'आपुलकी वाढल्यावर अहो विश्वासराव', ते 'आयला गडबड झाली', दादांच्या आठवणी नांगरे पाटलांनी लिहिल्या

मुंबई तक

Ajit Pawar Death : एसपी म्हणून अडीच वर्षे आणि पश्चिमम महाराष्ट्राचा आयजी म्हणून ३ वर्षे काम करताना कोणत्या चुकीच्या बाबीसाठी त्यांनी दबाव टाकल्याचा माझा अनुभव नाही. दादा नेहमी अदबीने बोलायचे. अहो नांगरे पाटील आणि नंतर आपुलकी वाढल्यावर अहो विश्वासराव आणि फोनवर ' ऐका ना ' असे आर्जव आणि प्रेमाने साद घालायचे. 

ADVERTISEMENT

Ajit Pawar Death
Ajit Pawar Death
social share
google news

बातम्या हायलाइट

point

'आपुलकी वाढल्यावर अहो विश्वासराव', ते 'आयला गडबड झाली',

point

नांगरे पाटलांनी अजितदादांबद्दल काय काय लिहिलं?

Ajit Pawar Death : बारामती येथे बुधवारी (दि.28) झालेल्या विमान अपघातात उपमुख्यमंत्री अजित पवारांचा मृत्यू झालाय. फायरब्रँड नेत्याचा अशा पद्धतीने मृत्यू झाल्याने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडलाय. प्रत्येकजण अजितदादांचे अनुभव त्यांच्याबाबतच्या आठवणी शेअर करत आहे. यामध्ये अधिकारी वर्ग देखील मागे राहिलेला नाही. IPS अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या सर्व आठवणी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून शेअर केल्या आहेत. 

विश्वास नांगरे पाटील यांची फेसबुक पोस्ट जशीच्या तशी

दादा, ताकदीचा नेता नियतीने हिराहून घेतला ! 

अहिल्यानगरला एसपी असताना माझे राजकीय गणित जमत नव्हते. दादा पुण्याचे पालकमंत्री होते. अचानक दादांचा फोन आला. तुमची पुणे ग्रामीण ला एस पी म्हणून शासन नेमणूक करीत आहे. जिल्ह्यातील गुंडांना सुतासारखे सरळ करावं लागेल. माझा आणि दादांचा पूर्वीचा परिचय नव्हता. पोस्टिंग झाली. अधिकाऱ्यांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या बदल्या आणि पोस्टिंग केल्या. दादांचा कोणासाठीही फोन नाही. आयजी म्हणून नेमणुकीस असताना चाकण, तळेगाव, मुळशी भागातील २५ गँग ला मोका लावला, १५० च्या वर गुन्हेगारांना तडीपार केले, दादांनी आवर्जून फोन करून अभिनंदन केले. एसपी म्हणून अडीच वर्षे आणि पश्चिमम महाराष्ट्राचा आयजी म्हणून ३ वर्षे काम करताना कोणत्या चुकीच्या बाबीसाठी त्यांनी दबाव टाकल्याचा माझा अनुभव नाही. दादा नेहमी अदबीने बोलायचे. अहो नांगरे पाटील आणि नंतर आपुलकी वाढल्यावर अहो विश्वासराव आणि फोनवर ' ऐका ना ' असे आर्जव आणि प्रेमाने साद घालायचे. 

दादांच्या कामाची पद्धत पद्धतशीर आणि शिस्तबद्द ! मी एकदा पोलीस क्रीडास्पर्धांसाठी त्यांना निमंत्रित केले होते. खेळ संपल्यानंतर त्यांनी पंचाला तू जीन्स पॅन्ट ला उभी इस्त्री का केलीस म्हणून झाप झाप झापले. परिसराची स्वच्छता आणि टापटीपीवर त्यांची बारीक नजर असायची. बारामती पोलीस स्टेशन ची इमारत बांधायची चालू असताना ते किमान डझन वेळी साईट वर आले असतील. पी डब्ल्यू डी च्या अधिकाऱ्यांना बांधकामाचा दर्जा अत्युत्तम राहील याच्या सक्त सूचना होत्या. कंत्राटदारानेही थोडीसुद्धा रिस्क न घेता फाईव्ह स्टार ठाणे बनवले. उदघाटनावेळी चकाचक लॉक अप आणि त्यासमोरचे लश ग्रीन लॉन पाहून दादा मिश्किलीने म्हणाले , ' आयला गडबड झाली. आता चोरांना या अशा पॉश लॉक अप मध्ये ठेवले तर ते बेल मागणारच नाहीत. आपल्याला त्यांना फुकट पोसावं लागेल.' दादा दिसायला बोलायला कडक पण अत्यंत संवेदनशील होते. भोर जवळच्या धरणात गावकऱ्यांची बोट उलटून २७ जण मृत्युमुखी पडले होते. दादा भेट द्यायला आले तेव्हा त्यानी शासकीय निधीची वाट न पाहता त्या २७ कुटुंबियांना जागेवरच प्रत्येकी २ लाख मदत केली. कार्यकर्त्यांच्या मोहोळात ते राणी माशीसारखे शिस्तीने काम करायचे. त्यांचा मी जिम मध्ये किंवा रनिंग करीत असताना भेटायला यायला निरोप यायचा. मी अनेकदा जिम च्या पेहरावात गेस्ट हाऊस ला सकाळी ६/७ वाजता पोहोचायचो. एकदा मला रागाने फोन केला अहो तुम्ही हे हायवे वरचे डिव्हायडर सगळे जोडून घेतले. गावातल्या लोकांचे धाबे आहेत, छोटे मोठे धंदे आहेत. सगळे बंद पडताहेत. मी दादांना डिव्हायडर बेकायदेशीर तोडल्याने किती आणि कसे अपघात झाले आणि ते जोडल्यावर फेटल अपघात किती कसे कमी झाले, याचे प्रेझेन्टेशन दिले. त्यांनी जाहीर सभेत माझे कौतुक केले आणि मुख्य सचिवांना फोन करून असा ड्राईव्ह पूर्ण राज्यात घ्यायच्या सूचना दिल्या. पुण्याला एसपी असताना सिंहगडाच्या पायथ्याशी रंगात आलेल्या रेव्ह पार्टीवर कारवाई केल्याबद्दल त्यांनी यशवंतराव चव्हाण प्रतिष्टान च्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात जाहीर सन्मान केला आणि ड्रग्ज ची पुण्यातील कीड मुळापासून उखडून टाकण्याचे आदेश दिले. 

हे वाचलं का?

    follow whatsapp