महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का देणारे बाप-लेक, काय म्हणाले काँग्रेसबद्दल?

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

Tambe Father and Son Vidhan parishad election 2023: नाशिक: राज्यात मागील काही काळापासून प्रत्येक निवडणूक (Election) ही अत्यंत रंजक असल्याचं पाहायला मिळतंय. त्यातही जेव्हा विधान परिषदेची (Vidhan Parishad) निवडणूक असते तेव्हा महाराष्ट्रातील जनतेला काही तर नवं आणि आश्चर्याचा धक्का देणाऱ्या गोष्टी घडतात. असाच एक मोठा धक्का आज काँग्रेसच्या (Congress) तांबे (Tambe) पिता-पुत्रांनी दिला आहे. . (what exactly did father and son who shocked entire maharashtra say about congress party)

नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीसाठी काँग्रेसचे सत्यजीत तांबे हे इच्छुक होते. असं असताना काँग्रेसने ऐन मोक्याच्या क्षणी सत्यजीत तांबेच्याच वडिलांना म्हणजे विद्यमान आमदार सुधीर तांबे यांना काँग्रेसचं उमेदवार म्हणून जाहीर केलं. पण काँग्रेसच्या या अतंर्गत राजकारणासाठी मुरब्बी बाप-लेक हे सज्ज होते. त्यांनी देखील अगदी शेवटच्या क्षणी एक अशी खेळी केली ज्याने फक्त काँग्रेस पक्षालाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला आश्चर्याचा धक्का दिला.

विधान परिषद निवडणूक 2023: पाच मतदारसंघात कोण कोणाला भिडणार?

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

काँग्रेसने अधिकृत उमेदवार म्हणून सुधीर तांबेंची घोषणा केली, त्यांच्यासाठी एबी फॉर्म देखील पाठवला. मात्र, सुधीर तांबेनी आपल्या मुलासाठी म्हणजेच सत्यजीत तांबेंसाठी आमदारकी न लढविण्याचा निर्णय घेतला. ज्यानंतर सत्यजीत तांबेंनी थेट अपक्ष फॉर्म भरला. ज्यामुळे काँग्रेसमधील नेमकं राजकारण देखील चव्हाट्यावर आलं आहे. या सगळ्या घडामोडीनंतर तांबे पिता-पुत्रांनी माध्यमांशी संवाद साधला. ज्यामध्ये त्यांनी काही गोष्टी उघडउघडपणेच सांगून टाकल्या.

विधान परिषद निवडणूक 2023: महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा भूकंप?

ADVERTISEMENT

पाहा सुधीर तांबे नेमकं काय म्हणाले:

‘काँग्रेस पक्षातर्फे मी नाशिक पदवीधर मतदारसंघातून निवडून आलं आहे. पहिल्या वेळेस मी अपक्ष होतो. पदवीधर मतदारसंघ हा विधानपरिषदेचा वेगळा मतदारसंघ आहे. घटनेमध्ये आपल्या समाजातील जे पदवीधर आहेत त्यांना एक विशेष हक्क घटनेने प्रदान केला आहे. तेव्हा अशा बुद्धीवंत वर्गाचं.. ज्यामध्ये डॉक्टर, इंजिनिअर, शिक्षक आहेत याशिवाय वेगवेगळ्या क्षेत्रातील जे पदवीधर आहेत. अशा सुज्ञ लोकांचं प्रतिनिधित्व मला करण्यास मिळालं आहे 13 वर्ष. मी खूप काम केलं आहे या सर्व लोकांसाठी. पदवीधर मतदारसंघाला एक वेगळा आयाम देण्याचा मी प्रयत्न केला.’

ADVERTISEMENT

‘हे सगळं करत असताना मला जाणवलं की, औद्योगिक क्षेत्र पण आहे ज्यामध्ये खूप वेगवेगळे विषय आहेत. तंत्रज्ञान बदलत चाललं आहे. त्यामुळे आम्हाला असं वाटलं की, या ठिकाणी आता एक तरुण नेतृत्व देण्याची गरज आहे.’

