Crime News Marathi : कर्नाटकच्या विजयनगर जिल्ह्यातील कोट्टुरुमधून मानवतेला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका तरुणाने आपल्या आई-वडिलांसह सख्ख्या बहिणीची निर्घृण हत्या करून त्यांचे मृतदेह घरातच पुरल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना 27 जानेवारी रोजी घडली असली, तरी आरोपीने स्वतः पोलिसांसमोर आत्मसमर्पण केल्यानंतरच या भीषण गुन्ह्याचा पर्दाफाश झाला.
ADVERTISEMENT
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय असे आरोपीचे नाव असून त्याने वडील भीमराज, आई जयलक्ष्मी आणि बहिण अमृता यांची निर्दयपणे हत्या केली. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने अक्षयने भाड्याच्या घरातील एका खोलीत खड्डा खोदून तिन्ही मृतदेह तेथेच पुरले. ही अमानवी कृत्ये करून तो थेट बेंगळुरूकडे फरार झाला.
घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, बेंगळुरूला पोहोचल्यानंतर अक्षयने तिलकनगर पोलीस ठाण्यात आपल्या कुटुंबीयांच्या बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी संशयाच्या आधारे त्याची कसून चौकशी केली असता, त्याने अखेर आपला गुन्हा कबूल केला. सुरुवातीला पोलिसांची दिशाभूल करत त्याने मृतदेह संदूर परिसरात फेकल्याचे सांगितले. मात्र पुढील चौकशीत त्याने मृतदेह घरातच पुरल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी कोट्टुरु येथे जाऊन घराची झडती घेतली असता, खोदकाम करून तिन्ही मृतदेह बाहेर काढण्यात आले.
या तिहेरी हत्येमागील कारणांबाबत प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिस सूत्रांनुसार, या हत्याकांडामागे प्रेमप्रकरणाचा वाद कारणीभूत असल्याचा संशय आहे. अक्षयची बहिण अमृता एका युवकावर प्रेम करत होती. तिचे आई-वडील या नात्याला पाठिंबा देत होते. मात्र अक्षयला हा संबंध मान्य नव्हता. याच कारणावरून घरात वारंवार वाद होत असल्याचे सांगण्यात येत आहे. या वादाचेच रूपांतर टोकाच्या हिंसाचारात झाले असावे, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. चौकशीत अक्षयनेही “मला बहिणीचा प्रियकर आवडत नव्हता, पण आई-वडिलांना त्या नात्याबाबत काहीच आक्षेप नव्हता. हीच गोष्ट मला खटकत होती,” असे सांगितल्याचे समजते.
या घटनेचा परिणाम केवळ कुटुंबापुरताच मर्यादित राहिलेला नाही. या घरातील पाळीव कुत्राही मालकांना गमावल्यानंतर सतत रडत असल्याचे चित्र घटनास्थळी पाहायला मिळाले. या दृश्याने उपस्थितांचे डोळे पाणावले. विजयनगरच्या एसपी जाह्नवी आणि डीएसपी मल्लेश यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून समाजमन हादरून गेले आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या
ADVERTISEMENT











