राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास एक लाखाचं बक्षीस, शेतकरी विरोधी वक्तव्य केल्यानं बच्चू कडूंचा संताप
Bachchu Kadu on Radhakrishna Vikhe Patil : राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास एक लाखाचं बक्षीस, शेतकरी विरोधी वक्तव्य केल्यानं बच्चू कडूंचा संताप
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
राधाकृष्ण विखे पाटलांची गाडी फोडणाऱ्यास एक लाखाचं बक्षीस
शेतकरी विरोधी वक्तव्य केल्यानं बच्चू कडूंचा संताप
Bachchu Kadu on Radhakrishna Vikhe Patil : भाजपाचे नेते आणि राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी संताप व्यक्त केलाय. विखे पाटलांवर जोरदार टीका करत बच्चू कडूंनी म्हटलं, “जो कोणी राधाकृष्ण विखे पाटील यांची गाडी फोडेल त्याला माझ्याकडून एक लाख रुपयांचं बक्षीस दिलं जाईल.” एवढंच नव्हे, तर “मला जर त्यांची गाडी दिसली तर मी स्वतः ती फोडेन,” असा थेट इशाराही कडूंनी दिला आहे.
यावर पुढे बोलताना त्यांनी विखे पाटलांवर कडाडून टीका केली. “नाव राधाकृष्ण आणि वागणूक मात्र कंसासारखी! अशा कंसाच्या अवलादीला मुख्यमंत्री एकदाचा बाहेरचा रस्ता दाखवावा,” अशी मागणी बच्चू कडूंनी केली. “फडणवीस साहेब एका बाजूला कर्जमाफी जाहीर करतात, आणि दुसरीकडे हे वाचाळ मंत्री शेतकऱ्यांचा अपमान करणारी वक्तव्ये करतात. शेतकरी शांत आहेत म्हणजे ते भित्रे नाहीत. त्यांचा संयम संपण्याआधी ही नालायकी थांबवा,” असा इशारा बच्चू कडूंनी दिला.
हेही वाचा : मोठी बातमी : राज्यातील नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा
नेमकं विखे पाटील यांनी काय म्हटलं होतं?
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सत्ताधारी नेत्यांकडून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत वादग्रस्त विधाने केली जात आहेत. या यादीत आता जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचं नावही आलं आहे. त्यांनी म्हटलं, “आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची हा प्रकार अनेक वर्षांपासून सुरू आहे. सोसायटी काढायची, कर्ज घ्यायचं, मग कर्जमाफी करून घ्यायची आणि पुन्हा कर्जासाठी अर्ज करायचा हेच सुरू आहे.” या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर आणि शेतकरी संघटनांकडून विखे पाटलांवर तीव्र टीका झाली असून, बच्चू कडू यांनीही आता थेट आक्रमक पवित्रा घेत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.










