ग्राउंड रिपोर्ट: सोलापुरात कोण जिंकणार? जयकुमार गोरे, मोहितेंचं नाव घेत लोकं बोलले रोखठोक!
सोलापूर विधान परिषद निवडणूक विविध कारणांनी आणि राजकीय घडामोडींमुळे विशेष चर्चेत आहे. मात्र सोलापूरच्या नागरिकांना येथे सुरू असलेल्या राजकारणाबाबत काय वाटतंय हेच मुंबई Tak ने जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT

नितीन शिंदे, सोलापूरः सध्या राज्यभर विधान परिषद निवडणुकीची चर्चा रंगली आहे. त्यामध्ये सोलापूर विधान परिषद निवडणूक विविध कारणांनी आणि राजकीय घडामोडींमुळे विशेष चर्चेत आहे. या निवडणुकीकडे पंढरपूरमधील व्यापारी, सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी आणि विविध क्षेत्रांतील नागरिक कसे पाहतात, त्यांच्या भावना आणि अपेक्षा काय आहेत, हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला.
सोलापूरचा ग्राऊंड रिपोर्ट
एका ज्येष्ठ नागरिकांनी सांगितले की, विधान परिषद ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून येणाऱ्या प्रतिनिधींची निवडणूक आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रश्न विधान परिषदेत प्रभावीपणे मांडण्यासाठी सक्षम लोकप्रतिनिधी निवडून जाणे आवश्यक आहे. मात्र सध्या निवडणूक व्यक्ती आणि पक्षांभोवती फिरताना दिसत असून स्थानिक प्रश्न दुय्यम ठरत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या समस्या सोडवण्यासाठी लढणारा आणि प्रश्न मांडणारा उमेदवार निवडून जाणे गरजेचे आहे.
राजकीय गणिताबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, सध्या भाजप, शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याकडे संख्याबळ असल्याने महायुतीची बाजू मजबूत दिसत आहे. मात्र निवडणुकीत लोकांच्या मूलभूत प्रश्नांवर चर्चा होताना दिसत नाही. नीट परीक्षेचा प्रश्न, युवकांचे प्रश्न आणि वाढती बेरोजगारी यांसारख्या गंभीर विषयांकडे दुर्लक्ष होत असल्याचे त्यांनी नमूद केले.
दुसऱ्या एका नागरिकाने निवडणुकीचे चित्रण करताना म्हटले की, एका बाजूला पैशाची ताकद आणि दबावाचे राजकारण आहे, तर दुसऱ्या बाजूला प्रामाणिकपणाची लढाई आहे. मतदानाचा अधिकार नसला तरी हे मतदार जनतेनेच निवडून दिलेले आहेत. त्यामुळे त्यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्याचा विचार करून प्रामाणिक आणि लोकाभिमुख उमेदवाराला संधी द्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.









