ही बाब मोदी सरकारला, भाजपला गंभीर वाटू नये?; शिवसेनेनं मोदींवर डागलं टीकास्त्र

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

रक्तरंजित लष्करी संघर्ष झालेली गलवान व्हॅली पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या चर्चेला कारण ठरलं आहे एक घटना. एक व्हिडीओ चीनमधून प्रसिद्ध करण्यात आला आहे. चिनी सैन्याने गलवान व्हॅलीत राष्ट्रध्वज फडकवाल्याचं दिसत असून, त्यावरून मोदी सरकार टीकेचं धनी ठरलं आहे. शिवसेनेनंही यावरून पंतप्रधान मोदी आणि भाजपवर टीकेचे बाण डागले आहेत. उत्तर प्रदेशातील एका अत्तर व्यापाऱ्याकडे आयकर विभागाने धाडी घालून शे-दोनशे कोटी रुपये पकडले. त्यावर पंतप्रधान व त्यांचे सहकारी जाहीर सभांतून भाषणे ठोकतात, पण गलवान व्हॅलीत चिन्यांनी झेंडा फडकविला यावर बोलत नाहीत,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

गलवान व्हॅलीत चिनी सैन्याने राष्ट्रध्वज फडकावल्याच्या घटनेवर शिवसेनेनं सामना अग्रलेखातून भूमिका मांडली आहे. “पंतप्रधान मोदींसह त्यांचे अर्धे मंत्रिमंडळ नेहमीप्रमाणेच विधानसभा निवडणुकांच्या प्रचारात दंग झाले आहे. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांतील निवडणुका जिंकून भाजपचा झेंडा फडकवायचा यासाठी मोदी व त्यांच्या कॅबिनेटने शर्थ चालवली आहे, पण याच काळात पूर्व लडाखजवळील गलवान व्हॅलीत लाल चिनी घुसले असून नववर्षदिनी चिन्यांनी त्यांचा राष्ट्रध्वज गलवान खोऱ्यात फडकवून भारताच्या सार्वभौमत्वास आव्हान दिले आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“गलवान व्हॅलीत घुसून चिन्यांनी सैनिकी संचलन केले. ध्वज फडकविला, त्यांचे राष्ट्रगीत गायले. व्हॅलीत फलकही लावले की, ‘आम्ही आमची एक इंच भूमीही सोडणार नाही.’ हे सरळ सरळ आव्हान आणि चिथावणीच आहे. पंतप्रधान मोदी किंवा त्यांच्या सरकारातील प्रमुख लोकांनी चिन्यांच्या या घुसखोरीवर साधे शाब्दिक आक्रमणही केले नाही. भाजपच्या आय.टी., सायबर फौजाही या प्रश्नी शरणागतीचे पांढरे निशाण फडकवून बसल्या आहेत. गलवान व्हॅलीत चिनी घुसले व त्यांनी त्यांचा झेंडा फडकविला ही बाब मोदी सरकारला, भारतीय जनता पक्षाला गंभीर वाटू नये?”, असा सवालही शिवसेनेनं भाजपला केला आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

“5 मे 2020 रोजी याच व्हॅलीत आपल्या सैनिकांची चिन्यांबरोबर रक्तरंजित झटापट झाली होती. त्यात आमचे वीसेक सैनिक शहीद झाले. गलवान व्हॅली हिंदुस्थानी सैनिकांच्या रक्ताने भिजली. त्या सर्व शहीद सैनिकांच्या शौर्याचा सन्मान भारत सरकारने केला, पण वर्षभरातच चिनी सैनिक त्याच प्रदेशात आक्रमण करून घुसले व देशाच्या राजधानीत साधी सळसळही झाली नाही. उत्तर प्रदेशातील एका अत्तर व्यापाऱ्याकडे आयकर विभागाने धाडी घालून शे-दोनशे कोटी रुपये पकडले. त्यावर पंतप्रधान व त्यांचे सहकारी जाहीर सभांतून भाषणे ठोकतात, पण गलवान व्हॅलीत चिन्यांनी झेंडा फडकविला यावर बोलत नाहीत,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

“पंतप्रधान व त्यांचे सहकारी विरोधकांना संपविण्याची व पराभूत करण्याची भाषा जोरकसपणे करतात, पण घुसलेल्या चिन्यांचे ते नाव घेत नाहीत. चिन्यांना धडा शिकवायचे ते बोलत नाहीत. राजकीय विरोधकांचे काय करायचे ते नंतर पाहता येईल, पण चीनसारख्या देशाच्या दुष्मनांकडे आधी पाहायला हवे. चीनची घुसखोरी लडाखच्या गलवान व्हॅलीपुरतीच मर्यादित नाही. अरुणाचल, उत्तराखंड, सिक्कीम प्रांतातही चीन घुसखोरी करीत आहे.”

