शिंदेंच्या मुलाखतीचा उल्लेख, बाळासाहेबांची व्यंगचित्रे, कुणाल कामरा हक्कभंग समितीला दिलेल्या उत्तरात काय म्हणाला?
Kunal Kamra : "खरं तर, एकनाथ शिंदे (जे या विडंबनाचे मुख्य विषय होते) यांनी राष्ट्रीय दैनिक "The Hindu" ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले आहे की, माझ्या विडंबनामुळे त्यांच्या कामावर कोणताही परिणाम झालेला नाही", असं कॉमेडियन कुणाल कामरा याने म्हटलंय.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
एकनाथ शिंदेंच्या मुलाखतीचा उल्लेख
बाळासाहेब ठाकरेंची व्यंगचित्रे
कुणाल कामराचे हक्कभंग समितीला थेट उत्तर
Kunal Kamra : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर 'भोळी सी सूरत' या गाण्याच्या माध्यमातून विडंबनात्मक टीका केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा याने नुकतेच हक्कभंग समितीसमोर आपले स्पष्टीकरण सादर केले आहे. या विडंबनानंतर शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी कामराने ज्या स्टुडिओमध्ये शो सादर केला, त्या स्टुडिओची तोडफोड केली होती. तर भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी त्याच्याविरोधात विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडला होता. यापूर्वीच्या सुनावणीला दरेकर अनुपस्थित राहिल्याने ही प्रक्रिया लांबणीवर पडली होती; मात्र शुक्रवारी (दि. 10) कुणालने समितीपुढे हजर राहून आपली बाजू मांडली. दरम्यान, हक्कभंग समितीला त्याने कोणते स्पष्टीकरण दिलंय? सविस्तर जाणून घेऊयात..
मला 8 जुलै 2025 रोजी बजावण्यात आलेल्या नोटीसला हे माझं उत्तर आहे. त्या नोटीसमध्ये माझ्यावर विधिमंडळाच्या विशेषाधिकारांचा भंग केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे उत्तर 24 जुलै 2025 रोजी दिलेल्या माझ्या लिखित उत्तरासोबत वाचावे. ही नोटीस मिळाल्यावर मला आश्चर्य वाटलं. कारण इतिहासात ब्रिटनच्या संसदेत (House of Commons) सदस्यांना राजाच्या मनमानीपासून संरक्षण मिळावं म्हणून जे अधिकार दिले होते, तेच अधिकार आजच्या लोकशाहीत नागरिकांविरुद्ध वापरले जाऊ शकतात, हे मला जाणवलं.
विधिमंडळाचे विशेषाधिकार म्हणजे त्या सभागृहाला आणि त्याच्या सदस्यांना दिलेले अधिकार आहेत, जे त्यांच्या लोकशाही आणि प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी आवश्यक मानले जातात. पण महाराष्ट्राच्या विधिमंडळातील आमदारांनी असं म्हणणं की, त्यांना आपलं काम करण्यासाठी त्यांच्यावर केलेल्या विनोद आणि टीकेपासून संरक्षण मिळणं गरजेचं आहे हे पूर्णपणे चुकीचं आणि हास्यास्पद आहे. असं झालं तर ते लोकशाहीच्या मूळ तत्त्वांच्याच विरोधात जाईल आणि नागरिकांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बंधन येईल. म्हणजेच, लोकांच्या बोलण्याचं स्वातंत्र्य हे निवडून आलेल्या नेत्यांच्या विनोदबुद्धीवर (किंवा तिच्या अभावावर) अवलंबून राहील.
मी या समितीसमोर हजर झालो. कारण मी ‘नया भारत’ या माझ्या एक तासाच्या कॉमेडी कार्यक्रमात Bholi Si Surat या बॉलिवूड गाण्याचं विडंबन सादर केलं होतं. 8 जुलै 2025 रोजी दिलेल्या तुमच्या नोटीसमध्ये नमूद केल्याप्रमाणे, या गाण्यामुळे माझ्यावर विशेषाधिकार भंगाची कारवाई सुरू आहे. तुम्ही मला यासाठी खालील तीन कारणे सांगितली आहेत.









