Monsoon Update: पावसाने का घेतला अचानक ब्रेक? 'ही' 2 कारणं महत्त्वाची!

मुंबई तक

• 07:00 AM • 11 Jul 2026

Maharashtra Rain Update: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कमी झाल्याचं चित्र दिसत आहे. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे की, मान्सूनने ब्रेक घेतलाय का?

Mumbai Tak
Google CTA

मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून कोकण, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस कोसळत होता. अनेक नद्या दुथडी भरून वाहिल्या, तर काही ठिकाणी पूरस्थितीही निर्माण झाली. मात्र आता राज्यात अचानक पावसाला ब्रेक लागला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील तीन दिवस महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता कमी असल्याचे स्पष्ट केले आहे.

हे वाचलं का?

विशेष म्हणजे, पावसाचा जोर कमी होण्यामागे दोन महत्त्वाची हवामानशास्त्रीय कारणे असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

महाराष्ट्रात पाऊस कमी का होणार?

सध्या संपूर्ण देशात नैऋत्य मान्सून सक्रिय असला तरी त्याला पोषक ठरणाऱ्या हवामान प्रणाली महाराष्ट्रासाठी अनुकूल नाहीत.

1) अरबी समुद्रात पोषक हवामान प्रणाली नाही

सध्या अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र (Low Pressure Area) किंवा इतर प्रभावी हवामान प्रणाली तयार झालेली नाही. साधारणपणे अशा प्रणाली तयार झाल्यानंतर कोकण, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होते.

हे ही वाचा>> मुंबईची खबर : मुंबईत 1700 हून अधिक झाडं कोसळली, तीन मृत्यू, बीएमसीने काय सांगितलं?

यावेळी मात्र अरबी समुद्रात पावसासाठी आवश्यक वातावरण तयार झालेले नसल्यामुळे राज्यातील बहुतांश भागात पावसाचा जोर कमी होणार आहे.

उत्तर भारतात सक्रिय हवामान प्रणाली

सॅटेलाइट चित्रांनुसार उत्तर प्रदेशातील गोरखपूर परिसरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. त्याचबरोबर कमी दाबाचा पट्टाही (Trough) उत्तर भारतातून ईशान्य भारताच्या दिशेने विस्तारलेला आहे.

यामुळे ढगांचा मोठा समूह उत्तर आणि ईशान्य भारताकडे सरकत असून महाराष्ट्राच्या दिशेने पुरेशा प्रमाणात ढगांची निर्मिती होत नाही. परिणामी राज्यात मुसळधार पावसासाठी आवश्यक वातावरण निर्माण होत नाही.

दुसरे मोठे कारण म्हणजे MJO

हवामान खात्याने पावसामध्ये घट होण्यामागे Madden-Julian Oscillation (MJO) हा महत्त्वाचा घटक असल्याचे सांगितले आहे.

सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, विषुववृत्ताजवळ ढगांचा एक मोठा पट्टा सतत पूर्वेकडे सरकत असतो. हा पट्टा भारताजवळ असताना पावसासाठी अनुकूल परिस्थिती तयार होते.

हे ही वाचा>> आधी एल निनो, आता टायफून बावी, महाराष्ट्र मान्सूनवर परिणाम होणार?

मात्र सध्या या प्रणालीचा कोरडा (Dry Phase) भाग भारताच्या दिशेने आला असून पाऊस निर्माण करणारा सक्रिय भाग पूर्वेकडे सरकला आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह देशातील अनेक भागांमध्ये पावसाचा वेग मंदावला आहे. तज्ज्ञांच्या मते, MJO ला एक संपूर्ण फेरी पूर्ण करण्यासाठी साधारण 30 ते 60 दिवस लागतात.

पुढील तीन दिवसांचा IMD चा अंदाज

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार शुक्रवार आणि शनिवार या दोन्ही दिवशी महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये कोणताही मोठा पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस किंवा तुरळक सरी पडू शकतात. मात्र अतिमुसळधार किंवा मुसळधार पावसाची शक्यता अत्यल्प आहे.

रविवारी केवळ विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

  • नागपूर
  • वर्धा
  • भंडारा
  • गोंदिया
  • चंद्रपूर
  • गडचिरोली

या भागांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

कोकण आणि मुंबईला दिलासा

गेल्या आठवडाभरात मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टी झाली होती. मात्र पुढील काही दिवस या भागांमध्ये कोणताही रेड, ऑरेंज किंवा यलो अलर्ट देण्यात आलेला नाही.

कुठे झाला सर्वाधिक पाऊस?

जुलैच्या पहिल्या आठवड्यात राज्यातील अनेक भागांमध्ये सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे.

  • गोंदिया
  • भंडारा
  • नागपूर
  • वर्धा
  • चंद्रपूर
  • पुणे
  • सातारा
  • सांगली

या भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे.

मराठवाड्यात अजूनही पावसाची तूट

दुसरीकडे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अजूनही पावसाची कमतरता कायम आहे.

  • बीड
  • परभणी
  • हिंगोली
  • धाराशिव
  • नांदेड
  • सोलापूर

या भागांमध्ये सरासरीपेक्षा कमी पावसाची नोंद झाली असून शेतीसाठी अजून चांगल्या पावसाची गरज आहे.

एल निनोमुळे वाढली चिंता

हवामान तज्ज्ञांच्या मते यंदा एल निनोचा प्रभाव कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात काही भागांमध्ये पावसाचे प्रमाण कमी राहू शकते.

मात्र हवामानातील बदलत्या परिस्थितीनुसार अरबी समुद्र किंवा बंगालच्या उपसागरात नवीन कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यास महाराष्ट्रात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढू शकतो.

सध्या मात्र हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांमध्ये मुसळधार पावसापासून दिलासा मिळण्याची शक्यता आहे.