Nawab Vs Wankhede : नवाब मलिकांनी ऐकवली ऑडिओ क्लिप; समीर वानखेडेंवर केला गंभीर आरोप
राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका कथित ऑडिओ क्लिपचा हवाला देत समीर वानखेडे आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून जुना बदलण्याचा कारनामा सुरू असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला असून, माझ्यावर दबाब आणण्यासाठी जावयाच्या जामीनाला आव्हान दिलं असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे. नवाब मलिक यांनी रविवारी मुंबईत माध्यमांशी संवाद […]
ADVERTISEMENT

राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. एका कथित ऑडिओ क्लिपचा हवाला देत समीर वानखेडे आणि एनसीबीच्या अधिकाऱ्यांकडून जुना बदलण्याचा कारनामा सुरू असल्याचा गंभीर आरोप मलिक यांनी केला असून, माझ्यावर दबाब आणण्यासाठी जावयाच्या जामीनाला आव्हान दिलं असल्याचं मलिक यांनी म्हटलं आहे.
नवाब मलिक यांनी रविवारी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना मलिक म्हणाले, “गेल्या वर्षी 2 ऑक्टोबर म्हणजे आर्यन खान केसपासून एनसीबीकडून सुरू असलेला फर्जिवाड्याचा पर्दाफाश केला. आर्यन खान केसमधील केपी गोसावी, भानुषाली, कागदांवर सह्या घेणं, 25 कोटींची खंडणी या सगळं समोर आणलं आहे. त्यावर एनसीबीने चौकशीसाठी खात्यातंर्गत चौकशी समिती नेमली. एसआयटी नियुक्त करण्यात आली, त्याचं काय झालं अजून कुणाला माहिती नाही”, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला.
“एनसीबीचा बाबू नावाचा अधिकारी मॅडी नावाच्या एका पंचाला कॉल करतो. त्याचा ऑडिओ ऐकवला आहे. तो अधिकारी सांगतोय की या आणि मागच्या तारखेचा पंचनामा दुरूस्त करा. कार्यालयात अडचणीचं होईल. त्यामुळे तो अधिकारी त्याला बाहेर भेटून सह्या करू असं सांगतोय. मॅडी नावाचा पोरगा घाबरून वानखेडेंना कॉल करतो. वानखेडे सांगतात जा, काही घाबरण्याचं कारण नाही. फर्जिवाडा करून पंचनामा बदलण्याचा उद्योग एनसीबीच्या माध्यमातून सुरू आहे. कोऱ्या कागदावर सह्या घ्यायच्या हा घातक फर्जिवाडा आहे”, असा दावा मलिक यांनी केला आहे.
“आम्ही हे सगळं उघड केल्यानंतर एनसीबीचा अधिकारी अडचणीत येणार असल्याने मागचा पंचनामा दुरुस्त करण्याचा उद्योग या विभागाच्या माध्यमातून होत आहे. पीआर एजन्सींना ड्रग्ज पेडलर, स्मगलर्स पैसे पुरवत आहेत. त्यांच्या माध्यमातून बातम्या पेरण्याचा धंदा या एजन्सीने सुरू केला आहे. एनसीबीने फक्त समीर खानच्या विरोधात याचिका दाखल केली आहे. सगळ्या आरोपींच्या विरोधात का न्यायालयात गेले नाहीत. माझ्या मनात भिती निर्माण करण्यासाठी समीर खानच्या विरोधात न्यायालयात गेले आहात का?,” असा प्रश्न मलिक यांनी एनसीबीला केला आहे.