विश्वास, विकास आणि जनसहभागाचं एक तप!
नरेंद्र मोदींनी पंतप्रधान म्हणून 12 वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. या बारा वर्षात पंतप्रधान मोदींनी केलेल्या कार्याचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष लेखातून घेत जनतेसमोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे.
ADVERTISEMENT

जेव्हा 12 वर्षे पूर्ण होतात, तेव्हा आपण त्याला सामान्यतः 'तप' म्हणतो. 'तप' या शब्दात संघर्ष, अथक प्रयत्न आणि ध्येय साध्य करण्याचा दृढनिश्चय सामावलेला असतो. त्यामुळे, जेव्हा आपण म्हणतो की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाने एक तप पूर्ण केलं आहे, तेव्हा या कालावधीचे मूल्यांकन याच निकषांवर केले पाहिजे. त्या दृष्टिकोनातून, हा काळ सेवा, समर्पण आणि सुशासनाचा सुवर्णकाळ ठरला आहे.
तपस्येचे दोन पैलू आहेत. जर ही तपश्चर्या समाजासाठी असेल, तर समाजालाच त्याचे फायदे मिळतात आणि समाजातील अनेक घटकांना त्याचा लाभ होतो. मोदींच्या तपश्चर्येचा परिणाम भारतातील सामान्य नागरिकांच्या जीवनातील अभूतपूर्व क्रांतीच्या रूपात दिसून येतो. 2014 ते 2026 पर्यंतचा त्यांचा 12 वर्षांचा प्रवास एका परिवर्तनशील युगाचा साक्षीदार आहे. ही केवळ सत्तेची 12 वर्षे नाहीत, तर विश्वास, विकास, सुशासन, सांस्कृतिक पुनर्जागरण आणि लोककल्याण यांचा एक अनोखा संगम आहे.
आज आणखी एक विशेष प्रसंग आहे. मोदींनी निवडून आलेले पंतप्रधान म्हणून सलग 4399 दिवस सेवा बजावली आहे. या काळात त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंचा विक्रम मोडला. काही जणांच्या मते नेहरू आणि मोदी यांची तुलना होऊ शकत नाही. जेव्हा नेहरू पंतप्रधान झाले, तेव्हा भारतीय समाजात असा विश्वास होता की त्यांना पर्याय नाही. मात्र, मोदी पंतप्रधान होईपर्यंत जनता अधिक लोकशाहीवादी झाली होती. त्यांना मतदानाचा हक्क आणि त्याचे महत्त्व समजले होते. लोकांना त्यांच्या आशा-आकांक्षांची स्पष्ट जाणीव झाली होती. सरकार लोकांच्या कल्याणासाठी असते, हेही त्यांना माहीत होते. याच टप्प्यावर मोदींचे सरकार सत्तेवर आले. 2014 मध्ये जनतेने प्रचंड पाठिंब्याने त्यांना असे आव्हान दिले की, जे काँग्रेस पक्ष 50-60 वर्षांत पूर्ण करू शकला नव्हता. हे आव्हान स्वीकारून मोदींनी 'सबका साथ, सबका विकास' हा मंत्र दिला, ज्याचा नंतर 'सबका विश्वास, सबका प्रयास' असा विस्तार झाला. 2014, 2019 आणि 2024 च्या विजयी टप्प्यांनंतर, ते आता भारताला जागतिक नेतृत्व प्रदान करत आहेत.
2014 आणि 2019 च्या स्पष्ट जनादेशानंतर, 2024 मधील विजय हे केवळ एक निवडणुकीतील यश नव्हतं, तर विकास, सुशासन आणि स्थिर नेतृत्वावरील जनतेचा नव्याने निर्माण झालेला विश्वास होता. नरेंद्र मोदी हे 1962 नंतर सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान बनणारे देशाचे पहिले नेते ठरले. जेव्हा जगभरातील अनेक लोकशाही देश राजकीय अस्थिरतेशी झुंजत होते, तेव्हा भारताने स्थिरता, सातत्य आणि निर्णायक नेतृत्वाचा मार्ग निवडला. गेल्या दशकात, भारताने आर्थिक सुधारणा, सामाजिक परिवर्तन, पायाभूत सुविधांचा विकास, राष्ट्रीय सुरक्षा आणि प्रभावी परराष्ट्र धोरणाच्या माध्यमातून स्वतःला एक अधिक सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि प्रभावशाली राष्ट्र म्हणून स्थापित केले आहे. जगभरातील 24 हून अधिक देशांनी त्यांना प्रदान केलेले सर्वोच्च सन्मान याची पुष्टी करतं.









