Akola Violence : दगडफेक-जाळपोळ अन् गोळीबार; दोन गटात तुफान राडा का झाला?

मुंबई तक

14 May 2023 (अपडेटेड: 14 May 2023, 04:13 AM)

akola violence : अकोला शहरात शनिवारी (13 मे) रात्री हिंसेची ठिणगी पडली. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेला जमाव हिंसक झाला आणि तोडफोड सुरू केली. त्यानंतर दुसऱ्या बाजूचा जमाव आला आणि वाद पेटला. दगडफेक आणि प्रचंड जाळपोळ दोन्ही गटांनी केली.

stone pelting in akola after two group clashes

stone pelting in akola after two group clashes

follow google news

akola violence news : अकोला शहरात शनिवारी (13 मे) रात्री हिंसेची ठिणगी पडली. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेलेला जमाव हिंसक झाला आणि तोडफोड सुरू केली. त्यानंतर दुसऱ्या बाजूचा जमाव आला आणि वाद पेटला. दगडफेक आणि प्रचंड जाळपोळ दोन्ही गटांनी केली. जमाव नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागला. रात्री उशिरा परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलं असून, शहरातील तीन पोलीस ठाणे क्षेत्रात कलम 144 लागू करण्यात आलं आहे. या घटनेत काही नागरिक जखमी झाले आहेत.

हे वाचलं का?

अकोला शहरात झालेल्या या हिंसेला एक सोशल मीडियावरील पोस्ट कारणीभूत ठरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार सोशल मीडियावर एका धर्माच्या धर्मगुरूबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करण्यात आली होती. इन्स्टाग्राम लिहिण्यात आलेली पोस्ट व्हायरल झाली.

अकोल्यात हिंसाचार कसा सुरू झाला?

त्यानंतर या प्रकरणाची तक्रार करण्यासाठी लोकांचा एक गट पोलीस ठाण्यात गेला. पोलिसांनी गटाने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवून घेतला, मात्र त्यानंतर पोलीस ठाण्याबाहेर या गटाने अचानक वाहनांची तोडफोड करण्यास सुरुवात केली. जमाव हिंसक झाला आणि दगडफेकही सुरू केली.

हा प्रकार सुरु झाल्यानंतर तिथे दुसरा गटाचे लोक आले. दोन्ही गट समोरासमोर आल्यानंतर परिस्थिती आणखी बिघडली आणि दोन्ही बाजूंनी प्रचंड दगडफेक सुरू झाली. जवळपास तासभर ही दगडफेक सुरू होती.

हेही वाचा >> आर्यन खान प्रकरणात 25 कोटी खंडणीची मागणी, समीर वानखेडेंच्या घरात काय सापडलं?

अकोला शहरातील गंगाधर चौक, पोळा चौक, हरिहर पेठ या परिसरात दगडफेकीच्या घटना घडल्या. दोन्ही बाजूच्या गटांनी वाहनांची तोडफोड केल्यानंतर ती पेटवून दिली.

अग्रिशामक दलाचे जवान जखमी

आग विझवण्यासाठी आलेल्या अग्रिशामक दलाच्या गाड्यांना आणि जवानांनाही हिंसक झालेल्या जमावाने लक्ष्य केलं. गाड्यांना आग लावली. यात जवान जखमी झाले आहेत.

अश्रुधुरांचा मारा, हवेत गोळीबार

हिंसेचा आगडोंब उसळल्यानंतर पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरुवातीला अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. तसेच हवेत गोळीबारही केला. जवळपास तासाभराने परिस्थिती नियंत्रणात आणण्यात पोलिसांना यश आलं.

बाहेरच्या जिल्ह्यातून पोलिसांना पाचारण

शहरात झालेल्या हिंसाचारानंतर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी शहरात अकोला ग्रामीण पोलिसांना बंदोबस्तासाठी बोलवण्यात आलं. त्याचबरोबर वाशिम, बुलढाणा, अमरावती येथूनही पोलिसांच्या तुकड्या सुरक्षेसाठी बोलावण्यात आल्या आहेत.

हेही वाचा >> Sunil Kanugolu : काँग्रेसला दिलं कर्नाटक जिंकून! कोण आहेत कानुगोलू?

हिंसाचारात सहभागी असलेल्याची धरपकड पोलिसांनी सुरू केली असून, रात्रीतून पोलिसांनी 15 संशयितांना ताब्यात घेतलं आहे. परिस्थिती नियंत्रणात असली, तरी तणावपूर्ण शांतता असून, अचानक झालेल्या या हिंसाचारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

    follow whatsapp