कोश्यारी यांना राज्यपाल म्हणायचे की…; संजय राऊतांच्या अटकेनंतर ‘सामना’त काय म्हटलंय?
शिवसेना नेते, मुख्य प्रवक्ते आणि खासदार असलेल्या संजय राऊत यांना अटक झाली. ३१ जुलै रोजी दिवसभर चौकशी केल्यानंतर मध्यरात्री ईडीने संजय राऊत यांना अटक केली. संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजप आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्ला चढवला. संजय राऊत अटक : भगतसिंह कोश्यारी यांच्यावर शिवसेनेची टीका “राज्यपाल हे एक घटनात्मक आणि […]
ADVERTISEMENT

शिवसेना नेते, मुख्य प्रवक्ते आणि खासदार असलेल्या संजय राऊत यांना अटक झाली. ३१ जुलै रोजी दिवसभर चौकशी केल्यानंतर मध्यरात्री ईडीने संजय राऊत यांना अटक केली. संजय राऊत यांच्या अटकेनंतर आता शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भाजप आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर हल्ला चढवला.
संजय राऊत अटक : भगतसिंह कोश्यारी यांच्यावर शिवसेनेची टीका
“राज्यपाल हे एक घटनात्मक आणि प्रतिष्ठेचे पद आहे. अनेक राज्यपालांनी या पदाची प्रतिष्ठा राखत काम केले. महाराष्ट्राचे सध्याचे राज्यपाल मात्र यास अपवाद ठरले आहेत. गेल्या साधारण तीनेक वर्षांपासून भगतसिंह कोश्यारी महाराष्ट्राच्या राजभवनात आहेत. या काळात त्यांनी महाराष्ट्र सेवेपेक्षा भाजप सेवाच जास्त केली, पण शुक्रवारी तर त्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर, अस्मितेवरच घाव घातला,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
“महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी दोन दिवसांपूर्वी मराठी माणूस व महाराष्ट्राचा अपमान केला. महाराष्ट्रात त्या विधानावरून संतापाचा भडका उडाला. तो भडका व रोष कायम असतानाच शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ‘ईडी’ने रविवारी पहाटे धाडी टाकून राज्यपालांच्या भीषण वक्तव्यावरून लक्ष हटविण्याचा प्रयत्न केला. हे अपेक्षित होतेच. राज्यपालांनी महाराष्ट्राचा अपमान केल्याच्या वक्तव्यावर पाणी ओतण्यासाठी महाराष्ट्रात अशा कारवाया सुरू केल्या तरी लोकांच्या मनातील भडका विझणार नाही.”
संजय राऊतांच्या अटकेबद्दल सामनात काय म्हटलंय?
“संजय राऊत यांनी राज्यपालांच्या विधानाचा प्रखर शब्दांत शनिवारी समाचार घेतला व रविवारी सकाळी त्यांच्या घरी ‘ईडी’ची पथके पोहोचली. लोक काय ते समजून गेले. भाजप प्रत्येक गोष्ट पैसा, संपत्ती, व्यापारातच तोलतो. त्यामुळे त्यांना रक्त, घाम, अश्रूंचे मोल नाही. हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य लढ्यात भाजप विचारांच्या लोकांचा सहभाग नव्हता. त्याचप्रमाणे मुंबईसह महाराष्ट्राच्या लढ्यातही भाजप परिवार कोठेच नसल्याने त्यांना मराठी अस्मिता कशाशी खातात ते माहीत नाही,” अशी टीका शिवसेनेनं केली आहे.
“मुंबईतील धनिक मंडळ हेच त्यांचे सर्वस्व आहे. बेळगावसह मराठी सीमा भागाविषयी त्यांना आस्था नाही. महाराष्ट्राचे दोन-तीन तुकडे पडले तरी भाजपचे मन अस्वस्थ होणार नाही. हा त्यांचा स्वभावधर्म, गुणधर्म आहे. त्यामुळे ‘‘राज्यपाल महोदयांच्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही,’’ असे थातूरमातूर शाब्दिक बुडबुडे त्यांनी हवेत सोडले आणि आपल्या तकलादू महाराष्ट्र निष्ठेचे पुन्हा एकदा प्रदर्शन घडविले.”