नवऱ्याने पूजाला क्रूरपणे संपवलं, वाचवण्यासाठी आलेल्या मेहुण्यावरही वार

मुंबई तक

• 04:53 PM • 09 Jul 2026

Crime News : बिहारमधील नवादा जिल्ह्यात कौटुंबिक वादातून एका संतापलेल्या पतीने आपल्या पत्नीची आणि मेहुण्याची चाकूने भोसकून निर्घृण हत्या केली आहे. या धक्कादायक घटनेनंतर आरोपीने स्वतः पोलीस ठाण्यात जाऊन शरणागती पत्करली.

Crime News

Crime News

Google CTA

बातम्या हायलाइट

point

नवऱ्याने पूजाला क्रूरपणे संपवलं

point

वाचवण्यासाठी आलेल्या मेहुण्यावरही वार

Crime News : कौटुंबिक वाद विकोपाला गेल्याने एका पतीने आपल्याच सासरी घुसून रक्ताचा सडा पाडला. वारिसलीगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खानापूर गावात शुक्रवारी ही दुर्दैवी घटना घडली.  मौली कुमार या पतीने आपली पत्नी पूजा कुमारी हिची चाकूने भोसकून क्रूरपणे हत्या केली. या हल्ल्यादरम्यान आपली बहीण पूजाला वाचवण्यासाठी धावून आलेल्या आदित्य कुमार या मेहुण्यावरही आरोपीने धारदार चाकूने सपासप वार केले. या अमानवी कृत्यामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, उपेंद्र सिंह यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हे वाचलं का?

हेही वाचा : मुंबईची खबर : मुंबईला पूरमुक्त करण्यासाठी 13 हजार कोटी, काय आहे मास्टर प्लॅन?

लग्नानंतर काही काळानंतरच पती-पत्नीमध्ये वादाची ठिणगी

या भीषण प्रकरणाची पार्श्वभूमी पाहता, खानापूर येथील रहिवासी उपेंद्र सिंह यांनी आपली 28 वर्षीय मुलगी पूजा हिचा विवाह चैनपुरा येथील मौली कुमार याच्याशी लावून दिला होता. लग्नानंतर काही काळानंतरच पती-पत्नीमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यांच्यात सतत होणारी भांडणे आणि मारामारी ही नित्याचीच बाब बनली होती. विशेष म्हणजे, त्यांना तीन वर्षांची एक लहान मुलगी असूनही त्यांच्यातील संबंध सुधारले नाहीत. खुद्द गुरुवारीच त्यांच्यातील वाद इतका तीव्र झाला होता की, पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला होता. पूजाची सुरक्षा विचारात घेऊन पोलिसांनी तिला तिचे माहेर असलेल्या खानापूरला सुरक्षित पाठवले होते, मात्र कोणालाही कल्पना नव्हती की ही शांतता फक्त एका दिवसाचीच असेल.

हेही वाचा : चकाकती कार, एका तासाचे 20 लाख, काकीची 'अश्लील' ऑफर, भाचीने दाखल केली FIR

 रागाच्या भरात पत्नीसह मेहुण्यावर वार 

शुक्रवारी दुपारच्या सुमारास आरोपी मौली कुमार हा पूर्ण तयारीनिशी आणि हातात धारदार चाकू घेऊन थेट पूजाच्या माहेरी पोहोचला. त्याने घरात प्रवेश करताच पूजावर जीवघेणा हल्ला चढवला. आपल्या लाडक्या बहिणीवर होणारा अत्याचार पाहून आदित्य कुमार याने स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्याला रोखण्याचा प्रयत्न केला. मात्र, रागाच्या भरात असलेल्या मौलीने आदित्यवरही चाकूने प्राणघातक वार केले. आजूबाजूच्या लोकांनी आरडाओरडा ऐकून घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांना गंभीर अवस्थेत रुग्णालयात हलवले. दुर्दैवाने, डॉक्टरांनी तपासणी अंती पूजाला मृत घोषित केले, तर गंभीर जखमी असलेल्या आदित्यला पाटण्याला हलवण्यात आले, तिथे उपचारादरम्यान त्याचाही मृत्यू झाला.

या दुहेरी हत्याकांडानंतर आरोपी मौली कुमार याने घटनास्थळावरून पळ न काढता थेट वारिसलीगंज पोलीस ठाणे गाठले आणि स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. त्याने गुन्हा कबूल केला असून पोलीस आता हत्येसाठी वापरलेले शस्त्र जप्त करण्याच्या प्रक्रियेत आहेत. पोलीस प्रशासनाने दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून या प्रकरणाचा पुढील तपास वेगाने सुरू केला आहे. या घटनेमुळे एकाच कुटुंबातील दोन तरुण सदस्य हिरावले गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, कौटुंबिक वादाचे रूपांतर इतक्या मोठ्या हिंसेत झाल्यामुळे सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.