अमरावती: झेंडा काढल्याच्या वादावरुन दोन गटात तुफान दगडफेक, संचारबंदी लागू

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

धनंजय साबळे, अमरावती: अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात काल (17 एप्रिल) रात्री 9:30 वाजेच्या सुमारास दुल्ला गेट परिसरातील एक झेंडा काढल्याचा वादावरून दोन गटात हिंसाचार झाल्याची घटना घडली. यामुळे परिसरात बराच वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या घटनेची माहिती मिळताच प्रकरण अधिक चिघळू नये यासाठी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जमाव पांगविला.

यानंतर पोलिसांनी अचलपूर आणि परतवाडा येथील बंदोबस्त देखील वाढवला आहे. सध्या अचलपूर आणि परतवाडा या दोन्ही शहरात संचारबंदी (कलम 144) लागू करण्यात आली आहे. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी अतिरिक्त पोलीस कुमक सुद्धा बोलवण्यात आली आहे.

कुठल्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास न ठेवता नागरिकांनी विनाकारण बाहेर न निघण्याचे आवाहन पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. यादरम्यान दोन्ही गटात दगडफेक झाली असून काही वाहनांची तोडफोड सुद्धा झाली आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

दरम्यान, सध्या पोलिसांनी परिस्थितीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविले आहे. त्यामुळे कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये अचलपूर शहरामध्ये शांतता आहे. शहरात केवळ रस्त्यावर पोलीस असून नागरिकांना घराबाहेर न निघण्याचं आवाहन करण्यात आले आहे.

याप्रकरणी अमरावती ग्रामीणचे अतिरिक्त एसपी शशिकांत सातव यांनी माहिती दिली की, अचलपूर शहरात काल रात्री एक झेंडा काढण्याच्या वादातून 2 गटात वाद झाला होता. ज्यानंतर 16 लोकांना अटक करण्यात आलेली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून दोन्ही शहरांमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे.

ADVERTISEMENT

नेमकं काय घडलं अचलपूरमध्ये?

ADVERTISEMENT

अमरावतीच्या अचलपूर परतवाडा या शहरात काल झालेल्या हिंसाचारात आतापर्यंत तीन वेगवेगळे एफआयआर करून या घटनेत 23 आरोपींना अटक केली आहे. अजून शंभर ते दीडशे आरोपींचा शोध घेणे सुरू आहे. त्याकरिता ग्रामीण लोकल क्राईम ब्राँचच्या 3 व स्थानिक पोलीस स्टेशनच्या दोन टीम तयार करण्यात आल्या असून आरोपींचा शोध सध्या सुरू आहे.

दरम्यान, या घटनेत असलेले आरोपी कुठे लपून बसले आहेत त्यांचा शोध सोशल मीडियावर आलेल्या व्हिडिओ आणि सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून सुरू आहे.

अमरावती जिल्ह्यातील अचलपूर शहरात गेल्या दोन ते तीन दिवसापासून म्हणजे हनुमान जयंती पासूनच काही प्रमाणात घटना घडत आहेत. काल संध्याकाळच्या दरम्यान दुल्हा गेट जवळ जे पुरातत्त्व विभाग आहे त्या गेटवर अनधिकृतपणे झेंडा लावण्यात आला होता.

काही जणांनी आक्षेप घेत तो झेंडा काढून टाकला होता. त्यामुळेच तणाव निर्माण झाला आणि वाद एवढा विकोपाला गेला की त्या ठिकाणी दोन्ही गटातील लोकं एकमेकांसमोर येऊन ठाकले.

यावेळी तुफान दगडफेक झाली. त्यामुळे पोलिसांना हिंसाचार करणाऱ्यांना पांगविण्यासाठी काही प्रमाणात बळाचा वापर करावा लागला. वाढता तणाव पाहता पोलिसांनी काल रात्री पासूनच परतवाडा आणि अचलपूर शहरात संचारबंदी लागू केली.

सद्यस्थितीत याठिकाणी तणावपूर्ण शांतता असली तरी पोलिसांचा मोठा फौजफाटा याठिकाणी तैनात करण्यात आला आहे.

अमरावती ग्रामीण आणि अकोल्यातून काही पोलीस कुमक मागवून या ठिकाणी तैनात करण्यात आली आहे. या घटनेत तीन वेगवेगळे एफआयआर दाखल करण्यात आले असून या घटनेनंतर अमरावतीतील भाजपचे प्रवक्ते शिवराय कुलकर्णी आणि त्यांचे काही कार्यकर्ते हे घटनास्थळी जात असतानाच त्यांना चांदूर बाजार नाक्यावर पोलिसांनी ताब्यात घेतले. या घटनेसंदर्भात अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहनही पोलिसांनी केलं आहे

सध्या एसआरपीएफच्या तीन तुकड्या तसचे अमरावती शिवाय अकोला येथील 100 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी अचलपूर येथे पोलीस बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आले आहेत. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकिशोर मीणा यांनी दिली आहे.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT