ShivSena UBT-MNS: 'जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात ते होईल', उद्धव ठाकरेंचं मनसेसोबतच्या युतीवर सर्वात मोठं विधान!

मुंबई तक

'जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिवसेना (UBT) आणि मनसे युतीविषयी मोठं विधान केलं आहे.

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

मुंबई: राज्यातील विधानसभा निकालानंतर महाराष्ट्रातील राजकीय चित्रच पालटून गेलं आहे. एकीकडे भाजप, शिवसेना (शिंदे) हे मजबूत स्थितीत आलेले असताना दुसरीकडे दोन्ही ठाकरे बंधू म्हणजेच शिवसेना (UBT) आणि मनसे यांना आता आपल्या अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे. अशावेळी मागील काही दिवसांपासून दोन्ही ठाकरे लवकरच एकत्र येतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे. त्यातच आज (6 जून) उद्धव ठाकरे यांनी मनसेच्या युतीवर सर्वात मोठं विधान केलं आहे.

'जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल.' असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मनसेसोबतच्या युतीबाबत थेट आणि स्पष्टपणे संकेत दिले आहेत. 

मनसेच्या युतीबाबत उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?

मातोश्रीवर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, 'जे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात आहे ते होईल. मी तुम्हाला एका वाक्यात सांगितलं आहे. त्याच्याबद्दल बाकीचे जे काही बारकावे आहेत ते आम्ही बघतोय.'

हे ही वाचा>> 'मी बोललो होतो की, काश्मीरमध्ये पर्यटकांना मारतील', राज ठाकरेंचा प्रचंड खळबजनक दावा

'संदेश कशाला मी बातमीच देईल ना तुम्हाला.. माझ्या शिवसैनिकांच्या मनात कुठेही संभ्रम नाही. त्यांचे सुद्धा जे काही सैनिक एकमेकांच्या संपर्कात आहेत त्यांच्याही मनात संभ्रम नाही. माझं म्हणणं आहे की, संदेश वैगरे देण्यापेक्षा आम्ही जी काही बातमी द्यायची ती बातमी देऊ.' असं म्हणत उद्धव ठाकरेंनी सध्या चर्चा सुरू असल्याचं जाहीर केलं आहे.

मनसे-शिवसेना (UBT) युतीच्या दिशेने?

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ येत असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर मनसे आणि शिवसेना (UBT) यांच्यातील युतीच्या चर्चांना महत्त्व प्राप्त झाले आहे.
 
राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत सांगितलेले की, "महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी भांडणं आणि वाद या गोष्टी क्षुल्लक आहेत. एकत्र येणं आणि एकत्र राहणं ही काही कठीण गोष्ट नाही." असं राज ठाकरे म्हणालेले.

हे ही वाचा>> 'मी आदर मागितला, मला अपमान मिळाला...', 20 वर्षांपूर्वी राज ठाकरेंनी का सोडलेली शिवसेना?

दरम्यान, राज ठाकरेंच्या याच विधानानंतर उद्धव ठाकरे यांनी देखील महाराष्ट्र हितासाठी आपणही दोन पावलं पुढे येण्यास तयार आहोत असं यावेळी म्हटलं होतं. तेव्हापासूनच हे दोघे भाऊ पुन्हा एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली होती. 

त्यानंतर आता पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंनी युतीबाबत मोठं विधान केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला बरंच उधाण आलं आहे.

मनसे आणि शिवसेना (ठाकरे गट) यांच्यात युती होण्याची शक्यता प्रबळ असली तरी, अंतिम निर्णय अद्याप झालेला नाही. दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी सकारात्मक संकेत दिले असले तरी काही अडचणींमुळे हा निर्णय लांबणीवर पडला आहे. कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आणि अनुकूल राजकीय परिस्थिती यामुळे युतीच्या शक्यतेला बळ मिळाले आहे. तरीही, युती प्रत्यक्षात येण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील चर्चा आणि एकमत महत्त्वाचे ठरणार आहे.

हे वाचलं का?

    follow whatsapp