Mumbai Hit and Run Case : मुंबईतील घाटकोपर परिसरात 5 फेब्रुवारी रोजी घडलेल्या भीषण अपघाताने एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झालंय. “माझा काय दोष होता? आम्ही आमच्या जगात आनंदात होतो. पण एका अल्पवयीन मुलाने बेदरकारपणे कार चालवल्यामुळे माझ्या संसारातील सुख हिरावले गेले आणि मला या खाटेवर खिळवून ठेवले,” अशा हृदयद्रावक शब्दांत जखमी मीनल पटेल यांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. पतीचा मृत्यू आणि स्वतःच्या गंभीर जखमांमुळे त्या सध्या रुग्णालयात उपचार घेत असून शारीरिक तसेच मानसिक यातनांना सामोरे जात आहेत.
ADVERTISEMENT
अधिकची माहिती अशी की, 33 वर्षीय ध्रूमिल प्रेमजी पटेल आणि त्यांची पत्नी मीनल हे स्कूटीवरून जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या कारने त्यांना जोरदार धडक दिली. ही कार एका अल्पवयीन मुलाकडून चालवली जात असल्याचे समोर आले आहे. परवाना नसताना आणि कोणतीही जबाबदारी न बाळगता वाहन चालवणाऱ्या या मुलाच्या निष्काळजीपणामुळे ध्रूमिल गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर पटेल कुटुंबावर शोककळा पसरली आहे.
हेही वाचा : सोलापूर : आई-वडील झोपेतून उठेनात दोन्ही मुली चिंतेत, समोरचं दृश्य पाहून काळजात धस्स झालं, नेमकं काय घडलं?
रुग्णालयातील खाटेवरून मीनल पटेल यांनी सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओत आपबीती सांगताना अश्रूंना वाट मोकळी करून दिली. “आमची काहीच चूक नव्हती, तरी शिक्षा आम्हालाच मिळत आहे. माझा नवरा गेला, मी चालू शकत नाही, आणि आरोपी अल्पवयीन मुलगा अजूनही बेधडक फिरत आहे. त्याला कसलेच दुःख किंवा पश्चात्ताप नाही. हा न्याय आहे का?” असा सवाल त्यांनी केला. त्यांच्या या प्रश्नाने समाजमन हेलावले आहे.
मीनल यांनी महाराष्ट्र सरकार आणि मुंबई पोलिसांकडे न्यायाची मागणी केली असून 1 मार्च रोजी आयोजित ‘कँडल मार्च’मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. “मी माझ्या पायावर उभी राहू शकत नाही, त्यामुळे ही लढाई स्वतः लढू शकत नाही. तुम्ही सर्वांनी ध्रूमिलसाठी आणि माझ्या न्यायासाठी आवाज उठवावा,” अशी भावनिक साद त्यांनी घातली.
दरम्यान, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या वडिलांविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत विविध कलमांनुसार गुन्हा दाखल केला आहे. निष्काळजीपणे अल्पवयीनांच्या हाती वाहन देणाऱ्या पालकांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. हा अपघात केवळ एक दुर्घटना नसून कायद्याचे उल्लंघन आणि पालकांच्या हलगर्जीपणाचे गंभीर परिणाम दाखवणारी घटना असल्याची भावना व्यक्त होत आहे. आता या प्रकरणात पीडितेला न्याय मिळतो का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











