मनोज जरांगेंचं रखरखत्या उन्हात उपोषण, काय आहे फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया?
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले. 'जेवढे निर्णय मी आणि शिंदेसाहेबांनी घेतले, तेवढे इतिहासात कधी झाले नाहीत आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू," असे ते म्हणाले.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
मनोज जरांगेंचं रखरखत्या उन्हात उपोषण
काय आहे फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया?
Devendra Fadnavis On Manoj Jarange : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी अंतरवाली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणाला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमधील पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या भूमिकेवर स्पष्टीकरण दिले. 'जेवढे निर्णय मी आणि शिंदेसाहेबांनी घेतले, तेवढे इतिहासात कधी झाले नाहीत आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू," असे ते म्हणाले. नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी दोन समाजांमधील तेढ, ओबीसी समाज या महत्त्वाच्या विषयांवर त्यांनी भाष्य केले. ते नेमकं काय म्हणाले, जाणून घेऊया.
'आम्ही सगळ्यांच्या भल्यासाठी प्रयत्न करतो'
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील मागण्यांसाठी उपोषणाला सुरुवात केली आहे. अंतरवाली सराटी येथे आज (30 मे) सकाळी दहा वाजल्यापासून रखरखत्या उन्हात त्यांनी या उपोषणाला सुरुवात केली आहे. त्यांच्या या उपोषणाविषयी आणि मराठा समाजाच्या मागण्यांविषयी बोलताना फडणवीस म्हणाले की, 'सरकार नेहमीच या प्रश्नावर सकारात्मक आहे. सरकारने वारंवार निर्णय घेतलाय. प्रत्येक वेळी जेव्हा अडचण आली त्या-त्या वेळी सरकारने निर्णय घेतला आहे आणि यासंदर्भात मी एवढंच सांगेन की सरकारची भूमिका पारदर्शक आहे. सरकारची भूमिका सकारात्मक आहे. आणि ती भूमिका आम्ही सातत्याने मांडतोय. यापुढेही सरकारची भूमिका सकारात्मकच असेल.'
आमचं सरकार सर्व समाजांकरिता सकारात्मक काम करणारं सरकार आहे. आम्ही समाजांना एकमेकांपुढे आणून भांडण करत नाही. सगळ्यांचं भलं कसं होईल हा प्रयत्न करतो. आणि विशेषत: मराठी समाजाच्या संदर्भात मी पुन्हा एकदा सांगतो जेवढे निर्णय मी घेतले आणि शिंदेसाहेबांनी घेतले तेवढे इतिहासात कधी झाले नाहीत. आणि पुढेही आम्ही मराठा समाजाच्या हिताचे निर्णय घेतच राहू, असंही ते म्हणाले.
हे ही वाचा : जळगाव : प्रेमी युगुल लॉजवर गेलं, अन् एकाची बॉडी सापडली; असं घडलं तरी काय?
'प्रसिद्धी मिळेल पण निर्णय..'
यापुढं बोलताना ते म्हणाले की, 'फक्त हे निर्णय घेत असताना देशाचं संविधान, देशाचं सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्ट यांनी दिलेले निर्देश याचं मात्र पालन करावं लागेल. त्या निर्देशांचा अवलंब न करता जर एखादा निर्णय घेतला तर त्यातून केवळ प्रसिद्धी मिळेल पण तो निर्णय टिकणार नाही. त्यामुळे संविधान आणि न्यायालयाचे निर्णय यांच्या कसोटीवर जे-जे निर्णय आम्हाला घेता येतील ते सगळे निर्णय आम्ही घेऊ.'









