Maratha Reservation: 'फसवं समाधान हवं असेल तर घ्या... 'तिथे' दाखले टिकत नाही', चंद्रकांत पाटलांनी उडवून दिली खळबळ
Chandrakant Patil on Maratha Reservation: सरकारने मराठा समाजातील लोकांना कुणबी आरक्षण मिळावं यासााठी हैदराबाद गॅझेटिअर लागू केलं आहे. मात्र, दोन दिवसांपूर्वी भाजप मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याच प्रकारच्या आरक्षणामधील काही अडचणी सांगितल्या होत्या.
ADVERTISEMENT

नितीन शिंदे, पंढरपूर: मुंबईत येऊन मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगेंनी जे आंदोलन सुरू करण्यात आलं होतं. ते अखेर आज (2 सप्टेंबर) मागे घेण्यात आलं. त्याआधी सरकारने हैदराबाद गॅझेटिअर लागू करण्याचा GR देखील जारी केला. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आलं आणि त्यानंतर मुंबईत आलेल्या मराठा आंदोलकांनी गुलाल उधळत एकच जल्लोष केला. मात्र, याच दरम्यान, आता भाजपचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दोन दिवसांपूर्वी पंढरपूरमध्ये कुणबी दाखल्यांविषयी एक अत्यंत परखड अशी प्रतिक्रिया दिली होती. जी आता समोर आली आहे. चंद्रकांत पाटलांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया देताना कुणबी प्रमाणपत्रांविषयी सतत्या सांगितली होती ते पाहता आता सर्वांच्याच भुवया पुन्हा उंचावल्या आहेत.
'फसवं समाधान हवं असेल तर घ्या. नोंदीमुळे कुणबी दाखले मिळतील पण त्याचा फायदा काही शिक्षण, नोकरी किंवा निवडणुकीत होत नाही. त्यासाठी पडताळणी गरजेची असते आणि पडताळणीमध्ये बरेच दाखले टिकत नाही.' असं अत्यंत स्पष्ट विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. त्यामुळे राज्य सरकारने आता ज्या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षणासाठी तरतूद केली आहे त्याबाबत नव्या शंका उपस्थित होऊ लागल्या आहेत.
हे ही वाचा>> Maratha Reservation: 'मला दोष दिले, शिव्या दिल्या तरीही मी...', पाहा जरांगेंनी आंदोलन मागे घेताच CM फडणवीस काय म्हणाले
चंद्रकांत पाटील नेमकं काय म्हणालेले?
'आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे ज्यांना-ज्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळालं आहे ते ओबीसी प्रवर्गातून निवडणुकीसाठी उभारण्याच्या तयारीत आहेत. याबाबत काय सांगाल?' असा प्रश्न पत्रकाराने चंद्रकांत पाटलांना विचारला होता.
यावर बोलताना चंद्रकांत पाटील म्हणालेले की, 'तुम्ही आता फारच खोलात चालला आहात म्हणून तुम्हाला एक सांगतो. फसवं समाधान हवं असेल तर घ्या. दाखला मिळाल्यानंतर त्याआधारे निवडणूक, शिक्षणासाठी प्रवेश, नोकरी मिळत नाही. त्यासाठी पडताळणी लागते, व्हेरिफिकेशन लागतं जे व्हेरिफिकेशन मिळताना सगळं बारीक, बारीक गोष्टी पाहिल्या जातात. त्यातील बरेच दाखले समाधान म्हणून कुणबी दाखला मिळाला.. पण व्हेरिफिकेशनमध्ये दाखले टिकत नाही.'
'त्यामुळे लगेच या दाखल्यावर निवडणुका लढवता येणार नाही. पण पुन्हा एकदा.. मुख्यमंत्री हे फारच सकारात्मक आहेत. जसं काल त्यांनी अॅडमिशनचं 6 महिने एक्सटेन्शन दिलं तसं 6 महिने एक्सटेन्शन देतील. पण 6 महिन्यानंतर का होईना जर नोंदी नीट जुळल्या नाहीत तर निवडणूक रद्द होईल.'