
मुंबई: महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन होऊन जवळपास महिना होऊन गेला. अद्याप दोघंच जण सरकार चालवत आहेत. त्यामुळे त्यांना विरोधकांच्या टीकेला सामोरं जावं लागत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना गेल्या एक महिन्यात सर्वाधिक वेळा विचारला गेलेला प्रश्न म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार?, त्यावर मुख्यमंत्री सतत लवकरच विस्तार होऊल असं आश्वासन देत आले. आता शिंदे गटाचे मुख्य प्रवक्ते दीपक केसरकर यांची प्रतिक्रिया आली आहे.
राज्यात अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेला प्रश्न म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार. मुख्यमंत्री या नात्याने एकनाथ शिंदे यांना सतत पत्रकार प्रश्न विचारतात की मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार यावर ते नेहमीच प्रश्नाला बगल देत असत किंवा लवकरच होईल असं सांगत. मात्र आता दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी स्पष्टच सांगितले आहे. मुंबई तकशी बोलतान दीपक केसरकर म्हणाले ''मंत्रिमंडळाचा विस्तार येत्या रविवारपर्यंत नक्की होईल.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे याबाबतची अधिकृत घोषणा करतील.'' सध्या शिवसेना विरुद्ध शिंदे गटाच्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात आहेत, त्यामुळे निकाल येईपर्यंत मंत्रिमंडळ विस्तार रोखला जातोय अशी टीका विरोधक करत आहेत. परंतु आता केसरकरांनी स्पष्ट सांगितल्यामुळे येत्या रविवारी तरी हा प्रश्न मार्गी लागेल का? हा प्रश्न आहे.
काल आमदार उदय सामंत (Uday Samant) यांच्या गाडीवर पुण्यातील कात्रज चौकात हल्ला झाला. यावर दीपक केसरकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ''आमदार उदय सामंत यांच्यावर झालेला हल्ला निषेधार्य आहे, अशा प्रकारचा हल्ला करणं महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीत चुकीचे आहे. हल्ला आणि इतर बाबींवरती उद्या पत्रकार परिषद घेऊन भूमिका स्पष्ट करणार'' असे दीपक केसरकर म्हणाले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीवर कोणतेही भाष्य करणार नाही असेही केसरकर म्हणाले.