
महाराष्ट्रात राजकीय भूकंप आला आहे कारण एकीकडे भाजपने विधान परिषद निवडणुकीत मैदान मारलेलं असतानाच एकनाथ शिंदेंसह शिवसेनेचे आमदार नॉट रिचेबल आहेत. हे सगळे आमदार सुरतमध्ये आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्न महाराष्ट्रात निर्माण झाला आहे. संजय राऊत हे सांगत आहेत की काहीही भूकंप वगैरे येणार नाही.
एकनाथ शिंदे गुजरात पोहचले आहेत, त्यात महाराष्ट्रातले दोन मंत्री, तसंच एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे हे सगळे सहभागी आहेत. एका अपक्ष उमेदवाराचं नाव समोर आलं आहे. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की एकनाथ शिंदेसोबत कोणकोणते आमदार सुरतला पोहचले आहेत.
एकनाथ शिंदेसोबत कोणकोणते आमदार आहेत?
डॉ. तानाजी सावंत
बालाजी कल्याणकर
प्रकाश आबिटकर
अब्दुल सत्तार
संजय पांडुरंग शिरसाट
श्रीनिवास वनगा
महेश संभाजी शिंदे
संजय भास्कर रायमुलकर
विश्वनाथ भोईर
संदीपान भुमरे
शांताराम मोरे
रमेश बोरणारे
अनिल बाबर
चिमणराव पाटील
शंभूराज देसाई
सहाजी बापू पाटील
महेंद्र हरि दडवी
जयप्रदीप जैसवाल
महेंद्र सदाशिव थोरवे
किशोर पाटील
भारत गोगावले
ज्ञानराज चौगुले
बालाजी किडनीकर
सुहास कांदे
संजय गायकवाड
असे २६ आमदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. तसंच अपक्ष आमदार-चंद्रकांत पाटील हेदेखील त्यांच्यासोबत आहेत.
डॉ. श्रीकांत शिंदे एकनाथ शिंदे यांचा मुलगा हे सगळे सुरतमध्ये आहेत. एकनाथ शिंदे यांनी हे बंड पुकारल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ माजली आहे. आंतराष्ट्रीय योगा दिनाच्या मुहूर्तावरच महाराष्ट्रातलं सरकार पाडण्याचा योग साधला गेला आहे अशीही चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली आहे. एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधातच बंडाचा झेंडा उगारला आहे. आता हे बंड कोणत्या दिशेने जाणार ते पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे एकनाथ शिंदे हे सुरतमध्ये असतानाच तिकडे इतर घडामोडींनाही वेग आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नडडा यांच्या भेटीला पोहचले आहेत. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीस हेदेखील आज सकाळीच दिल्लीला रवाना झाले आहेत.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी काय म्हटलं आहे?
या सगळ्या राजकीय घडामोडींवर संजय राऊत यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. शिवसेनेचे एकनाथ शिंदे आणि काही आमदार यांच्याशी संपर्क होत नाहीये. महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र भाजपला हे माहित असायला हवं की महाराष्ट्र राजस्थान आणि मध्यप्रदेश पेक्षा वेगळा आहे. संजय राऊत यांचं म्हणणं आहे की कोणताही राजकीय भूकंप महाराष्ट्रात आलेला नाही येणारही नाही. संजय राऊत म्हणाले एकनाथ शिंदे यांना मी ओळखतो ते सच्चे शिवसैनिक आहेत. ते बिनशर्त परत येतील हा विश्वास मला वाटतो आहे. आमचे आमदारही शिवसैनिक आहेत. ते लवकरच परत येतील आणि सगळं काही सुरळीत होईल असा विश्वास मला वाटतो असंही संजय राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.