‘तुम्ही मला कधीच परकं मानलं नाही…’, ‘ती’ घोषणा करत अजिंक्य रहाणेला रडूच कोसळलं!
अजिंक्य रहाणेने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली आहे. ऑस्ट्रेलियामध्ये संघाला ऐतिहासिक कसोटी मालिका विजय मिळवून देणाऱ्या या 38 वर्षीय खेळाडूने सोशल मीडियावर एक भावनिक संदेश शेअर केला आहे.
ADVERTISEMENT

बातम्या हायलाइट
'आता इथेच विराम...'
अजिंक्य रहाणेची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती
सोशल मीडिया पोस्ट व्हायरल
Ajinkya Rahane Retirement : 2020-21 ची ती मालिका... जिथे कागदावरचा विजय ऑस्ट्रेलियाचा आधीच नक्की मानला जात होता. पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवूड या ऑस्ट्रेलियाच्या भेदक माऱ्यासमोर भारतीय फलंदाजांचे भवितव्य धूसर दिसत होते. अडचण एवढीच नव्हती, तर संघातले दिग्गज खेळाडू दुखापत आणि वैयक्तिक कारणांमुळे एकापाठोपाठ एक मैदानातून गायब होत होते. अशातच, अडलेलं जहाज बुडणार की वाचणार, याचं उत्तर शोधण्यासाठी एक शांत, संयमी चेहरा पुढे आला तो म्हणजे अजिंक्य रहाणे.
विराट कोहली मायदेशी परतल्यानंतर, राहिला तो फक्त नवख्या, अननुभवी पोरांचा एक ताफा आणि त्यांच्यासमोर कांगारूंचा अजिंक्य मानला जाणारा गढ, गाबा! ऑस्ट्रेलियाच्या प्रत्येक भेदक चेंडूवर भारतीय खेळाडूंचे रक्त-घााम सांडत होते. सामना तासागणिक बदलत होता, आणि विजयाची पारडी दोन्ही बाजूला झुकत होती. संपूर्ण क्रिकेट जगताचा श्वास रोखला गेला होता. अखेर, ऑस्ट्रेलियाचा तो पोलादी मारा आणि चिवट फलंदाजांचे मनसुबे धुळीला मिळाले.
रहाणेच्या त्या शांत पण तितक्याच घातक रणनीतीने ऑस्ट्रेलियन संघाला त्यांच्याच भूमीत असा काही सळो की पळो करून सोडला, की ऑस्ट्रेलियाचा तो भक्कम किल्ला ढासळला. ज्या मालिकेचा शेवट भारताच्या पराभवाने होईल असं मानलं जात होतं, तिथेच भारताने 2-1 असा ऐतिहासिक विजय मिळवून बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर आपलं नाव कोरलं! भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून देणारा अजिंक्य रहाणे आज क्रिकेटच्या सर्व प्रकारांमधून निवृत्त होत आहे.
गुरुवारी, 30 जुलै रोजी अजिंक्यने आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर एक भावूक पोस्ट शेअर करत आपल्या उत्कृष्ट कारकिर्दीला पूर्णविराम दिला. इंडियन प्रीमियर लीग (IPL) च्या गेल्या हंगामात कोलकाता नाइट रायडर्स (KKR) चे नेतृत्व करणाऱ्या रहाणेने स्पष्ट केले आहे की, तो आता आयपीएलसह कोणत्याही स्वरूपातील क्रिकेट खेळणार नाही. निवृत्तीची घोषणा करताना 38 वर्षीय अजिंक्य रहाणेने लिहिले, "कॅप नंबर 287, आता इथेच विराम. इतक्या वर्षांत मिळालेल्या अफाट प्रेमाबद्दल आणि पाठिंब्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार. मी तुमचा नेहमीच ऋणी राहीन." या संदेशाद्वारे त्याने आपले चाहते, सहकारी खेळाडू, प्रशिक्षक आणि भारतीय क्रिकेटशी जोडल्या गेलेल्या प्रत्येकाचे आभार मानले.