‘आपल्याला माहिती आहे की, राज्यात आता तरुण मुलं ही नेतृत्व करतायेत. त्यामध्ये सत्यजीत तांबे हे व्हिजन आणि दृष्टीकोन असलेला एक चांगलं नेतृत्व आहे. वेगवेगळ्या विषयाचं त्यांना सखोल ज्ञान आहे. त्यामुळे असं एक नेतृत्व द्यावं असं आमचं ठरलं. म्हणून सत्यजीत तांबे यांचा अर्ज आम्ही त्याठिकाणी महाविकास आघाडी म्हणून भरला आहे.’

‘आम्ही फक्त सत्यजीत तांबे यांचाच अर्ज भरला आहे. असं नाही की, कोणी विरोध केला असेल मला वाटत नाही. कारण शेवटी आमच्या पक्षाचं देखील एक धोरण असतं की, तरुण व्यक्तिमत्व आली पाहिजेत. तरुणांना संधी देण्याचं काम काँग्रेसने नेहमीच केलं आहे.’

‘दोन अर्ज आम्ही भरले आहेत… थोडंसं काय झालं की, AB फॉर्म हा माझ्या नावाने आलेला होता. थोड्या तांत्रिक अडचणी आहेत. परंतु इथे काही चिन्ह नसतं.. या निवडणुकीत चिन्ह नसतं.. त्यामुळे महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून सत्यजीत तांबे निवडणूक लढवतील.’

‘कसं असतं की, चांगलं तरुण व्यक्तिमत्व आहे. इथे बऱ्याच गोष्टी अशा असतात की, पक्षाच्या पलीकडेही विचार करावा लागतो. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की, सर्वच पक्ष हे सत्यजीत यांना मदत करतील.’

‘भाजपची भूमिका काय आहे ते मला माहित नाही. शेवटी त्यांचा पक्षही मोठा आहे. पण मला काही त्यांची ऑफर नव्हती.’ अशी प्रतिक्रिया सुधीर तांबे यांनी माध्यमांशी बोलताना दिली.

यानंतर सुधीर तांबेंचा पुत्र सत्यजीत तांबे यांनी देखील माध्यमांशी संवाद साधून नेमकी त्यांची काय भूमिका आहे हे स्पष्ट केलं.

नाशिक विधान परिषद: सर्वात मोठी बातमी, सत्यजीत तांबेंनी भरला अपक्ष फॉर्म

पाहा सत्यजीत तांबे नेमकं काय म्हणाले:

‘असं आहे की, आम्ही काँग्रेस पक्षाकडे मागणी केली होती की, यावेळेस काँग्रेसमधील अनेक लोकांची मला उमेदवारी देण्याची इच्छा होती. काँग्रेस पक्षाने मात्र, निर्णय घेताना डॉ. सुधीर तांबे यांच्या उमेदवारीचा निर्णय घेतला आणि आज तो दुपारी त्यांनी तो जाहीर केला. त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे शेवटच्या क्षणी मी फॉर्म भरला. तरीपण मी फॉर्म भरताना दोन फॉर्म भरले आहेत. एक काँग्रेसचा आहे आणि एक अपक्ष आहे. परंतु माझ्या नावाचा AB फॉर्म हा वेळेवर येऊ न शकल्यामुळे मला आता अपक्ष म्हणूनच निवडणूक लढवावी लागेल.’

‘परंतु मी उमेदवार काँग्रेस पक्षाचा आहे. काँग्रेसच्या विचारावर आजपर्यंत काम केलं आहे. हे जरी खरं असलं तरी मी सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांना आता भेटणार आहे. सगळ्यांना मी विनंती करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना देखील भेटणार आहे. मी शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या सर्व नेत्यांना भेटणार आहे. मी भाजपच्या सर्व नेत्यांना भेटून विनंती करणार आहे की, राजकीय पक्षाच्या विचारसरणी आणि सीमांच्या पलीकडे जाऊन या निवडणुकीत सर्वांनी माझ्या पाठिशी उभं राहावं. अशी माझी अपेक्षा आहे.’

