विश्वचषकात ऑस्ट्रेलियाला घरी पाठवणारी टीम इंडियाची वाघीण, कोण आहे जेमिमा?
Womens World Cup 2025: महिला क्रिकेट वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये जेमिमा रॉड्रिग्सने ऐतिहासिक शतक झळकवत ऑस्ट्रेलियालाला धूळ चारली. जाणून घ्या कोण आहे जेमिमा.
ADVERTISEMENT

नवी मुंबई: महिला क्रिकेट वर्ल्डकप २०२५ मध्ये भारताने ऑस्ट्रेलियाला पराभूत करून मोठा इतिहास रचला आहे. सेमीफायनमधील या सामन्यात 5 विकेट राखत भारतीय संघाने फायनलमध्ये धडक मारली आहे. या विजयाचे श्रेय भारतीय मधल्या फळीच्या धडाकेबाज फलंदाज जेमिमा रॉड्रिग्सला जाते. तिच्या करिअर-बेस्ट 123 धावांच्या शानदार शतकाने भारताने ऑस्ट्रेलियाला 5 विकेट्सने धोबीपछाड दिला. जेमिमा ही मुंबईची प्रतिभावान खेळाडू असून, तिच्या आक्रमक फलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाने ती भारतीय महिलांच्या क्रिकेट संघाचा अविभाज्य भाग झाली आहे. चला, जेमिमा रॉड्रिग्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
जेमिमा रॉड्रिग्सची पार्श्वभूमी आणि कुटुंब
जेमिमा रॉड्रिग्सचा जन्म 5 सप्टेंबर 2000 रोजी मुंबईच्या भांडूप येथे झाला. ती मंगलोरियन ख्रिश्चन कुटुंबातून आली असून, तिचे वडील इवान रॉड्रिग्स हे तिच्या शाळेतील ज्युनियर क्रिकेट कोच होते. इवान यांनी जेमिमाच्या शाळेत मुलींची क्रिकेट संघटना उभी केली, आणि तिच्या बालपणापासूनच त्यांनी तिचे प्रशिक्षण घेतले. जेमिमाने स्वतःला "माझे वडील माझे पहिले कोच आणि 'हिरो' आहेत" असे म्हटले आहे. तिची आई लॅव्हिटा रॉड्रिग्स तिच्या अभ्यास आणि क्रिकेट प्रशिक्षणाची जबाबदारी सांभाळतात, तर दोन भाऊ इनोक आणि एली हे तिचे बालपणीचे क्रिकेट साथीदार होते. जेमिमाने लहानपणापासूनच क्रिकेटसोबतच हॉकीतही रुची दाखवली आणि महाराष्ट्राच्या U-17 हॉकी संघासाठीही खेळली. तिच्या हॉकीमधील ताकदवान हातांनी क्रिकेटमधील पॉवर हिटिंगला मदत झाली, असे ती सांगते.
जेमिमाने मुंबईतील सेंट जोसेफ कॉन्व्हेंट हायस्कूलमधून शिक्षण घेतले आणि नंतर रिझवी कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्समध्ये उच्च शिक्षण घेतले. तिच्या कुटुंबातील खेळाविषयीच्या वातावरणामुळेच ती लहानपणापासूनच क्रिकेटकडे आकृष्ट झाली. तिचे वडील तिच्या यशाचे मुख्य श्रेय देतात, आणि जेमिमा तिच्या कुटुंबाला आपले सर्वांत मोठे प्रेरणास्थान मानते.
क्रिकेट कारकीर्द: लहानपणापासूनच चमक
जेमिमाने क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात अतिशय लहान वयात केली. २०१२-१३ हंगामात तिने U-19 क्रिकेटसाठी मुंबईकडून पदार्पण केले, जेव्हा तिचे वय केवळ १२.५ वर्षे होते. १३ वर्षांच्या वयातच तिला महाराष्ट्र U-19 संघात स्थान मिळाले. तिची आक्रमक फलंदाजी आणि ऑफ-स्पिन गोलंदाजीने लवकरच लक्ष वेधले. २०१७ मध्ये तिने घरगुती U-19 वनडे स्पर्धेत सौराष्ट्रविरुद्ध नाबाद द्विशतक केलं होतं, ज्यामुळे द्विशतक ठोकणारी ती स्मृती मंधनानंतर दुसरी भारतीय महिला खेळाडू ठरली होती. त्याच हंगामात U-19 क्रिकेटमध्ये तिने १००० हून अधिक धावा केल्या (सरासरी ११२.५६) आणि १९ विकेट्स घेतल्या होत्या.










