मृतदेहांची अदलाबदल पोलिसांमुळे? खारगरमधील आत्महत्या केलेल्या तरुणाच्या मृतदेहावर भलत्याच कुटुंबाकडून अंत्यसंस्कार

Panvel News : मृतदेहांची अदलाबदल पोलिसांमुळे? खारगरमधील आत्महत्या केलेल्या तरुणाच्या मृतदेहावर भलत्याच कुटुंबाकडून अंत्यसंस्कार

Mumbai Tak

मुंबई तक

27 Oct 2025 (अपडेटेड: 27 Oct 2025, 01:19 PM)

follow google news

बातम्या हायलाइट

point

पनवेलमधील मृतदेहांची अदलाबदल पोलिसांमुळे?

point

खारगरमधील आत्महत्या केलेल्या तरुणाच्या मृतदेहावर भलत्याच कुटुंबाकडून अंत्यसंस्कार

पनवेल : खारघर परिसरात आत्महत्या केलेल्या तरुणाचा मृतदेह दुसऱ्याच कुटुंबाला सुपूर्द झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पनवेल येथील डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनानंतर मृतदेहांची अदलाबदल झाल्याचा आरोप होत असून, पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे ही चूक झाल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांमध्ये संभ्रम आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

हे वाचलं का?

दोन्ही मृत व्यक्ती नेपाळच्या असल्याने अदलाबदल झाल्याची चर्चा 

खारघरमध्ये राहणाऱ्या 26 वर्षीय सुशांत मल्ला या तरुणाने काही दिवसांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या मृतदेहाचे शवविच्छेदन पनवेल येथील सरकारी रुग्णालयात करण्यात आले. शवविच्छेदनानंतर मृतदेह परत देताना पोलिसांच्या उपस्थितीत तो चुकीने दुसऱ्या एका नेपाळी कुटुंबाला देण्यात आला. योगायोगाने त्या कुटुंबातील तरुणाचाही मृत्यू झाला होता आणि दोन्ही मृत व्यक्ती मूळचे नेपाळचे असल्याने ओळख करण्यात गोंधळ झाला. परिणामी, त्या कुटुंबाने सुशांत मल्ला याचाच मृतदेह आपला समजून त्यावर अंत्यसंस्कारही केले.

हेही वाचा : "सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या जावयाने शिक्षकाच्या नावावर कर्ज काढलं, नंतर भरण्यास नकार दिला; शिक्षकाने विष घेतलं"

"पोस्टमॉर्टेमनंतर मृतदेह  पोलिस अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर सुपूर्द केला जातो" 

दरम्यान, सुशांतच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात येऊन मृतदेह मिळत नसल्याची तक्रार केली. त्यानंतर चौकशीत संपूर्ण प्रकार उघडकीस आला. शवविच्छेदनानंतर मृतदेह रुग्णालय प्रशासन नव्हे, तर तपास करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांच्या जबाबदारीवर सुपूर्द केला जातो, असे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे या चुकीसाठी पोलिसच जबाबदार असल्याचे चित्र समोर आले आहे.

या घटनेनंतर सुशांतच्या नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासन आणि पोलिसांवर गंभीर निष्काळजीपणाचा आरोप केला. त्यांनी मृतदेह ओळखण्यात रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी मदत न केल्याचा आरोप केला होता. मात्र, तपासात हेही समोर आले की, चुकीच्या मृतदेहाची ओळख करून घेणाऱ्या कुटुंबीयांकडूनही दुर्लक्ष झाले होते. अखेरीस त्यांनीही आपली चूक मान्य केली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पनवेलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक गीते यांनी तात्काळ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले आहेत. त्यांनी संबंधित पोलिस अधिकारी आणि रुग्णालय कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यासाठी स्वतंत्र समिती नेमल्याचे सांगितले.

या प्रकारामुळे रुग्णालयातील मृतदेह सुपूर्द करण्याच्या प्रक्रियेतील त्रुटी आणि पोलिसांकडून होणाऱ्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. एकाच वेळी दोन मृतदेह रुग्णालयात असताना ओळख पटविण्याची योग्य पद्धत अवलंबली गेली नसल्याने अशी गंभीर चूक घडली. या घटनेनंतर प्रशासनाने भविष्यात अशा चुका टाळण्यासाठी अधिक कठोर नियम लागू करण्याचे संकेत दिले आहेत. एकूणच, मृतदेहांच्या अदलाबदल प्रकरणाने केवळ मृतांच्या कुटुंबीयांनाच नव्हे तर संपूर्ण परिसरालाच हादरवून सोडले असून, पोलिस आणि आरोग्य विभागाच्या निष्काळजीपणावर जनतेत संताप व्यक्त केला जात आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

"सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांच्या जावयाने शिक्षकाच्या नावावर कर्ज काढलं, नंतर भरण्यास नकार दिला; शिक्षकाने विष घेतलं"
 

    follow whatsapp