'तुमची पण अशीच परिस्थिती होईल!' गुहागरमध्ये प्रशासनाची अरेरावी; पोलीस बंदोबस्तात घर पाडल्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश, व्हिडिओ

Guhagar News : 'तुमची पण परिस्थिती अशीच होणार, तुम्ही बिनपाण्याचे जाणार, लक्षात ठेवा लिहून घ्या, कळलं?' हे उद्गार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील तवसाळ गावातील एका महिलेचे. सध्या गुहागर रेवस-रेडी सागरी महामार्गावरील जगबुड खाडी पुलाचे काम चालू आहे. त्या कामात तवसाळ गावातील तवसाळकर कुटुंबियांचे घर अडथळा ठरत असल्याने पोलिसांच्या फौजफाट्यात ते पाडण्यात आले. यावेळी एका प्रशासकीय अधिकाऱ्याला जाब विचारताना महिलेने वरील उद्गार काढले आहेत.

Guhagar News

Guhagar News

मुंबई तक

08 Mar 2026 (अपडेटेड: 08 Mar 2026, 03:15 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

तुमची पण अशीच परिस्थिती होईल!

point

गुहागरमध्ये प्रशासनाची अरेरावी

point

पोलीस बंदोबस्तात घर पाडल्यानंतर कुटुंबीयांचा आक्रोश

Guhagar News, गोकुळ कांबळे : 'तुमची पण परिस्थिती अशीच होणार, तुम्ही बिनपाण्याचे जाणार, लक्षात ठेवा लिहून घ्या, कळलं?' हे उद्गार आहेत रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील तवसाळ गावातील एका महिलेचे. सध्या गुहागर रेवस-रेडी सागरी महामार्गावरील जगबुड खाडी पुलाचे काम चालू आहे. त्या कामात तवसाळ गावातील तवसाळकर कुटुंबियांचे घर अडथळा ठरत असल्याने पोलिसांच्या फौजफाट्यात ते पाडण्यात आले. यावेळी एका प्रशासकीय अधिकाऱ्याला जाब विचारताना महिलेने वरील उद्गार काढले आहेत. या घटनेचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. या व्हिडिओंमध्ये एका जेसीबीने तवसाळकर कुटुंबियांचे घर पाडले जात असल्याचे दिसत आहे. यावेळी पोलिसांनी त्यांना घेरा घालून अडवून धरल्याचेही दिसून येते. 

हे वाचलं का?

हे ही वाचा : बलात्कार पीडितेकडे गावाला मटण अन् दारुची पार्टी देण्याची मागणी, पंचायतीचा अजब निर्णय; पोलिस काय करताहेत?

जेसीबीच्या सहाय्याने घर पाडले

मिळालेल्या माहितीनुसार, पुलाच्या बांधकामासाठी जागा मोकळी करण्याच्या उद्देशाने प्रशासनाकडून जेसीबीच्या सहाय्याने कारवाई करण्यात आली. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तवसाळकर कुटुंबीयांनी या कारवाईस हरकत घेतली होती. तसेच घर पाडण्यासाठी आपली कोणतीही मान्यता नसल्याचा दावा त्यांनी केला आहे. तरीही प्रशासनाने अरेरावी करत जेसीबीच्या सहाय्याने घर पाडल्याचे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. घर पाडण्याच्या घटनेनंतर तवसाळकर कुटुंबीयांनी घटनास्थळी आक्रोश व्यक्त केला. पोलिसांच्या उपस्थितीत ही कारवाई झाल्याने ग्रामस्थांमध्येही नाराजी व्यक्त होत असल्याचे दिसून आले.

'तुम्ही आधीच तरतूद करुन ठेवायला हवी होती'

तवसाळकर कुटुंबियांचे घर पाडत असतानाचे काही व्हिडिओ समोर आले आहेत. यामध्ये तवसाळकर कुटुंबातील एक पुरुष सदस्य प्रशासकीय अधिकाऱ्याला कळकळीने विनंती करत आहे. जर सगळंच घर तोडलं तर आम्ही काय करणार? सामान वगैरे आहे त्याचं कसं होणार असा प्रश्न ते अधिकाऱ्याला विचारत आहेत. ते पुढे कळवळ्याने म्हणतात की, 'जेवण वगैरे बनवून ठेवलंय. काय करायचं आम्ही? आता आम्हाला पाणी कोण देणार?' यावर प्रशासकीय अधिकारी म्हणतो की, 'तुम्ही या गोष्टींची आधीच तरतूद करुन ठेवायला हवी होती.'

हे ही वाचा : हॉस्टेलमध्ये रक्ताचा सडा, विद्यार्थी झोपेत असतानाच भयानक कांड; नेमकं काय घडलं?

'आम्ही काय करणार सांगा?'

याविषयी समोर आलेल्या एका व्हिडिओत कुटुंबिय म्हणतात की, 'आम्ही घरात झोपलो असताना आम्हाला या लोकांनी बाहेर काढलं आणि पोलिसांनी आम्हाला पकडलं. आमच्या विहिरीचं पाणी बंद केलं, विहिर बुजवली. आता आम्ही पाणी कसं पिणार. उन्हाळ्याचे दिवस सुरु आहेत. आता आम्ही काय करणार सांगा?' या कारवाईमुळे कुटुंबिय हतबल झाल्याचे पहायला मिळाले. 

प्रशासन जर असं जोर जबरदस्ती करुन घरं तोडणार असेल तर सर्वसामान्यांनी काय करायचं असा प्रश्न ग्रामस्थ विचारत आहेत. यानंतर आता पुढे काय कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
 

    follow whatsapp