Crime News : लग्नाचा प्रस्ताव नाकारल्याच्या रागातून झालेल्या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 'लॉ'च्या विद्यार्थिनीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. अमृता (वय 22) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, 13 जुलै रोजी एचएएल रोडवरील कोडीहल्ली परिसरात तिच्यावर हल्ला करण्यात आला होता. छाती आणि पाठीवर चाकूचे वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली होती. कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. डॉक्टरांनी तिच्यावर सलग 48 तासांहून अधिक काळ उपचार केले, मात्र 15 जुलैच्या सायंकाळी तिची प्राणज्योत मालवली. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
ADVERTISEMENT
हेही वाचा : Maharashtra Weather : ये रे ये रे पावसा.., ऐन जुलै महिन्यात पाऊस गेला कुठे? 6 जिल्ह्यांना यलो अलर्ट
प्रियकराकडून अमृताची फसवणूक
प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, अमृता, धनुष जी आणि त्याचा धाकटा भाऊ सूर्य जी हे तिघेही एकाच परिसरात राहत होते. धार्मिक कार्यक्रमांमधील ओळखीतून दोन्ही कुटुंबांमध्ये परिचय झाला होता. त्यानंतर अमृता आणि धनुष यांच्यात मैत्री निर्माण झाली आणि पुढे या मैत्रीचे प्रेमसंबंधात रूपांतर झाले. मात्र, धनुषने आपल्या भूतकाळातील महत्त्वाची माहिती अमृतापासून लपवून ठेवली होती. त्याचे यापूर्वी लग्न झाले होते, त्याचा घटस्फोट झाला होता आणि त्याला एक मूलही असल्याचे अमृताला नंतर समजले. ही बाब समोर आल्यानंतर स्वतःची फसवणूक झाल्याची भावना निर्माण झाल्याने तिने धनुषशी संबंध तोडण्याचा निर्णय घेतला आणि त्याच्यापासून अंतर ठेवण्यास सुरुवात केली.
हेही वाचा : नरेंद्र मोदींचा मूलांक किती? अंकशास्त्रज्ञांनी सांगितल्या खास गोष्टी
भावाचा लग्नाचा प्रस्ताव का नाकारला? अमृताचा खून कशामुळे झाला?
पोलिसांच्या माहितीनुसार, अमृताने धनुषचा प्रस्ताव आणि त्याच्याशी असलेले संबंध संपवल्यानंतर त्याचा भाऊ सूर्य संतापला होता. आपल्या भावाचे प्रेम नाकारल्याबद्दल तो अमृताला सोडणार नसल्याची धमकी त्याने दिली होती. 13 जुलै रोजी अमृताच्या घरी दोन्ही बाजूंमध्ये वाद झाला. याच वादादरम्यान सूर्यने तिच्यावर चाकूने हल्ला केल्याचा आरोप आहे. त्याने तिच्या छातीवर आणि पाठीवर वार करून घटनास्थळावरून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, स्थानिक नागरिकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर जखमी अमृताला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, जिथे तिच्यावर उपचार सुरू होते.
या घटनेनंतर जेबी नगर पोलिसांनी धनुष आणि सूर्य या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. दोघांनाही अटक करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे. अमृताचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणात खुनाचे आरोप लागू केले आहेत. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपींकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलिसांकडून केला जात आहे.
ADVERTISEMENT












