Jalgaon Crime, जळगाव : मुलगा व्हावा या अंधश्रद्धा आणि मानसिकतेतून पुन्हा एकदा समाजाला हादरवणारी घटना जळगाव जिल्ह्यात उघडकीस आली आहे. आधीच तीन मुली असताना चौथ्यांदा देखील मुलगी जन्माला आल्याच्या रागातून एका निर्दयी बापाने स्वतःच्या तीन दिवसांच्या नवजात कन्येची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मोराड (ता. जामनेर) येथे घडला. सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्यात आले होते. मात्र, तब्बल सव्वा महिन्यानंतर पोलिसांच्या सखोल तपासातून हा खुनाचा प्रकार असल्याचे उघड झाले असून, आरोपी वडिलाला अटक करण्यात आली आहे.
ADVERTISEMENT
कृष्णा लालचंद राठोड (वय 26, रा. मोराड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. 13 नोव्हेंबर 2025 रोजी पहूर पोलिस ठाण्यात या नवजात बालिकेच्या मृत्यूची नोंद ‘आकस्मिक मृत्यू’ म्हणून करण्यात आली होती. घरातील सदस्यांकडूनही बाळाचा अचानक मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले होते. त्यामुळे सुरुवातीला या प्रकरणात कोणताही संशय व्यक्त करण्यात आला नव्हता.
मात्र, तपास पुढे सरकत असताना पोलिसांना काही बाबी संशयास्पद वाटू लागल्या. कुटुंबीयांनी दिलेल्या जबाबांमध्ये वेळोवेळी बदल दिसून येत होते. बाळाच्या मृत्यूबाबत सांगितल्या जाणाऱ्या कारणांमध्ये एकवाक्यता नसल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. याच दरम्यान शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. वैद्यकीय अहवालात नमूद करण्यात आलेल्या जखमांमुळे पोलिसांचा संशय अधिकच बळावला.
हेही वाचा : महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसची पहिली उमेदवार यादी जाहीर, पाहा कोणाला मिळाली संधी?
सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद नंदकुमार शिंब्रे आणि पोलिस उपनिरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकाने या प्रकरणाचा नव्याने छडा लावण्यास सुरुवात केली. वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा, घटनास्थळाची पाहणी आणि कुटुंबीयांची स्वतंत्र चौकशी करण्यात आली. अखेर आरोपी कृष्णा राठोडला पोलिसांनी ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता, धक्कादायक सत्य समोर आले.
चौथी मुलगी जन्माला आल्यामुळे तो मानसिक तणावात होता. समाजात ‘मुलगा हवा’ या विचारातून आणि घरात वाढणाऱ्या जबाबदाऱ्यांच्या भीतीने तो संतप्त झाला होता. याच रागातून त्याने जन्मानंतर अवघ्या तिसऱ्या दिवशी झोपलेल्या बाळाच्या डोक्यात लाकडी पाट मारून तिची हत्या केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली. त्यानंतर हा प्रकार लपवण्यासाठी कुटुंबीयांच्या मदतीने मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव करण्यात आला.
सव्वा महिन्यानंतर सत्य समोर येताच संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. एका निष्पाप, केवळ तीन दिवसांच्या जीवाचा बळी अंधश्रद्धा आणि लैंगिक भेदभावामुळे गेला असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेने मुलींच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