ADVERTISEMENT

“अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांची नावे चीनच्या नकाशावर परस्पर बदलून चिन्यांनी आपली कळ काढली आहे, पण पाकड्यांची कळ जेवढी जोरात लागते तेवढी चिन्यांची लागत नाही. याचे कारण असे की, पाकिस्तानशी संघर्ष केला की भारतात निवडणुकीच्या तोंडावर हिंदू-मुसलमान असा झगडा पेटवता येतो. दुसरे म्हणजे पाकिस्तान हा एक कमजोर, तितकाच विस्कळीत देश आहे. त्यामुळे पाकड्यांना दम भरणे, डोळे वटारणे, एखादा सर्जिकल स्टाईक करून शौर्य गाजविण्याचा आव आणणे सोपे असते. चीनच्या बाबतीत ते सोपे नाही”, असा टोला शिवसेनेनं मोदी आणि भाजपला लगावला आहे.

ADVERTISEMENT

“चीन ही एक स्वयंभू महासत्ता आहे. रशिया, अमेरिकेपेक्षा ती चार पावले पुढे आहे. आशिया खंडातील अनेक राष्ट्रे चीनने आर्थिक व लष्करी बळाने गिळली आहेत. त्यामुळे चीनने कितीही घुसखोरी केली तरी लालभाईंच्या बाबतीत भारत संयम आणि सबुरीनेच घेणार आहे. चीनने आपल्या वीस सैनिकांचे बळी घेतले तरी उद्या पुन्हा एकदा चीनचे राष्ट्राध्यक्ष अहमदाबादेत येऊन आमच्या पंतप्रधानांबरोबर झोपाळ्यावर झुलताना व फाफडा, ढोकळा खाताना दिसतील; कारण चीन हे एक सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य आर्थिक तसेच लष्करी आहे”, असा चिमटा मोदींना काढला आहे.

“चीनचे किमान 20 टक्के आर्थिक सामर्थ्य भारताच्या व्यापारावर अवलंबून आहे, पण चिनी व्यापारावर बंदी घालण्याची हिंमतही आमचे शूरवीर केंद्र सरकार दाखवू शकले नाही. विरोधी पक्षांच्या अर्थवाहिन्या बंद करण्यासाठी आमचे केंद्र सरकार जेवढे झपाटल्यासारखे काम करते तेवढे झपाटलेपण ते चीनची आर्थिक नाकेबंदी करताना दाखवीत नाही. हे गौडबंगाल नसून चीनसमोर टाकलेली नांगी आहे. कश्मीरात पाकड्यांच्या कारवाया चीनच्या पाठिंब्याने सुरू आहेत. नेपाळ व श्रीलंकेत चीनने पाय रोवले आहेत. चीनच्या कर्जामुळे श्रीलंका कंगाल झाली आहे व चीनपुढे गुडघे टेकून बसली आहे. पाकिस्तान व नेपाळला तर चीनने विकतच घेतले आहे.”

“अरुणाचल प्रदेशात, लडाखमध्ये चीनने हात-पाय पसरले. भारताच्या हद्दीत चीनने स्वतःची दळणवळण यंत्रणा निर्माण केली आहे. त्यावर एखादा सर्जिकल स्ट्राईक करण्याची हिंमत आपल्यात आज आहे काय? देशाचे पंतप्रधान, संरक्षणमंत्री व त्यांच्या सायबर फौजा समाज माध्यमांवर शौर्याच्या व लढण्याच्या तोफा उडवतात, पण प्रत्यक्षात गलवान व्हॅलीत चिन्यांनी त्यांचा झेंडा फडकविल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. घरात बाता व सीमेवर लाथा अशी आमची अवस्था चीनच्या बाबतीत दिसत आहे. हे चित्र धक्कादायक आहे”, असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“गलवान व्हॅलीत एक वर्षापूर्वी कर्नल संतोष बाबूसहित 20 हिंदुस्थानी जवानांना चिन्यांनी ठेचून मारले. तेव्हाही फक्त शब्दांच्याच फैरी झडल्या. आता तर त्याही बंद झाल्या. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांत ज्यांचा झेंडा फडकायचा तो फडकेल. सत्ता, दहशत, केंद्रीय तपास यंत्रणांची फौज हाती असल्यावर विजयाचे झेंडे सहज फडकविता येतात, पण गलवानमध्ये लाल चिन्यांचा झेंडा उतरवून तिरंगा कधी फडकविणार, यावर काय ते बोला!”, असं शिवसेनेनं मोदींसह भाजपला सुनावलं आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT