
Narayan Rane criticized Uddhav Thackeray: मुंबई: स्वर्गीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त आज (23 जानेवारी) राज्याच्या विधानसभेतील सेंट्रल हॉलमध्ये एका खास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. ज्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आलं. याच कार्यक्रमात माजी शिवसैनिक आणि विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी जोरदार भाषण केलं. या भाषणात नारायण राणेंनी बाळासाहेबांच्या अनेक आठवणी जागवल्या. पण त्याचवेळी राणेंनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचं (Uddhav Thackera) नाव न घेता त्यांच्यावर तुफान टीका देखील केली. (narayan rane also criticized uddhav thackeray at oil painting unveiling ceremony of balasaheb thackeray)
पाहा नारायण राणे आपल्या भाषणात नेमकं काय म्हणाले:
'मी मांजरींची, डुप्लिकेट वाघांची दखलही घेत नाही'
'साहेबांनी मला काय दिलं नाही... किती पदं दिली. मुख्यमंत्रीही केलं मला.. साक्षीदार राज ठाकरे, स्मिता वहिनीही आहेत. अनेक नेत्यांना डावललं तेव्हा नारायण राणेला मुख्यमंत्री करण्याचं धाडस बाळासाहेब ठाकरेच करू शकत होते दुसरं कोणी नाही. बाकीचे मध्ये येणारे मांजरीसारखेच होते... आजही ते येतायेत. मी मांजरींची दखल घेत नाही आणि डुप्लिकेट वाघांचीही दखल घेत नाही.' असं म्हणत नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता टीका केली.
'मी शेवटी बाळासाहेबांना थोडा त्रासही दिला, पण...'
'बाळासाहेबांची माणूस म्हणून काही तुलना होऊ शकत नाही. बाळासाहेबांकडे कोणतं पद का कधी? तरी देशाचे पंतप्रधान मोठ-मोठे नेते त्यांच्याकडे यायचे. सगळेच भेटायचे. सत्ता नसताना एवढं कौतुक आणि मान मिळणारं व्यक्ती म्हणजे बाळासाहेब.' 'कोकणातून येताना वाटलं नव्हतं की, एवढी पदं मला कधी मिळतील. मी काही निर्णय घेतले शेवटी मी त्रासही दिला बाळासाहेबांना.. शिवसेना सोडली तेव्हा 2005 साली. तरीही त्यांनी दुसऱ्या दिवशी मला फोन केला. असा दुसरा नेता नाही. म्हणाले मला नारायण चिडू नको.. विचार कर आणि परत ये. मला बोलावलं पण मी उत्तर देऊ शकलो नाही.' असं म्हणत नारायण राणेंनी 2005 मधील आपला किस्साही सांगितला.
'साहेब असते तर महाराष्ट्राचा इतिहास वेगळा असता'
'आज जो काही आहे मी नारायण राणे ते फक्त बाळासाहेबांमुळे. जेवढी काळजी बाळासाहेबांनी घेतली तेवढी काळजी आमच्या आई-वडिलांनी देखील घेतली नाही.' 'आम्ही साहेबांसाठी वेडे का होतो तर त्याचं आताच्या नेत्यांनी विचार करावा. वेड आम्हाला साहेबांच्या प्रेमाचं होतं. साहेबांच्या विश्वासाचं. साहेब असते तर महाराष्ट्राचा इतिहास वेगळा असता. आता घडला तसा अजिबात नसता. साहेबांनी आम्हाला शिकवून तरबेज केलं.' असंही नारायण राणे यावेळी म्हणाले.
'बाळासाहेब सांगायचे.. नारायण खूप मानसिक त्रास आहे'
'साहेब वडिलांसारखे होते हे बरोबर आहे. पण मुलासारखे किती जण वागले हा प्रश्नच आहे. अनेक गोष्टी मी जवळून बघितल्या आहेत. मानसिक त्रास या महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी दिला नाही. कोणी दिला विचार करा.. मी जायचो, बसायचो.. ते म्हणायचे नारायण फार त्रास आहे. मानसिक त्रास होतोय. साहेबांनी सांगितलं ते मी इथे नाही सांगू शकत. कधी वेळ आली तर तेही सांगेल. मला डिवचू नका..' 'भुजबळ... तो हात ना तो माझ्या वाक्याला समर्थन होता.' 'आमच्यासारखे शिवसैनिक, एकनाथ शिंदेंसारखे शिवसैनिकय.. आम्ही संसार नाही पाहिला. घरात मी मोठा होतो.. उद्या काय होईल याचा विचार नाही केला. नारायण राणेने पैसे मिळवायला केसेस केल्या नाही.' 'साहेबांविरुद्ध कोणी काही बोललं की, अद्दल घडलीच समजा. आता काही बोला.. काही करा.. काही होत नाही.' 'नाही.. नाही मी थांबणार नाही.. असह्य होत असेल... नाही.. नाही खाली बसून ग्राह्य धरत नाही विधानसभेत. असो.. बाळासाहेबांचे ऋण या जन्मात तरी मी कधीच फेडू शकत नाही. मी एकनाथ शिंदे, राहुल नार्वेकर यांना धन्यवाद देतो आणि इथेच थांबतो. कारण काही लोकांना माझे गोड शब्द ऐकायला कडू वाटतायेत म्हणून इथेच थांबतो.' असं म्हणत नारायण राणे यांनी उद्धव ठाकरेंचं नाव न घेता या कार्यक्रमात त्यांना बरंच टार्गेटही केलं.