Pune Crime News : भिगवण येथे लग्नासाठी अवघे चार दिवस शिल्लक असताना एका तरुणीचं अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आई आणि भावाच्या डोळ्यात चटणी टाकून दोन आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने पळवून नेल्याने परिसरात प्रचंड संतापाची लाट उसळली आहे. या घटनेच्या निषेधार्थ गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यासमोर आंदोलन केलं असून काही काळासाठी पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरत तीव्र निषेध नोंदवला.
ADVERTISEMENT
मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण झालेल्या तरुणीचे आणि संशयित आरोपींपैकी एका तरुणाचे घर शेजारीच आहे. गेल्या महिनाभरापासून दोघांमध्ये फोनवर संपर्क सुरू असल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, तरुणीचं लग्न ठरलेलं असून अवघ्या चार दिवसांत विवाहसोहळा पार पडणार होता. अशा संवेदनशील टप्प्यावर ही घटना घडल्याने कुटुंबीय चिंतेत आहेत. घटनेच्या वेळी तरुणी घराबाहेर असताना आरोपींनी आई आणि भावाला लक्ष्य केलं. त्यांच्या डोळ्यात चटणी टाकून क्षणभर गोंधळ उडवला आणि त्या संधीचा फायदा घेत तरुणीला जबरदस्तीने वाहनात बसवून पळ काढला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकारामुळे परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
हेही वाचा : मुस्लिमांना देण्यात आलेलं 5 टक्के आरक्षण रद्द, शासन निर्णयात नेमकं काय आहे? कधी देण्यात आलेलं आरक्षण?
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने तपासाला सुरुवात केली. आरोपींचा माग काढण्यासाठी पाच ते सहा विशेष पथकं रवाना करण्यात आली असून विविध ठिकाणी शोधमोहीम सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल कॉल डिटेल्स आणि स्थानिक माहितीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, संतप्त गावकऱ्यांनी पोलीस ठाण्यात जाऊन निषेध व्यक्त केला. आरोपींना तात्काळ अटक करून तरुणीची सुरक्षित सुटका करावी, अशी मागणी करण्यात आली. काही काळासाठी पुणे-सोलापूर महामार्ग रोखून धरत नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. आज भिगवण बंदची हाक देण्यात आली असून याला लोक कसा प्रतिसाद देतात? याकडे सर्वांचे लक्ष आहे.. पोलिसांकडून आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल आणि तरुणीची सुखरूप सुटका केली जाईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेमुळे संपूर्ण परिसर हादरला असून कुटुंबीयांच्या आक्रोशाने वातावरण हेलावून गेलं आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











