उद्या तुमच्या बायकोला अटक झाली तर? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा नवनीत राणांच्या निशाण्यावर

मुंबई तक

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठनाच्या वादातून अटक होऊन जामीनावर सुटलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत नवनीत राणा यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका महिलेविरोधात आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे. यावेळी पुढे बोलत असताना नवतीन राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मातोश्रीसमोर हनुमान चालीसा पठनाच्या वादातून अटक होऊन जामीनावर सुटलेल्या अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. इंडिया टुडेला दिलेल्या विशेष मुलाखतीत नवनीत राणा यांनी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एका महिलेविरोधात आपल्या अधिकारांचा गैरवापर केल्याचा आरोप केला आहे.

यावेळी पुढे बोलत असताना नवतीन राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना वादात ओढलं. “एकदा तुमची सत्ता गेली आणि तुमच्या घरातील कोणाला तरी…समजा तुमच्या पत्नी रश्मी ठाकरे यांना तुरुंगात टाकलं तेव्हा मी विचारेन की जो गुन्हा केलाच नाही त्यासाठी तुरुंगात टाकल्यावर तुम्हाला कसं वाटतं?”

उद्धव ठाकरे आपल्या भाषणात मी हिंदुत्ववादी असल्याचं सांगतात. एखाद्या भक्ताच्या घराबाहेर हनुमान चालीसा पठन केल्यामुळे कोणत्याही प्रकारे सामाजिक तेढ निर्माण होत नाही. एखाद्या दुसऱ्या धर्माच्या प्रार्थनास्थळाबाहेर जर हे झालं असतं तर आपण असं म्हणू शकतो. मी कुठेच सामाजिक तेढ निर्माण केली नसल्याचं राणा म्हणाल्या.

हनुमान चालीसा वादानंतर आपल्यावर झालेली कारवाई ही फक्त त्रास देण्यासाठी झाली होती असंही राणा मुलाखतीत म्हणाल्या. “मी स्वतंत्र भारतात राहणारी एक स्त्री आहे. हनुमान चालीसेचं पठन केल्यामुळे मला तुरुंगात जावं लागलं याचा मी विचारही करु शकत नाही. त्या दिवशी संपूर्ण रात्र ते पहाटे पाच वाजेपर्यंत मी तुरुंगात उभी होते. त्यांनी मला पाणी किंवा साधी चटईही दिली नाही.” त्यांच्यात जराशीही माणुसकी शिल्लक राहिलेली नाही ही खरंच दुर्दैवाची गोष्ट असल्याचं राणांनी सांगितलं.

जेलमध्ये असताना आपला आपल्या मुलांशी आणि पतीसोबत कोणताही संपर्क नसल्याचं नवनीत राणा यांनी स्पष्ट केलं. ज्यावेळी माझी मुलं विचारतील की आमच्या आईला तुरुंगात का टाकलं? त्यांना कोण उत्तर देणार आणि काय उत्तर देणार? जेलमध्ये असताना फक्त हनुमान चालीसेमुळेच मला शक्ती मिळत होती. मी प्रत्येक दिवशी हनुमान चालीसा वाचत होते. जेलमधील इतर महिला कैदीही माझ्यासोबत हनुमान चालीसा म्हणत होत्या ज्यामुळे मला आणखी प्रेरणा मिळाल्याचं राणा म्हणाल्या.

जेलमध्ये टाकून कोणीही मला घाबरवू शकत नाही असंही राणा या मुलाखतीत म्हणाल्या. “मी लढवय्यी आहे. मला इतक्या सहज कोणीही तोडू शकत नाही. एक असा व्यक्ती ज्याने आयुष्यभर काही काम केलं नाही आणि फक्त कोणाच्या तरी पुण्याईमुळे तो आज एका जागेवर आहे अशा व्यक्तीला मी घाबरत नाही. मी स्वतःच्या जिवावर इथपर्यंत आले आहे. मी नागरिकांचं, तरुणांचं आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचं प्रतिनिधीत्व करते”, अशा शब्दात नवनीत यांनी नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

भविष्यात भाजपसोबत जाणार का या प्रश्नाला उत्तर देताना नवनीत राणा यांनी सावध भूमिका घेतली. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यासोबत असले तरीही मी स्वतंत्र आहे. २०१४ आणि २०१९ मध्ये मी मोदी लाटेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. २०१९ ला मला जिल्ह्यातील नागरिकांनी संधी दिली. मला माझी स्वतःची स्वतंत्र विचारधारा आहे. मी भाजप या हिंदुत्ववादी पक्षाशी जोडले गेले याचा मला अभिमान असल्याचंही राणा यांनी स्पष्ट केलं.

हे वाचलं का?

    follow whatsapp