‘चोमडेगिरी vs चाटुगिरी’, नाना पटोलेंचा सुटला संयम, संजय राऊतही भिडले
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार वार प्रतिवार सुरू झाले आहेत.
ADVERTISEMENT

काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि खासदार संजय राऊत यांच्यात शाब्दिक वार रंगलेलं दिसलं. या दोन्ही नेत्यांतील राजकीय वादावर पडदा पडत नाही तोच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि खासदार संजय राऊत यांच्यात जोरदार वार प्रतिवार सुरू झाले आहेत. संजय राऊतांनी ही चोमडेगिरी बंद करावी या नाना पटोलेंच्या विधानाला संजय राऊत यांनी चाटुगिरी कोण करतंय हे भविष्यात कळेल, असं म्हणत प्रहार केलाय.
काँग्रेसमध्ये मल्लिकार्जून खरगे हे निर्णय घेत नाहीत, तर राहुल गांधी हे निर्णय घेतात, असं विधान खासदार संजय राऊत यांनी केलं होतं. त्या विधानाबद्दल पत्रकारांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना प्रश्न विचारला.
या प्रश्नावर बोलताना नाना पटोले म्हणाले, “ही चोमडेगिरी संजय राऊत यांनी बंद केली पाहिजे. कारण की ते आमच्या पक्षाचे प्रवक्ते नाही. आणि गांधी परिवारावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं होतं, हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. ज्या परिवाराचं बलिदान आहे. ज्या परिवारांने पंतप्रधान पद सोडलेलं आहे.”
हेही वाचा >> राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का, जितेंद्र आव्हाडांनीही दिला राजीनामा!
“काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर असताना राहुल गांधींनी ते पद सोडलेलं आहे. कार्यकर्त्यांचा आग्रह असतानाही राहुल गांधींनी ते पद घेतलं नाही. मल्लिकार्जून खरगे यांच्या रुपाने एक ज्येष्ठ नेते निवडून आले आहेत. एका अनुभवी व्यक्तीला, एका मागास जातीचे असल्यामुळे संजय राऊत टीका करतात का? हा प्रश्न निर्माण होतो.”










