पंजाबमध्ये ‘आप’ जिंकली, कारण…; शरद पवारांचं निवडणूक निकालावर भाष्य
उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्ये भाजप सत्तेत येत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसला झटका बसला असून, आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं. मुंबईत माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “पाच […]
ADVERTISEMENT

उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूर आणि पंजाबमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचे निकाल आज जाहीर झाले. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा, मणिपूरमध्ये भाजप सत्तेत येत आहे. तर पंजाबमध्ये काँग्रेसला झटका बसला असून, आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. पाच राज्यातील निवडणुकीच्या निकालावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केलं.
मुंबईत माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, “पाच राज्यांची जी निवडणूक झाली, त्यामध्ये चार ठिकाणी भाजपची सत्ता होती. पंजाबमध्ये काँग्रेसची सत्ता होती. तिथे अतिशय वेगळं चित्र आज बघायला मिळत आहे. पंजाबमध्ये हा बदल भाजपसाठी अनुकूल नाही. हा बदल काँग्रेसला झटका देणारा आहे. अलिकडे तयार झालेला राजकीय पक्ष आणि त्यांनी दिल्लीमध्ये गेल्या दोन निवडणुकांमध्ये यश संपादन केलं. त्यांनी ज्या प्रकारचं प्रशासन दिलं, त्याला दिल्लीतील सर्वसामान्यांनी मान्यता दिलीये. पंजाब सीमेवरचं राज्य आहे. दिल्लीतील कामाचा लाभ ‘आप’ला पंजाबमध्ये झाल्याचं स्पष्ट दिसतं आहे. बाकीच्या राज्यांत लोकांनी जे सत्तेत आहेत. त्यांना समर्थन देण्याची भूमिका घेतली. पुन्हा भाजप सत्तेत आलेली आहे”, असं पवार म्हणाले.
Election Results 2022 Live Updates : पाच राज्यांमध्ये कोणता पक्ष आहे आघाडीवर?
“काँग्रेसची स्थिती पंजाबमध्ये चांगली होती. मात्र काही महिन्यांपूर्वी काँग्रेसने काही अंतर्गत निर्णय घेतले. मला वाटतं ते निर्णय पंजाबच्या जनतेनं स्वीकारले नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखालील सरकार होतं. त्यांना हटवण्यात आलं. अमरिंदर सिंह यांनी नंतर वेगळा पक्ष काढून दिल्लीत सत्तेत असलेल्या भाजपशी हातमिळवणी केली. तो निर्णय पंजाबच्या जनतेला आवडलेला नाही, असं दिसतंय. पंजाबमधील स्थिती वेगळी होती”, असं विश्लेषण पवारांनी निवडणूक निकालांचं केलं.
“दिल्लीत कृषी कायद्यासंदर्भात मोठं आंदोलन झालं होतं. या आंदोलनात सर्वाधिक शेतकरी पंजाब आणि हरियाणातील होते. शेतकऱ्यांच्या मनात जो राग होता. तो राग या निवडणुकीत दिसून आला. त्यामुळे पंजाबातील जनतेनं भाजपला हरवलं आणि काँग्रेसलाही हरवलं. नव्या पक्षाला संधी दिली. आता सत्ता आपच्या हाती दिली आहे.”
Goa Election Result 2022 LIVE Updates: विजयानंतर बाबूश मोन्सेरातांचं भाजपला धक्का देणारं विधान
“आपच्या दिल्लीतील सरकारबद्दलची सर्वसामान्यांची मतं जाणून घेतली. ती मतं केजरीवालांच्या पक्षाच्या बाजूची असतात. दिल्लीत झालेल्या निवडणुकीनंतर माझ्या निवासस्थानी जे कर्मचारी आहेत, त्यांना मी विचारलं की, मत कुणाला दिलं तर ते म्हणाले आपला दिलं. का दिलं तर त्यांनी सांगितलं की, आरोग्य, प्राथमिक शिक्षण आणि इतर प्रश्नांबद्दल त्यांनी काम केलं आणि म्हणून आम्ही त्यांना संधी दिली. त्यामुळे पंजाबच्या जनतेला आपला संधी द्यावी वाटली,” अशी भूमिका पवारांनी मांडली.
“देशात भाजप व्यतिरिक्त असलेल्या पक्षांची मोठी संख्या आहे. काही राज्यांत भाजपशी संबंधित नसलेले पक्ष काम करत आहेत. आता ससंदेच्या अधिवेशनावेळी आम्ही विरोधी पक्ष चर्चा करू आणि ठरवू,” अशी माहिती पवारांनी दिली.
शिवसेना-राष्ट्रवादीपेक्षा मतदारांची NOTA ला पसंती, गोव्यात आघाडीची खिचडी शिजलीच नाही
“मी आतापर्यंत कोणत्याही काँग्रेसच्या नेत्यासोबत चर्चा झालेली नाही. काँग्रेस महत्त्वाची पार्टी आहे. काँग्रेससोबत चर्चा केल्याशिवाय वा इतर पक्षांबद्दल चर्चा केल्याशिवाय बोलणं योग्य नाही,” असं पवार म्हणाले.