं त्याचा प्रायव्हेट पार्टही कापला. हे सर्व सुरू होतं, ते जिथं सुनावणी होणार होती त्याच कोर्टात…अखेर अक्कूचा मृत्यू झाला. जमावानं अक्कूला कोर्टात मारलं ही बातमी वाऱ्यासारखी पसरली.

ADVERTISEMENT

मोस्ट वॉन्टेड नक्षलवादी कमांडर मिलिंद तेलतुंबडे कोण?

ADVERTISEMENT

अक्कू यादव प्रकरणाची दखल आंतरराष्ट्रीय माध्यमांनीही घेतली

आंतरराष्ट्रीय माध्यमांनी या प्रकरणाची दखल घेतली. यावर अनेकांनी मत-मतांतरे मांडली.. सीआयडीनं या प्रकरणाचा तपास केला होता. त्यांनी अहवालात म्हटलं होतं, की ४ पुरुषांनी अक्कूचं मॉब लिंचिंग केलंय आणि या महिला त्या चार पुरुषांना वाचवण्याचा प्रयत्न करतायत. पण, या महिलांनी अहवालातील आरोप फेटाळून लावले. जवळपास २०० पेक्षा अधिक महिलांनी आम्ही अक्कूला मारलं, शिक्षा द्यायची तर आम्हाला द्या, असं कोर्टात सांगितलं. पुढे १० वर्ष हा खटला सुरू राहिला…शेवटी कोर्टानं पुराव्यांच्या अभावी २०१४ ला अक्कू यादव हत्याकांडातील आरोपींची सुटका केली.

मिलिंद तेलतुंबडेचं नाव अक्कू यादव प्रकरणात का समोर येतं आहे?

हे होतं अक्कू यादव प्रकरण…पण, या प्रकरणात मिलिंद तेलतुंबडे जो देशातील सर्वात मोठा नक्षलवादी होता त्याच्या नावाची चर्चा का सुरू झालीय? तर 14 नोव्हेंबर २०२१ म्हणजे बरोबर एक वर्षांपूर्वी गडचिरोलीत झालेल्या एन्काऊंटरमध्ये तब्बल २६ नक्षलवादी मारले गेले. यात मिलिंद तेलतुंबडेचा समावेश होता. या घटनेला एक वर्ष झाल्यानंतर आता सीपीआय (Maoist) जी बॅन झालेली संघटना आहे, त्यांनी एक बूकलेट प्रकाशित केलंय. यामध्ये अक्कू यादववरील वेब सिरीजचा रेफरन्स देत, माओवाद्यांनी दावा केलाय की, तेलतुंबडे हा समाजातील दुर्बल घटक, विशेषतः झोपडपट्टीतील महिलांना त्यांच्या हक्कांसाठी, सुरक्षेसाठी लढायचं शिकवायचा…अक्कू यादवसारख्या बलात्काऱ्याचा खून करण्यासाठी कस्तुरबा नगर झोपडपट्टीतील महिलांना तेलतुंबडेनं भडकावलं होतं, असाही दावा या बूकलेटमध्ये करण्यात आला होता. याबद्दल टाइम्स ऑफ इंडियानं वृत्त दिलंय.

इतकंच नाहीतर २००६ मधील खैरलांजी प्रकरणात झालेल्या आंदोलनात तेलतुंबडेची प्रमुख भूमिका होती, असाही दावा या बूकलेटमध्ये करण्यात आलाय. अर्थात हे सर्व दावे आहेत…अक्कू यादव प्रकरण २०१४ ला पुराव्यांअभावी बंद झालंय. पण, आता नेटफ्लिक्सवरील ‘इंडियन प्रेडिटर- मर्डर इन अ कोर्टरुम’ या वेब सिरीजवरून हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT