Mumbai News : गणेशोत्सवासाठी आपापल्या गावी जाणाऱ्या मुंबईकरांसाठी राज्य सरकारने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. मुंबईहून कोकणाच्या दिशेने जाणाऱ्या मुंबईकरांना आता मुंबई-गोवा महामार्ग आणि पुणे-बेंगळुरू महामार्गावर टोल भरावा लागणार नाही. गणेशभक्त लवकरात लवकर घरी पोहोचावेत, त्यांना कोणत्याही प्रकारचा आर्थिक फटका बसू नये आणि टोलनाक्यांवरील वाहतूक कोंडीतून त्यांची सुटका व्हावी, या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबतची अधिकृत माहिती दिली आहे.
ADVERTISEMENT
गणेशभक्तांची वाहतूक कोंडीतून सुटका
ही टोलमाफी 11 सप्टेंबर ते 27 सप्टेंबर या कालावधीत गावी जाणाऱ्या आणि उत्सव साजरा करून परतणाऱ्या सर्व गणेशभक्तांसाठी लागू असेल. सामान्यतः मुंबईहून सिंधुदुर्गपर्यंत जाण्यासाठी 650 रुपयांपेक्षा जास्त टोल भरावा लागतो, तर मुंबई ते कोल्हापूर प्रवासासाठी सुमारे 700 रुपये टोल द्यावा लागतो. या निर्णयामुळे गणेशभक्तांना टोलच्या त्रासातून दिलासा मिळण्यासोबतच त्यांची मोठी आर्थिक बचतही होणार आहे.
हे ही वाचा : राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा गुजरातला हलवला, राज ठाकरे संतापले, मोदी-शाहांवर हल्लाबोल
विशेष पास कुठे मिळेल?
या निर्णयानुसार मुंबई-गोवा (NH 66), मुंबई-बेंगळुरू (NH 48) आणि मुंबईहून थेट नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल सेतूवरून प्रवास करणाऱ्या वाहनांना टोलमधून सूट मिळणार आहे. याशिवाय महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) रस्त्यांवरही ही सुविधा उपलब्ध असेल. या टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी वाहनांवर विशेष पास लावणे अनिवार्य आहे. 'गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन' नावाचा हा पास जवळच्या पोलीस ठाण्यात किंवा आरटीओ (RTO) कार्यालयात मोफत उपलब्ध होणार असून, त्यावर वाहन क्रमांक आणि चालकाचे नाव लिहिणे आवश्यक आहे.
हे ही वाचा : जास्तीच्या सुट्ट्या पाहिजेत, मग थेट वर्गमित्राच्या हत्येचा कट रचला, पण काय घडलं?
एसटीदेखील टोलमुक्त
खासगी वाहनांप्रमाणेच कोकण आणि कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या एसटीच्या (MSRTC) बसेसही या काळात पूर्णपणे टोलमुक्त राहणार आहेत. एसटी बसेसवरही 'गणेशोत्सव दर्शन' पास लावणे बंधनकारक असून, या पासची संपूर्ण व्यवस्था एसटी महामंडळाकडून करण्यात आली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे लाखो गणेशभक्तांचा प्रवास अधिक सोपा, जलद आणि त्रासमुक्त होणार आहे.
ADVERTISEMENT