‘मला सर्वांचा पाठिंबा मिळावा असा मी प्रयत्न करणार आहे. अद्यापपर्यंत मी भाजपच्या कोणत्याही नेत्याशी बोललेलो नाही. इथून पुढच्या काळात मी त्यांच्याशी बोलणार आहे आणि त्यांना विनंती करणार आहे.’

‘हे लक्षात घ्या की, काँग्रेस पक्षाच्या कोट्यात ही जागा आली होती. काँग्रेस पक्षाने निर्णय घ्यायचा होता की, कोण उमेदवार असणार आहे. काँग्रेस पक्षाने निर्णय घेतला की, सुधीर तांबे हे उमेदवार असतील. मात्र, आमच्या परिवारामध्ये, माझे हितचिंतक, मित्र, कार्यकर्ते आणि आमच्या पक्षातील वरिष्ठ नेते ज्यामध्ये आमचे एच के पाटील, थोरात साहेब असतील, नाना पटोले असतील या सगळ्यांशी आमची चर्चा झाली. सगळ्यांनी असं सांगितलं होतं की, सत्यजीत तुम्हीही या ठिकाणी लढू शकता. परंतु वेळेवर जाहीर होताना डॉ. सुधीर तांबेंचं नाव जाहीर झालं. त्यामुळे जो AB फॉर्म आहे तो मला मिळू शकला नाही 3 वाजेपर्यंत. त्यामुळे माझी उमेदवारी ही अपक्ष आहे.’

‘मी सर्व पक्षाच्या नेत्यांना अगदी मनसेपासून सर्वांना विनंती करणार आहे की, एका उदात्त हेतूने राजकारणाच्या पलीकडे जाऊन सर्वांनी माझ्या पाठिशी उभं राहावं मला मदत करावी असा प्रयत्न करणार आहे.’

‘मला असं वाटतं की, माझ्यासारखा कार्यकर्ता 22 वर्ष हा संघटनेमध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत काम करतोय. युवकांचे विविध प्रश्न मांडून आजपर्यंत मी राजकीय प्लॅटफॉर्मवर काम करतोय. आता हेच प्रश्न आता मोठा पटलावर घेऊन ज्यायचे असतील तर विधान परिषदेसारखा चांगला प्लॅटफॉर्म आहे. म्हणून मला जर सगळ्या राजकीय पक्षाने मदत केली तर हे प्रश्न मी अधिक ताकदीने मांडू शकतो.’

‘भाजप मला पाठिंबा देईल की नाही देईल हा त्यांच्या पक्षाच्या प्रश्न आहे. पण मी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांना विनंत करणार आहे की, त्यांनी मला पाठिंबा द्यावा. कारण की, महाराष्ट्राच्या राजकारणाची परंपरा आहे की, एकमेकांना मदत करण्याची भूमिका ठेवली आहे. अनेक विधान परिषदेच्या निवडणुका या आपण बिनविरोध केल्या आहेत. अनेक विधानसभेच्या निवडणुका आपण बिनविरोध केल्या आहेत.’

‘यामुळेच मला असं वाटतं की, मोठ्या मनाने सर्व राजकीय पक्षाने त्यांनी मला पाठिंबा द्यावा.’

‘काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या आणि आमच्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु होत्या. तसेच काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांचीच इच्छा होती की, मी निवडणूक लढवली पाहिजे. परंतु काही तांत्रिक कारणं किंवा विसंवादामुळे मला माहित नाही.. पण डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर झाली.पण माझी उमेदवारी ही काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आहे.’ असं म्हणत सत्यजीत तांबेंनी काँग्रेसमध्ये विसंवाद होता हे मान्य केलं. पण तरीही आपण काँग्रेसपासून काही फारकत घेतलेली नाही असंही स्पष्ट केलं.

    follow whatsapp

    ADVERTISEMENT