Santosh Deshmukh यांची हत्या ते धनंजय मुंडेंचा राजीनामा, महाराष्ट्राला हादरवणारं नेमकं प्रकरण काय?
Dhananjay Munde Resignation: बीडमधील संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या आणि त्यानंतर तीन महिन्याने धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला. या तीन महिन्यात नेमकं काय घडलं? जाणून घ्या सविस्तर.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट

संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो बाहेर आल्यानंतर मोठा गदारोळ

धनंजय मुंडेंचा घेण्यात आला राजीनामा

नेमकं काय आहे प्रकरण समजून घ्या
बीड: महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांना अखेर आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाशी संबंधित गुन्हेगार हे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय असल्याचं समोर आलं आहे. या हत्या प्रकरणातील सूत्रधार वाल्मिक कराड हा धनंजय मुंडे यांचा उजवा हात समजला जातो. त्यामुळे आता मुंडेंनी राजीनामा द्यावा असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ज्यानंतर आज (4 मार्च) त्यांचा राजीनामा घेण्यात आला.
राजीनाम्यासाठी मुंडेंवर कसा वाढला दबाव?
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, 'धनंजय मुंडे यांनी माझ्याकडे त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा सोपवला आहे, जो राज्यपालांकडे पाठवण्यात आला आहे.'
हे ही वाचा>> धनंजय मुंडेंनी नैतिकतेवर राजीनामा दिला नाही, म्हणाले 'मी तर...' 'या' प्रतिक्रियेचा अर्थ काय?
दरम्यान, धनंजय मुंडेंनी कुठेही नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देत असल्याचं म्हटलं नाही. त्यांनी जे ट्वीट केलं त्यामध्ये त्यांनी राजीनाम्याचे कारण आरोग्य समस्या असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, अशीही माहिती समजते आहे की, मुख्यमंत्री फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल यांना धनंजय मुंडेंना मंत्रिपद सोडावे लागेल असे स्पष्ट शब्दात सांगितलं होतं.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान, आरोपपत्राचा एक भाग आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला, ज्यामध्ये वाल्मिक कराडचे सहकारी सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करताना दाखवण्यात आले होते. हेच फोटो धनंजय मुंडेंचा राजीनामा देण्याच्या दबावाचे मुख्य कारण बनले.