Raj Thackeray : “आपण पण वाहवत गेलो तर…”; जुना फोटो शेअर करत ठाकरेंनी व्यक्त केली चिंता

Raj Thackeray tweet : बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज ठाकरे यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. जुना फोटो ट्विट करत राज यांनी एक आवाहन केले आहे.

Raj Thackeray post on babasaheb Ambedkar death anniversary

Raj Thackeray post on babasaheb Ambedkar death anniversary

भागवत हिरेकर

06 Dec 2023 (अपडेटेड: 06 Dec 2023, 04:37 AM)

follow google news

Babasaheb Ambedkar Death Anniversary : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी अभिवादन केले. यानिमित्ताने राज ठाकरे यांनी एका पोस्टमधून भावना व्यक्त केल्या आहेत. राज ठाकरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संत गाडगेबाबा आणि कर्मवीर भाऊराव पाटील या तीन समाजसुधारकांचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोचा अर्थ सांगताना राज ठाकरेंनी एक शपथ घेण्याचे आवाहन केले आहे.

हे वाचलं का?

बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन… राज ठाकरेंची पोस्ट

“सर्वप्रथम आजच्या महापरिनिर्वाण दिनी, महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन. इतिहासात डोकावून बघताना अगदी मोजकेच महापुरुष आढळतात की, त्यांच्यानंतर सुद्धा त्यांचे विचार तळपत राहतात आणि त्यातून बदलाच्या लाटा पुढे अनेक दशकं येत राहतात, ते विचार समाजाला प्रेरित करत राहतात.”

हेही वाचा >> “ज्यांना गद्दारी करून…”, भाजप आमदाराचे श्रीकांत शिंदेंच्या वर्मावर बोट

“महाराष्ट्राचं अहोभाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराज ते महात्मा ज्योतिबा फुले, ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर असे महापुरुष ह्या भूमीत होऊन गेले. स्वराज्याची मुहूर्तमेढ ह्याच राज्यात झाली, स्त्रीशिक्षणासारखं पवित्र कार्य ह्याच राज्यात आकाराला आलं आणि शिक्षण, संघटन, संघर्ष आणि धम्मचक्र प्रवर्तन यांच्या सहाय्याने हजारो वर्षे अस्पृश्यतेच्या व गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित-पीडितांचे पुनरुत्थान करणारा महामानव पण ह्याच भूमीतील.”

Raj Thackeray : “आपल्याला कदाचित विसर पडायला लागलाय”

“हे सगळं आजच्या दिवशी लिहिताना त्या सोबत एक फोटो इथे मुद्दामून टाकला आहे. कर्मवीर भाऊराव पाटील, संत गाडगेबाबा आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर एकत्र असलेला हा फोटो. तीन उत्तुंग कार्य करून गेलेली आणि एकेमकांबद्दल पराकोटीचा आदर असणारी ही माणसं. हा आपला महाराष्ट्र होता. ह्याचा विसर आपल्याला कदाचित पडायला लागला आहे असं वाटावं अशी परिस्थिती आहे.”

हेही वाचा >> “पंकजाताई आणि मी मिळून…”, फडणवीसांसमोर धनंजय मुंडेंचं मोठं विधान

“ह्यातून महाराष्ट्राने एकच बोध घ्यावा तो म्हणजे देशाला आकार देणारं, स्वभान देणारं हे राज्य आहे ह्याचं भान गमावू नये. उत्तर आणि दक्षिण अशा संस्कृतींना जोडणारा सांधा म्हणजे महाराष्ट्र आहे. अशा महाराष्ट्राने आपल्या राजकारणाचा, समाजकारणाचा जो चिखल होऊ दिलाय तो वेळीच थांबवावा. कारण महाराष्ट्ररूपी सांधा निखळला आणि आपण पण वाहवत गेलो तर हे फक्त राज्याचं नाही तर देशाचं अपरिमित नुकसान ठरेल.”

“सगळ्यांनी शपथ घेण्याचा…”

“आजचा महापरिनिर्वाण दिन ह्यासाठी महत्वाचा आहे की डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना स्मरून आपल्यातले सगळे भेद गाडून हा देश, हे राज्य पुन्हा एकसंध करण्यासाठी सगळ्यांनी शपथ घेण्याचा हा दिवस. पुन्हा एकदा महामानवाच्या स्मृतीस माझं विनम्र अभिवादन”, असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

    follow whatsapp