छाया काविरे, पुणे: पुणे शहर पुन्हा एकदा गँगवारच्या छायेत दिसतंय. नुकत्याच नाना पेठेत झालेल्या टोळीयुद्धात 19 वर्षाच्या आयुष कोमकरची निर्दयपणे हत्या करण्यात आली. ऐन गणेशविसर्जनाच्या काळात झालेल्या या हत्येने पुणे हादरलं. अशातच ही घटना ताजी असतानाच पुण्यातल्या कोथरुड भागात मध्यरात्री किरकोळ कारणावरून गोळीबार झाल्याची घटना घडलीय. हा गोळीबार दुसरं कोणी नाही तर कुख्यात निलेश घायवाळ टोळीकडून करण्यात आलाय. या फायरिंगमध्ये एक जण गंभीर जखमी झालाय. महत्वाचं म्हणजे फायरिंगचं कारणं जर तुम्ही ऐकलंच तर तुम्हालाही धक्का बसेल. त्यामुळे पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं? कोण आहे घायवाळ गॅंग? आणि हा गोळीबार नक्की का करण्यात आला? याबाबत सविस्तर जाणून घेऊया.
ADVERTISEMENT
पुण्यात मध्यरात्री नेमकं काय घडलं?
तर घडलं असं की, कोथरूडमधल्या एका चौकात मध्यरात्री ‘रस्ता न दिल्याचा’ वाद चिघळला. एका चारचाकी वाहनचालकाने घायवळ टोळीच्या गुंडाना पुढे जायला साईड दिली नाही. त्यामुळे घायवळ गॅंगचा मुसा शेख, रोहित आखाडे, गणेश राऊत आणि मयूर कुंभारे यांना संताप आला. आणि संतापात घायवळ गँगच्या या गुंडांनी कारमधल्या प्रकाश धुमाळ नावाच्या व्यक्तीवर गोळीबार केला. मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास कोथरुडमधल्या शिंदेचाळ परिसरात हा थरार घडलाय. या घटनेत चारचाकी चालक प्रकाश धुमाळ गंभीर जखमी झालेत. त्यांना तीन गोळ्या लागल्या असून सह्याद्री रुग्णालयात प्रकाश धुमाळ यांच्यावर उपचार सुरूय. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी मयूर कुंभारे याने गोळ्या झाडल्या, गोळ्या धुमाळच्या मानेला आणि मांडीला लागल्या.
हे ही वाचा>> तरुण गेला वेश्याकडे अन् केली मौज मज्जा, नंतर ऑनलाईन पैसे देताना विसरला पासवर्ड, महिलांनी मिळून तुडव तुडव तुडवला अन्...
कोण आहे निलेश घायवळ?
आता ज्या घायवाळ गँगने हा सगळा थरार केलाय त्यांचा मुखिया निलेश घायवाळ नक्की कोण आहे? तर निलेश घायवळ हा पुण्यातला कुख्यात गुन्हेगार म्हणून ओळखला जातो. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणं, मारामारी आणि दहशत पसरवणं यासारखे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. पुण्यातल्या कोथरुड, मुळशी आणि इतर परिसरात त्याच्या गुन्हेगारी कारवायांची दहशत आहे.
निलेश घायवळचा जन्म पुण्यातच झाला. त्याने पुण्यातच M.COM पर्यंतच शिक्षण पूर्ण केलंय. शिक्षण पूर्ण केल्यानंतर तो गुन्हेगारी विश्वाकडे वळला आणि गजानन मारणे या दुसऱ्या कुख्यात गुन्हेगाराच्या संपर्कात आला. त्यावेळी या दोघांनीही एकत्र अनेक गुन्हे केले, त्यापैकी एका गुन्हेगाराच्या खुनाच्या प्रकरणात त्यांना सात वर्षांची शिक्षा झाली. पुढे तुरुंगातून सुटका झाल्यानंतर आर्थिक व्यवहार आणि वर्चस्वाच्या मुद्द्यावरून त्यांच्यात वाद झाला, ज्यामुळे दोघांचे मार्ग वेगळे झाले. मारणेसोबत फूट पडल्यानंतर घायवळने स्वतःची गुन्हेगारी टोळी तयार केली. आणि कोथरुड, मुळशी आणि पुणे शहरातल्या इतर भागात आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं. जमीन व्यवहार, खंडणी आणि दलालीतून त्याने करोडो रुपये कमावले.
हे ही वाचा>> 'कृष्णा आंदेकरची माहिती दे, नाहीतर एन्काऊंटरच...' पोलिसांच्या फोनने हातभर... अन् थेट सरेंडर
पुढे घायवळ आणि मारणे यांच्यातल्या वादामुळे पुण्यात टोळीयुद्ध भडकलं. या वादात अनेक खून, हल्ले आणि हिंसक घटना घडल्या. 2009 मध्ये मारणे टोळीने घायवळच्या खुनाचा प्रयत्न केला. त्यानंतर 2010 मध्ये दत्तवाडी परिसरात गोळीबार करून सचिन कुडले याचा खून करण्यात आला होता. सचिन कुडले हा मारणे टोळीशी संबंधित होता. या खुनाच्या प्रकरणात निलेश घायवळला अटक झाली होती. तर घायवळ टोळीतल्या 13 जणांना पुणे जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार करण्यात आलं होतं. त्याच्यावर आणि त्याच्या टोळीवर मकोका अंतर्गत कारवाई झाली. त्याला येरवडा तुरुंगात स्थानबद्ध करण्यात आलं. मात्र 2019 मध्ये उच्च न्यायालयाने त्याला जामीन मंजूर केला, ज्यामुळे तो पुन्हा सक्रिय झाला. यामुळे पोलिसांची डोकेदुखी वाढली.
2020 मध्ये त्याच्या टोळीतल्या एका सदस्याला पिस्तूल आणि काडतुसांसह अटक करण्यात आली. या दरम्यान मारणे टोळीने घायवळ टोळीतला पप्पू गावडे आणि अमोल बधे यांचे खून केले, ज्यामुळे हा संघर्ष आणखीणच तीव्र झाला. घायवळवर पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरात 23-24 गंभीर गुन्हे दाखल आहेत.
आता कोथरूडमध्ये किरकोळ वादातून झालेल्या या गोळीबारामुळे नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होतेय. कोमकर याच्या हत्येनंतर पोलिसांचा गुंडावर वचक राहिला नाहीय का? असा प्रश्न विचारला जातोय. फक्त साईड दिली नाही म्हणून कारमधल्या व्यक्तीवर गोळीबार करण्यापर्यंत गुंडांची मजल गेली असल्याचा संतापसुध्दा व्यक्त केला जातोय. तर, दुसरीकडे जखमी प्रकाश धुमाळ यांचा संबंध घायवाळ टोळीशी असल्याचं सांगितलं जातंय. सध्या हे चारही आरोपी फरार आहेत. या प्रकरणात पुढे काय होईल हे पाहणं महत्वाचं असणार आहे.
ADVERTISEMENT
