Crime News : हरियाणातील रेवाडी जिल्ह्यात समोर आलेल्या एका खळबळजनक हत्याकांडाने संपूर्ण परिसर हादरून गेला आहे. 21 वर्षीय मोनूचा मृत्यू हा अपघात किंवा आत्महत्या नसून, तो एका सुनियोजित कारस्थानाचा भाग असल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. मोनूची पत्नी तन्नू हिने आपल्या कथित प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोनूचे तोंड आणि नाक दाबून त्याला बेशुद्ध करण्यात आले आणि त्यानंतर त्याला जिवंतच कालव्यात फेकून देण्यात आले, जेणेकरून शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे कारण पाण्यात बुडल्याने मृत्यू झाला असे यावे. तसेच संशय येऊ नये म्हणून त्याची स्कूटीही कालव्याच्या किनाऱ्यावर उभी करण्यात आली होती. सुरुवातीला हा अपघात किंवा आत्महत्या वाटल्याने पोलिसांनी शव विच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन केला होता.
ADVERTISEMENT
49 फोन कॉल्स अन् तीन मिनिट बोलणं
पतीच्या मृत्यूनंतर आरोपी पत्नी तन्नू पूर्णवेळ दुःखाचे नाटक करत राहिली. ती अंत्यसंस्कारात सामील झाली, तिने अश्रू ढाळले आणि सातव्या दिवसाच्या धार्मिक विधींपर्यंत सर्व रितीरिवाजांमध्ये भाग घेऊन स्वतःला निष्पाप सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, 11 जून रोजी पोलिसांनी मोनूचा मोबाईल फोन त्याच्या कुटुंबीयांकडे सुपूर्द केला आणि या कथेला संपूर्ण वेगळे वळण मिळाले. फोनमधील सर्व डेटा डिलीट करण्यात आल्याचे पाहून कुटुंबीयांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यांनी सायबर तज्ज्ञांच्या मदतीने मोबाईलचा डेटा रिकव्हर केला असता, धक्कादायक चॅट्स आणि कॉल डिटेल्स समोर आले. ज्यामध्ये मोनू बेपत्ता झाला त्या दिवशी, म्हणजेच 8 जून रोजी त्याने तन्नूला तब्बल 49 वेळा फोन केल्याचे आणि त्यांच्यात 3 मिनिटे बोलणे झाल्याचे उघड झाले. कुटुंबीयांनी कोणताही गाजावाजा न करता आधी धार्मिक विधी पूर्ण होऊ दिले आणि नंतर हा डेटा पोलिसांच्या हवाली केला.
हे ही वाचा : वाढदिवस साजरा करायला मित्राच्या घरी गेली अन् घडलं भयानक, पाच जणांना अटक
8 जूनला काय घडलं?
मृत मोनूच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, 8 जून रोजी पगार मिळाल्यानंतर मोनूने पैसे काढले आणि घरात पोटदुखीचा बहाणा करून औषध आणण्यासाठी स्कूटीवरून बाहेर पडला. चॅटवरून समोर आले की, तन्नूनेच त्याला भेटण्यासाठी बोलावले होते. तो घरी न परतल्याने 9 जून रोजी त्याची बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली आणि दुसऱ्या दिवशी कालव्यात त्याचा मृतदेह सापडला. शरीरावर कोणत्याही जखमा नसल्याने आणि स्कूटी कालव्याकाठी उभी असल्याने पोलिसांनी सुरुवातीला याला अपघात मानले होते. डेटा मिळाल्यानंतरही सुरुवातीला कारवाई न झाल्याने कुटुंबीयांनी 2 जुलै रोजी पोलीस अधीक्षकांची (एसपी) भेट घेतली, ज्यानंतर तपासाला वेग आला आणि या संपूर्ण मर्डर मिस्ट्रीचा पर्दाफाश झाला.
हे ही वाचा : Maharashtra Weather : मुंबईसह 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट, 29 जिल्ह्यांवर पावसाचं तांडव
दोघांना अटक, तिघं फरार
पोलिसांनी केलेल्या कडक चौकशीत आरोपी पत्नी तन्नू हिने आपला गुन्हा कबूल केला आहे. तिने सांगितले की, 8 जून रोजी तिने फोन करून मोनूला बोलावले होते, जिथे आधीच दबा धरून बसलेला तिचा कथित प्रियकर सोनू आणि त्याचे साथीदार हरिओम व अमन यांनी मोनूला पकडले. या तिघांनी मोनूचे तोंड-नाक दाबून त्याला बेशुद्ध केले आणि नंतर कालव्यात फेकून दिले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी मुख्य सूत्रधार पत्नी तन्नू आणि प्रियकराचा साथीदार हरिओम या दोघांना अटक करण्यात आली आहे. मुख्य आरोपी सोनू आणि त्याचा दुसरा साथीदार अमन सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान, मृत मोनूच्या आई-वडिलांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
ADVERTISEMENT












