Pune : तरुणीवर हल्ला! दर्शना पवारचा उल्लेख करत राज ठाकरेंनी कुणाला सुनावलं?

मुंबई तक

28 Jun 2023 (अपडेटेड: 28 Jun 2023, 10:14 AM)

विरोधी पक्षनेते अजित पवारांपासून ते विरोधी बाकावरील सर्व नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत असताना राज ठाकरेंनी प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत.

mumbaitak

mumbaitak

follow google news

Darshana Pawar Murder, Raj Thackeray Post : राजगडाच्या पायथ्याशी एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवारचा मृतदेह आढळल्यानंतर पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रातच खळबळ उडाली. या घटनेला आठ दिवस लोटत नाही, तोच पुणे शहरातील सदाशिव पेठेत गजबलेल्या रस्त्यावर एका तरुणाने तरुणीवर कोयत्याने हल्ला केला. सुदैवाने तरुणी बचावली, पण यामुळे पुणे पोलिसांचा धाक उरलाय का? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे. या दोन्ही घटनांवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भूमिका मांडताना प्रशासनाला धारेवर धरलं आहे. राज ठाकरेंकडून शिंदे-फडणवीस सरकारचा उल्लेख नसणे, हा चर्चेचा मुद्दा ठरू लागला आहे.

हे वाचलं का?

27 जून रोजी पुण्यातील मध्यवर्ती भाग असलेल्या सदाशिव पेठेत थरारक घटना घडली. 18 वर्षीय तरुणीवर एका तरुणाने कोयत्याने हल्ला केला. सकाळी साडेसहा वाजताच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. यशपाल जवळगे या तरुणाने वार रोखला आणि तरुणी थोडक्यात बचावली. या सगळ्या घटनेनंतर पुण्यातील कायदा व सुव्यवस्था चर्चेत आलीये.

हेही वाचा >> PUNE: ‘तो’ देवदूतच… कोयत्याचा वार झेलला, तरुणीला जीवदान देणारा लेशपाल जवळगे आहे तरी कोण?

या प्रकरणावरून राजकीय वर्तुळात बराच गदारोळ होताना दिसतोय. विरोधक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत आहेत. दर्शना पवार हत्याकांडानंतर ही घटना घडल्याने सरकार टीकेचे धनी ठरू लागले आहेत.

राज ठाकरे काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनांवर भाष्य केलं आहे. राज ठाकरे म्हणतात, “काल पुण्यात एका तरुणीवर हल्ल्याची दुर्दैवी घटना घडली. भररस्त्यात बाकीचे लोकं बघत असताना लेशपाल जवळगे नावाचा तरुण तिथे होता म्हणून ती तरुणी बचावली. लेशपालने जे धाडस दाखवलं त्याबद्दल त्याचं मनापासून कौतुक, पण आसपास इतकी लोकं बघ्याच्या भूमिकेत का गेली किंवा जातात ह्याचं आश्चर्य वाटतं. अर्थात पुढे कशाला चौकशीचा ससेमिरा असा विचार लोकांच्या मनात येत असेलही कदाचित पण ह्यासाठी पोलिसांनी लोकांना आश्वस्त करायला हवं.”

हेही वाचा >> PUNE: ‘आता काय गचांडी धरु का?’ म्हणणाऱ्या अजितदादांचा चढला पारा, फडणवीसांवर थेट वार

“दर्शना पवारच्या हत्येची दुर्दैवी घटना नुकतीच घडलेली असताना, तसाच काहीसा प्रकार परत घडणं हे गंभीर आहे. सुशोभीकरणातून लोकांचे डोळे पुरेसे दिपलेत, त्यामुळे प्रशासनाकडून कायद्याचा धाक निर्माण होईल हे देखील बघायला सरकारची हरकत नसावी”, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. एकीकडे विरोधी पक्षनेते अजित पवारांपासून ते विरोधी बाकावरील सर्व नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करत असताना राज ठाकरेंनी प्रशासनाला खडेबोल सुनावले आहेत. त्यामुळेच अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या.

राज ठाकरे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या घटनांवर भाष्य केलं आहे.

हेही वाचा >> Narendra Modi Speech : उद्धव ठाकरेंसाठी भाजपचे दरवाजे अजूनही खुले आहेत?

या घटनांबद्दल भूमिका मांडतानाच राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनाही महत्त्वाचे आवाहन केले आहे. त्यांनी म्हटलं आहे की, “आणि माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगायला नको की असे प्रकार तुमच्या आसपास घडत नाहीत ना ह्याकडे डोळसपणे लक्ष ठेवा आणि वेळीच धावून जा.”

    follow whatsapp