'त्या' केससाठी जावई बनला हैवान, सासरकडील लोकांवर थेट चाकूने हल्ला!
A shocking incident took place in Ballarpur, Chandrapur, after a dispute broke out between a son-in-law and his in-laws over withdrawing a divorce case. The dispute escalated when the son-in-law allegedly attacked three people, including his two brothers-in-law, with a knife.
ADVERTISEMENT

चंद्रपूर: महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूरमध्ये कौटुंबिक वादातून चाकू हल्ल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घटस्फोटाचा सुरू असलेला खटला मागे घेऊन पत्नीला आपल्या सोबत पाठवण्याची मागणी घेऊन सासरी गेलेल्या जावयाचा वाद विकोपाला गेला. यानंतर आरोपीने पत्नीच्या दोन भावांवर आणि मध्यस्थी करण्यासाठी आलेल्या त्यांच्या मित्रावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून, दोन्ही भावांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे. दरम्यान, घटनेनंतर फरार झालेल्या आरोपी जावयाला बल्लारपूर पोलिसांनी अटक केली आहे.
2021 मध्ये लग्न, त्यानंतर वादाला सुरुवात
मिळालेल्या माहितीनुसार, सानिया मिर्झा यांचा वर्ष 2021 मध्ये चंद्रपूर येथील शहानवाज हुसेन शेख जमीर याच्यासोबत विवाह झाला होता. लग्नानंतर काही काळातच दोघांमध्ये वाद सुरू झाल्याचे सांगण्यात येते. त्यानंतर सानिया आपल्या मुलासह बल्लारपूर येथे वडिलांच्या घरी राहू लागल्या. पतीविरोधात चंद्रपूरमध्ये प्रकरण दाखल असल्याचे सांगण्यात येत असून, दोघांमधील घटस्फोटाचा खटला न्यायालयात सुरू असल्याची माहिती आहे.
‘घटस्फोटाची केस मागे घ्या, पत्नीला माझ्यासोबत पाठवा’
मंगळवारी, 1 सप्टेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास शहानवाज हा आणखी एका तरुणासोबत अॅक्टिव्हावरून बल्लारपूरमधील बुद्धनगर वॉर्डातील विश्वशांती चौक, टीचर कॉलनी परिसरात असलेल्या सासरच्या घरी पोहोचला. त्याच्यासोबत आलेला तरुण बाहेरच थांबला, तर शहानवाज घरात गेला.
हे ही वाचा>> अडीच वर्षांपासून बहिणीसोबत प्रेमसंबंध, भावाने दारूत विष मिसळून प्रियकराला संपवलं
पोलिसांच्या माहितीनुसार, शहानवाजने सासरच्यांकडे घटस्फोटाचा सुरू असलेला खटला मागे घेण्याची आणि पत्नीला आपल्या सोबत पाठवण्याची मागणी केली. यावर सासऱ्यांनी न्यायालयात प्रकरण सुरू असल्याचे सांगत, सानियाला स्वतःचा निर्णय घेऊ द्यावा, अशी भूमिका घेतली. याच मुद्द्यावरून दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला.
