
नवी दिल्ली: येत्या १८ जुलै रोजी राष्ट्रपती पदासाठी (Presidential election) निवडणूक होणार आहे, तर २१ जुलैला भारताला नवा राष्ट्रपती मिळणार आहे. त्यासाठी आता देशात हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रपती पदासाठी अनेकांची नावं चर्चेत आहेत. भाजप यावेळेस महिलेला उमेदवारी देण्याच्या तयारीत आहे. तर संयुक्त पुरोगामी आघाडीकडून (UPA) शरद पवार (Sharad Pawar) यांचे नाव चर्चेत आहे. राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शरद पवारांच्या नावाला पाठिंबा दिला आहे. युपीएकडून जर शरद पवारांचे नाव निश्चित झाले तर आमचा पाठिंबा राहिल असे नाना पटोले म्हणाले होते. महाराष्ट्र काँग्रेसनंतर आता आम आदमी पक्षाचाही (AAP) शरद पवारांच्या नावाला पाठिंबा असल्याची माहिती सुत्रांनी दिलेली आहे.
राज्यातील व्यक्ती जर देशाची राष्ट्रपती होत असेल आणि जर त्यासाठी शरद पवारांचे नाव समोर आले तर महाराष्ट्र काँग्रेसचा त्यांच्या नावाला पाठिंबा असेल असे नाना पटोले माध्यमांशी बोलताना म्हणाले होते. आपच्या गोटातही अशी चर्चा असल्याची माहिती सुत्रांनी दिलेली आहे. परंतु, आपकडून अजून अशी काही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी त्याचबरोबर युपीएतील वरिष्ठ नेते तसेच मित्रपक्षांकडून राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीबाबत अजून चकार शब्द काढण्यात आलेला नाही. येत्या दोन दिवसात युपीएची बैठक आहे त्यामध्ये काय निर्णय होतो याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यादेखील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.
* १५ जून रोजी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी अधिसुचना निघणार आहे.
* २९ जूनपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत.
* ३० जून रोजी अर्जाची छाननी होवून २ जुलै रोजी अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असणार आहे.
* निवडणूक बिनविरोध झाल्यास २ जुलै रोजीच देशाला नवीन राष्ट्रपती मिळणार आहेत.
* निवडणूक बिनविरोध न झाल्यास १८ जुलै रोजी मतदान आणि २१ जुलै रोजी मतमोजणी.
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी सर्वसामन्य लोकांना मतदान करता येत नाही. या निवडणुकीमध्ये सर्व निवडून आलेले आमदार-खासदार मतदान करु शकतात. मतदारांच्या एकूण मतांपैकी निम्म्याहून अधिक म्हणजे खासदार आणि आमदारांच्या मतांचे वेटेज प्राप्त करणारा उमेदवार भारताचा राष्ट्रपती होतो.
राष्ट्रपती पदासाठी भाजप कोणता उमेदवार देतं या चर्चा सुरु झाल्या आहेत. भाजप यंदा महिला उमेदवार देण्याच्या तयारीत आहे. आणि मुख्य म्हणजे त्या आदिवासी महिला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर ही निवडणूक बिनविरोध नाही झालीतर ही निवडणूक ही रंजक होण्याची शक्यता आहे.