Narayan Rane in Cabinet : महाराष्ट्रात शिवसेनेचा त्रास वाढणार का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मोदींच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात मानाचं स्थान मिळालं आहे ते नारायण राणे यांना. कारण मोदी जेव्हा सगळ्या भावी मंत्र्यांशी चर्चा करत होते तेव्हा पहिल्या रांगेत बसलेल्या नारायण राणे यांनी सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं. 2019 मध्ये नारायण राणे यांनी भाजपमध्ये त्यांचा पक्ष विलीन केला. त्यानंतर त्यांना खासदार म्हणून भाजपमध्ये पाठवण्यात आलं. आता नारायण राणे यांची वर्णी केंद्रीय मंत्रिमंडळात लागली आहे. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांचे क्रमांक एकचे शत्रू म्हणून नारायण राणे ओळखले जातात. नारायण राणे यांनी आत्तापर्यंत अनेकदा महाविकास आघाडी सरकारवर आणि सरकारच्या कामांवर ताशेरे ओढत टिकेचे बाण चालवले आहेत. त्याच नारायण राणेंना आता केंद्रीय मंत्रिपद मिळालं आहे. त्यामुळे काय घडू शकतं? वाचा सविस्तर.

नारायण राणे यांचा जन्म 20 एप्रिल 1952 रोजी झाला. मोठा जनाधार लाभलेल्या कोकणातल्या नेत्यांमध्ये नारायण राणे यांचा क्रमांक वरचा आहे. शिवसेनेच्या माध्यमातून ते राजकारणात सक्रिय झाले. आक्रमक आणि पक्षाशी कट्टर निष्ठा असलेले राणे यांच्यातले गुण बाळासाहेब ठाकरे यांनी बरोबर ओळखले होते. चेंबूर या ठिकाणी शाखाप्रमुख असलेले नारायण राणे 1985 मध्ये मुंबई महापालिकेच्या बेस्ट समितीचे अध्यक्ष झाले. त्यानंतर 1990 मध्ये कणकवली मालवण या मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार झाले. 1995 ला महाराष्ट्रात युतीची सत्ता आली त्यावेळी त्यांच्याकडे दुग्धविकास, पशू संवर्धन, मत्स्य व्यवसाय, खार जमिनी, उद्योग आणि पुनर्वसन खाती देण्यात आली होती. 1997 ला त्यांच्याकडे महसूल खातं देण्यात आलं. मनोहर जोशी हे तेव्हा मुख्यमंत्री होते. त्यांना 1998 मध्ये राजीनामा द्यावा लागला. ज्यानंतर 1998 ते 99 या वर्षभराच्या काळात नारायण राणे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनही आपली कारकीर्द गाजवली.

अत्यंत महत्त्वांकाक्षी असलेले राणे हे शाखाप्रमुखपदापासून ते मुख्यमंत्रीपदापर्यंत प्रगती करत गेले. मात्र उद्धव ठाकरे आणि नारायण राणे यांच्यातले संबंध बिघडण्यास त्याचवेळी म्हणजे 1999 मध्येच सुरूवात झाली होती. 2003 मध्ये उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी निवडलं गेलं. बाळासाहेब ठाकरे यांचा हा निर्णय नारायण राणेंना मुळीच आवडला नाही. राणे शिवसेनेत दुखावले गेले. आपल्या आत्मचरित्रातही नारायण राणे यांनी या गोष्टीचा उल्लेख केला आहे. 1999 मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार पाडण्यासाठी नारायण राणे यांनी खूप प्रयत्न केला होता पण उद्धव ठाकरेंनी त्यांना अपेक्षित साथ दिली नाही असंही नारायण राणेंनी म्हटलं आहे.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

1999 ते 2001 या काळात उद्धव ठाकरे यांनी सुभाष देसाई आणि मनोहर जोशी यांना हाताशी धरून नारायण राणेंना विरोधी पक्षनेते पदावरून दूर करण्याच्या हालचालीही सुरू केल्या. त्यामुळे नाराय राणे यांची शिवसेनेत घुसमट होऊ लागली. त्यानंतर 2005 मध्ये ते शिवसेनेतून आपल्या समर्थकांसह बाहेर पडले आणि त्यानंतर त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर नारायण राणे अस्वस्थच राहिले कारण त्यांना मुख्यमंत्री होण्याची महत्वाकांक्षा होती. ज्या विलासराव देशमुखांनी नारायण राणेंना काँग्रेसमधे आणलं त्यांच्या विरोधातच राणेंनी आघाडी उघडली. 2009 मध्येही जेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं तेव्हा राणेंना उद्योग खातं मिळालं. मात्र या वेळी सोनिया गांधी, अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर टीका करून राणेंनी हायकमांडची नाराजी ओढवून घेतली. असं असलं तरीही शिवसेनेसोबत आणि खास करून उद्धव ठाकरेंसोबत त्यांचं वैर कायमच राहिलं. 2014 मध्ये त्यांनी काँग्रेसलाही रामराम केला आणि स्वतःचा स्वाभिमानी पक्ष काढला. तर 2019 मध्ये त्यांनी आपला पक्ष भाजपमध्ये विलीन केला आणि भाजपवासी झाले. भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवलं आणि आता आज केंद्रीय मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला आहे. 2022 मध्ये मुंबई महापालिकेची निवडणूक होणार आहे. त्यावेळी नारायण राणे हे शिवसेनेवर तुटून पडणार यात शंका नाही. कारण महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्याची एकही संधी नारायण राणे यांनी सोडलेली नाही.

ADVERTISEMENT

2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने युती केली होती. मात्र निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर शिवसेनेने अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद हवंच ही मागणी लावून धरली होती. यामुळे अखेर भाजप आणि शिवसेना यांच्यात काडीमोड झाला आणि राज्यात महाविकास आघाडीचा प्रयोग झाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सोबत येत सरकार स्थापन केलं आणि भाजपला बाजूला सारलं. हा रागही नारायण राणेंच्या मनात आहे. कोरोना काळात सरकारने कसं चुकीचं व्यवस्थापन केलं. राज्यात मृत्यू किती वाढले. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात आदित्य ठाकरेंवर केलेले आरोप. अशा अनेक प्रसंगी नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. असे नारायण राणे हे आता केंद्रीय मंत्रिमंडळात गेले आहेत. त्यामुळे आता त्यांचं बळ आणखी वाढलं आहे. नारायण राणे यांनी भाजपमध्ये जाणं हे शिवसेनेला युती असताना पसंत नव्हतं. त्याचाही राग राणे यांच्या मनात आहेच आता नारायण राणे आणखी आक्रमकपणे शिवसेनेविरोधात भाष्य करतील. त्यामुळे शिवसेनेचा त्रास वाढणार आहे का तर त्याचं उत्तर हे आत्ता तरी हो असंच दिसतं आहे. शिवसेना आता या त्रासातून मार्ग कसा काढणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT