महाराष्ट्रीय संशोधक! विंचू दंशावर इंजेक्शन शोधून हजारो माणसांना दिलं जीवदान

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

वैद्यकिय पेशामध्ये मोठ्या शहरात चांगले उत्पन्न आहे मात्र या पैशाच्या मागे न जाता रायगड जिल्ह्यातील महाड सारख्या ग्रामिण भागात रुग्ण सेवा देणाऱ्या डॉक्टर हिम्मतराव बावस्कर यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.  कोकणात विंचूदंशाचे प्रमाण मोठे आहे.  योग्य उपचार पद्धती उपलब्ध नसल्यामुळे विंचूदंशामुळे मृत्युचे प्रमाण मोठे होते.  यावर यशस्वी उपचार पद्धती शोधुन विंचूदंशामुळे होणाऱ्या मृत्युचे प्रमाण कमी करण्याचे काम डॉ. बावस्कर यांनी केले. 

त्यांच्या या संशोधनामुळे त्यांचे जगभरातुन कौतुक केले गेले.  त्यांनी केलेल्या या ग्रामिण भागातील कामाची दखल घेत त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.  हा पुरस्कार महाडकर आणि रुग्णांनी दाखवलेल्या विश्वासाला मिळालेला सन्मान असल्याचे डॉ. बावस्कर यांचे म्हणणे आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात देहेड या खेडेगावात अत्यंत गरीब कुटुंबात जन्मलेले डॉ. हिम्मतराव यांनी लाकूडतोड, हॉटेलात कपबशा धुणे यांसह अनेक प्रकारचे कष्ट करून शालेय शिक्षण पूर्ण केले. इंटरसायन्समधील यशानंतर त्यांनी नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. या शिक्षणात प्रा. के. डी. शर्मा यांनी दिलेला ‘पॅथॉलॉजी इज द मदर ऑफ मेडिकल सायन्स’ हा गुरूमंत्र हिम्मतराव कोळून प्यायले. रोगाच्या मुळाशी जाऊन नोंदींच्या दस्तावेजीकरणावर त्यांनी भर दिला.

महाडजवळच्या घनदाट अरण्यातील बिरवाडीच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात 1976 च्या सुमारास डॉक्टरांची नियुक्ती झाली. तेव्हापासून सरकारी दवाखान्यातील सेवेचा वस्तूपाठच त्यांनी घालून दिला. खासगी किंवा पैसे घेऊन सेवेला थारा दिला नाही. या भागात विंचूदंशामुळे लोक दगावताहेत, हे समजल्यावर त्यांनी त्यांची कारणे, त्याचे परिणाम यांचा सखोल अभ्यास केला. डोळ्यादेखत हृदय पिळवटून टाकणारे मृत्यू ते पाहत होते. 76-77 या काळातील 20 केसेसचा अहवाल त्यांनी तयार केला व तो हाफकिन, जेजे येथील तज्ज्ञांना दाखवला. हिम्मतरावांच्या नोंदींच्या पुराव्यासह 1978 मध्ये सर्वप्रथम ‘लॅन्सेट’ या लंडनच्या प्रतिष्ठित वैद्यकीय नियतकालिकात एक अहवाल प्रसिद्ध तर झाला, परंतु त्यात डॉ. बावस्करांना तिसरे स्थान होते. त्यानंतर मात्र त्यांनी विंचूदंशाच्या 51 प्रकरणांचा अभ्यास करून स्वतः अडीच पानी शोधनिबंध तयार केला. लॅन्सेटने तो प्रकाशित केला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

यानंतर औंध येथे राहून त्यांनी एमडी केले व त्यादरम्यान विंचूदंशाची पार्श्वभूमी डोळ्यापुढे ठेवून वैद्यकीय संदर्भग्रंथांचे वाचन केले. विंचूदंशावर परिणामकारक औषध कोणते, यावर त्यांनी विचार केला. सोडिअम नायट्रोप्रूसाइडचे द्रव्य इंजेक्शनद्वारे प्रभावी ठरेल, असे त्यांनी निश्चित केले. दरम्यान डॉ. प्रमोदिनी यांच्याशी विवाहबद्ध होऊन डॉ. बावस्कर दाम्पत्य रायगड जिल्ह्यातल्याच पोलादपूर येथे 1982 मध्ये गोरगरीबांच्या रुग्णसेवेत रुजू झाले. त्याच काळात प्रथम आठ वर्षांच्या रुग्णाला विंचूदंशावर हे इंजेक्शन लागू पडले. मात्र ते प्राथमिक आरोग्यकेंद्रात देणे जोखमीचे होते. तेव्हा याला पर्याय म्हणून तोंडावाटे घ्यावयाच्या प्राझोसीन या औषधाच्या वापराचा शोध त्यांना लागला. हा उपचार प्रभावी ठरल्याचा डॉ. हिम्मतरावांचा प्रबंध 1986 साली लॅन्सेटमध्ये प्रसिद्ध झाला. या उपचारांची महता इतकी की कोकण, कर्नाटक, आंध्र प्रदेश, पुद्दूचेरी, गुजराथ या भागातील विंचूदंशाने होणारे मृत्यूचे प्रमाण 40 टक्क्यांवरून एक टक्क्याखाली आले.

1993 मध्ये याच संशोधनाचे सादरीकरण करण्यासाठी सीबा फाऊन्डेशनने हिम्मतरावांना लंडनमध्ये निमंत्रित केले. 2011 मध्ये प्राझोसिन आणि प्रतिलस यांच्या परिणामकारकतेविषयी त्यांचा प्रबंध ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झाला. फुरसे, कांबळ्या, मण्यार, कोब्रा (नाग) या विषारी सापांच्या दंशातून होणारा वेगवेगळा परिणाम व त्यावरची स्वतंत्र उपचारपद्धती याचा त्यांनी अभ्यास केला. सर्पदंशावरील प्रतिलस कशी द्यावी, कोणते औषध देऊ नये, याचे मार्गदर्शन केले. त्याविषयी ‘रॉयल सोसायटी ऑफ लंडन’च्या जर्नलमध्ये त्यांचा प्रबंधही प्रकाशित झाला.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT