हात पसरून कुणाकडे पद मागावं असे आमचे संस्कार नाहीत, पंकजा मुंडे यांची नाराजी पुन्हा समोर

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

जका खान, प्रतिनिधी, बुलढाणा

बुलढाणा जिल्ह्यातील दुसरबीड या ठिकाणी माजी आमदार तोताराम कायंदे यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त पंकजा मुंडे आल्या होत्या. या कार्यक्रमात बोलत असताना त्यांच्या मनातली खदखद पुन्हा समोर आली. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना त्यांनी टोला लगावला आहे. त्यावरून त्यांच्या मनातली पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा सुरू झाली आहे.

काय म्हणाल्या पंकजा मुंडे?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

‘माझं विश्व माझे माता-पिता आहेत. माझं सर्वस्व जनता आहे. तुम्हाला मी दहा परिक्रमा करेन अजून कुठल्या परिक्रमेची मला आवश्यकता नाही. एखाद्या गरीब फाटक्या माणसाच्या पायावर डोकं ठेवून मी नतमस्तक होईन पण कुठल्याही पदासाठी कुणापुढे हात पसरण्याचे संस्कार आमच्या रक्तात नाहीत. एखादी संधी मिळाली नाही तर नाही. पण त्यामुळे लोकांच्या सेवेसाठी काम करण्याची संधी मात्र कधीही सोडणार नाही. गोपीनाथ मुंडे यांचे संस्कार माझ्यावर आहेत मी तुम्हाला कधीही अंतर देणार नाही.’

ADVERTISEMENT

याआधी काय घडलं होतं?

ADVERTISEMENT

जुलै महिन्यात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यावेळी प्रीतम मुंडे यांना केंद्रीय मंत्रिपद दिलं जाईल अशी चर्चा होती. मात्र त्यांच्याऐवजी भागवत कराड यांची केंद्रीय मंत्रीपदी वर्णी लागली. या सगळ्यामुळे प्रीतम मुंडे आणि पंकजा मुंडे नाराज आहेत अशी चर्चा रंगली होती. त्यावर ९ जुलैला पत्रकार परिषद घेऊन पंकजा मुंडे यांनी भूमिका मांडली होती.

काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे?

‘प्रीतम मुंडे यांनी मंत्रिपदाची अपेक्षा केलेली नव्हती, त्यामुळे नाराजीचा प्रश्नच येत नाही. मुंडे परिवाराने भाजपसाठी मोठं योगदान दिलंय. आम्ही कधीच कोणत्याही पदाची अपेक्षा केली नाही. प्रीतम तर माझ्या वडिलांच्या निधनानंतर राजकारणात आली. त्यामुळे पंकजा आणि प्रीतम मुंडे म्हणजे वंजारी समाज असं आम्ही मानत नाही. आम्ही नेतृत्व करणारे नाही तर कार्यकर्ते आहोत. नव्या मंत्र्यांना माझ्या शुभेच्छा असून त्यांनी राज्यातला ओबीसी आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पावलं उचलावीत’

राज्यात मुंडेंचा प्रभाव कमी करण्यासाठी प्रीतम मुंडे यांचं नाव डावलण्यात आलं का? असं विचारलं असता पंकजा मुंडे यांनी, असा कोणताही प्रयत्न राज्यात होतोय असं वाटत नसल्याचं सांगितलं. मुंडेंचा प्रभाव कमी करण्याचा प्रयत्न झाला तरीही तो वाढणारच असं सांगायलाही त्या विसरल्या नाहीत. भाजपत टीम नरेंद्र टीम देवेंद्र असं चालत नाही. पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असतो असं म्हणत पंकजा मुंडेंनी नाराजीची शक्यता फेटाळून लावली.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT