
चिखलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी शेतकऱ्यांच्या वीज बिल माफीवरून देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलं. आव्हान देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांचा ते विरोधी पक्षनेते असतानाच व्हिडीओही लावला. ठाकरेंनी व्हिडीओ लावल्यानंतर फडणवीसांनी लागलीच प्रत्युत्तर दिलंय. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट केलं आणि ठाकरेंचा जुना व्हिडीओ दाखवत 'काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही', असं म्हणत पलटवार केलाय.
चिखलीतल्या सभेत उद्धव ठाकरेंनी वीज बिलाच्या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीसांना घेरलं. देवेंद्र फडणवीसांचा जुना व्हिडीओ ठाकरेंनी लावल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनीही उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ काढला.
'काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही...! 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रति पोकळ कळवळा महाराष्ट्राने अनुभवलाय...', असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंचा जुना व्हिडीओ ट्विटवर शेअर केलाय.
या व्हिडीओबरोबरच देवेंद्र फडणवीसांनी महावितरणचा एक आदेशही पोस्ट केला आहे. हा आदेश पोस्ट करताना फडणवीस म्हणतात, 'जे बोलतो ते करतो. फुकाच्या हवेत गप्पा मारत नाही. महावितरणचा हा आदेश 22 नोव्हेंबर 2022 रोजीच जारी झालेला आहे. शेतकर्यांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी हे सरकार कटिबद्ध आहे', असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंवर पलटवार केलाय.
भाजपच्या ट्विटर हॅण्डलवरून काही ट्विट्स करण्यात आलेत. ज्यात उद्धव ठाकरेंनी चिखलीतल्या सभेत केलेल्या टीकेला उत्तर दिलंय. 'मिस्टर उद्धव ठाकरे, 2.5 वर्षे घरात स्वतःला कोंडून घेतलं होतं तुम्ही. आज सत्ता गेल्यानंतर शेतकरी आठवला. 2 वर्षे ओला दुष्काळ होता किती रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली? कृषी वीज बिल संदर्भात तुम्ही बोलू नये, राज्यात 5 लाखांच्या वर शेतकऱ्यांच्या शेतातील वीज कनेक्शन तुम्ही तोडलीत', असं भाजपनं म्हटलंय.
'मिस्टर उद्धव ठाकरे, लाज तुम्हाला वाटायला हवी होती. निवडणुकीत मते मोदीजी आणि देवेंद्रजी यांच्या नावाने मागितली. खुर्चीसाठी जनमताचा अनादर करून, भाजपचा विश्वासघात करून सत्ता स्थापन केली काँग्रेस सोबत. सत्तेसाठी लाचार होऊन काँग्रेसच्या पायावर लोळण घेणाऱ्यांनी आत्मपरीक्षण करावं', असंही भाजपनं म्हटलंय.
पुढे भाजपनं म्हटलंय की, 'मिस्टर उद्धव ठाकरे, मेहबुबा मुफ्ती सोबत युती केली आणि काश्मीर मध्ये सार्वजनिक निवडणुका घेऊन दाखवल्या. वेळ आली युती तोडली सुद्धा. कश्मीरमध्ये आतंकवाद्यांना मदत करणाऱ्या फुटीरतावादी नेत्यांना तुरुंगात टाकलं, अनुच्छेद 370 हटवला. तुम्ही, काँग्रेस सोबत जाऊन तुम्ही कोणता तीर मारला?", असा उलट सवाल ठाकरेंना भाजपनं केलाय.