‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी..' भाजप नेत्यानं ठाकरेंना डिवचलं
maharashtra politics : बेस्ट निवडणुकीत ठाकरे बंधूंचा पराभव झाल्याने भाजप नेते केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंचा ट्विट करत चांगला समाचार घेतला आहे.

बातम्या हायलाइट

बेस्ट निवडणुकीत ठाकरेंचा पराभव

भाजप नेत्यानं चांगलंच डिवचलं

नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Politics : 'कालपर्यंत दोन शून्ये आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे', अशी जहरी टीका भाजप नेते आणि मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे बंधूंवर केली आहे. बेस्ट पतपेढी निवडणुकीत ठाकरे बंधूंच्या पॅनलला भोपळाही फोडता न आल्याने भाजप नेत्यांनी त्यांच्यावर आता चांगलंच तोंडसुख घेण्यास सुरुवात केली आहे. त्यात केशव उपाध्ये यांनीही आता ठाकरे बंधूंना जोरदार टोले लगावले आहेत. नुकत्याच झालेल्या बेस्ट निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंवर ट्विट करत त्यांना चांगलंच डिवचलं आहे.
केशव उपाध्येचं ट्विट जसंच्या तसं
एकाकडे गमावण्यासाठी काही राहिलेले नाही आणि दुसऱ्याकडे कमावण्यासाठी काही राहिलेले नाही, अशा ‘दोन शून्यां’ची बेरीज केली आणि त्यावर कितीही शून्ये जोडली तरी त्या गणिताचे उत्तर शून्यच येते, हे शाळा न शिकलेल्या मुलांनाही माहीत असलेले उत्तर ओळखले नाही तर काय होईल?…
"त्यांनाच त्यांची किंमत कळली"
या प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी ‘बेस्ट कामगार पतपेढी’च्या निवडणूक निकालाकडे पाहा! कालपर्यंत दोन शून्ये आपली किंमत जोखण्याचे आव्हान देत होती, आज त्यांनाच त्यांची किंमत कळली आहे!!, असे ट्विट करत त्यांनी ठाकरे बंधूंना डिवचलं आहे.
दरम्यान, 18 ऑगस्ट रोजी सोमवारी निवडणूक पार पडली होती. एकूण 83 टक्के मतदान झाले होते. त्यानंतर 20 ऑगस्ट रोजी पहाटे बेस्ट निवडणुकीचा निकाल जाहीर करण्यात आला असता, या निवडणुकीत 21 जागा लढवण्यात आल्या असून एकाही ठिकाणी ठाकरे बंधूंना भोपळा फोडता आला नाही. यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या विजयावर प्रश्चचिन्ह उपस्थित होताना दिसतेय.
बेस्ट पतपेढी निवडणुकीचा नेमका निकाल काय?
या निवडणुकीत ठाकरे बंधूंनी उत्कर्ष हे संयुक्त पॅनेल रिंगणात उतरवले होते. तर त्यांच्या विरोधात आमदार प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांच्या श्रमिक उत्कर्ष सभेसह, मंत्री नितेश राणे यांच्या समर्थ बेस्ट पॅनेल संघटनेनंही आपलं पॅनेल उभं केलं होतं. प्रचारादरम्यान, ही निवडणूक ठाकरे बंधु आणि प्रसाद लाड यांच्यातच रंगल्याचं दिसून आलं. या निवडणुकीत ठाकरे बंधूंना एकाही जागेवर निवडणूक जिंकता आली नसल्याचं चित्र आता समोर आलं आहे.
दुसरीकडे बेस्ट युनियनचे नेते शशांक राव यांच्या सर्वाधिक 14 जागा निवडून आल्या आहेत. तर भाजपप्रणित पॅनलच्या 7 जागा निवडून आल्या आहेत. तर ठाकरे बंधूंच्या उत्कर्ष पॅनलला भोपळाही फोडता आलेला नाही.
- शशांक राव पॅनल - १४
- प्रसाद लाड पॅनल - ०७
- मनसे - शिवसेना - ००